मानवतेची हारजीत
By Admin | Updated: December 20, 2015 22:26 IST2015-12-20T22:26:45+5:302015-12-20T22:26:45+5:30
केवळ देशभरातच नव्हे तर अन्य देशांमध्येही ज्या घटनेमुळे संवेदनशील मनांचा थरकाप उडाला होता त्या राजधानी दिल्लीतील ‘निर्भया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन

मानवतेची हारजीत
केवळ देशभरातच नव्हे तर अन्य देशांमध्येही ज्या घटनेमुळे संवेदनशील मनांचा थरकाप उडाला होता त्या राजधानी दिल्लीतील ‘निर्भया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराची सुटका करू नये ही अनेक संघटनांची मागणी उच्च न्यायालयाने अमान्य केल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित मानवतेची जीत झाली की हार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित गुन्हेगारास अटक झाली तेव्हा त्याचे वय कायदेशीररीत्या सज्ञान होण्यासाठी केवळ सहा महिन्यांनी कमी होते. स्वाभाविकच त्याला ‘बाल गुन्हेगार’ समजले गेले आणि बाल गुन्हेगार म्हणून कायद्याने त्याला जी ‘शिक्षा’ देता येत होती ती देऊन झाल्यावर त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. सुमारे तीन वर्षांपूर्वी हा गुन्हा घडला आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हापासूनच्या कालावधीत त्याच्या चेहऱ्यावर एकदाही पश्चात्तापाचा भाव उमटला नाही असे सांगितले जाते. दुर्दैवाने दरम्यानच्या काळात कायद्याच्या भाषेतील बाल गुन्हेगारांनी असेच आणखीही काही गुन्हे केले. सबब अत्यंत भीषण स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सापडलेल्या बाल गुन्हेगारांना त्यांच्यातील ‘बाल्य’ बाजूला ठेवून अन्य गुन्हेगारांप्रमाणेच वागवावे असा एक मतप्रवाह सुरू झाला. त्यातूनच बाल गुन्हेगाराची किंवा अज्ञानाची कमाल मर्यादा १८ वर्षे वयावरून १६ वर्षांपर्यंत खाली आणावी अशी मागणी पुढे आली आणि संबंधित कायद्यात तशी दुरुस्ती सुचविणारे एक विधेयक संसदेत मांडले गेले. ते अद्यापही प्रलंबित आहे हा भाग वेगळा. परंतु अनेक मानवतावादी तसेच महिला संघटनांचा या विधेयकास विरोध होता. तो आजदेखील कायम आहे. परंतु त्याचबरोबर संबंधित गुन्हेगारांची मानवता मोलाची की त्यांच्या हिंसेला बळी पडलेल्यांची मानवता अधिक मोलाची अशी चर्चा त्यातून सुरू झाली. सबब संबंधित गुन्हेगाराची मुक्तता केली जाऊ नये कारण तो मुक्त झाला तर त्याच्यापासून समाजाला धोका निर्माण होऊ शकतो असे मानणाऱ्या संघटना आणि व्यक्तींनी त्याच्या सुटकेस अटकाव करावा म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने त्यास अनुकूलता दर्शविली नाही. त्यावर ‘निर्भया’च्या आईने ‘अखेर गुन्ह्याचा विजय झाला’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तथापि, जनमताचा रेटा वाढवावा आणि सरकारने अध्यादेश जारी करून आता सज्ञान झालेल्या त्या गुन्हेगाराला ताब्यात घ्यावे असा मतप्रवाह वाढत असला, तरी याक्षणी मानवतेचा विजय झाला की ती पराभूत झाली याचा निर्णय करणे कठीण आहे, कारण सुटकेस विरोध करणारे आणि तिचे समर्थन करणारे दोन्ही पक्ष मानवतेचीच दुहाई देत होते आणि देत आहेत.