दया
By Admin | Updated: June 2, 2015 23:49 IST2015-06-02T23:49:49+5:302015-06-02T23:49:49+5:30
मनुष्य समाजामध्ये वावरत असताना समाजातील त्याची ओळख ही त्याच्या स्वभावावरून ठरत असते. एखाद्याने वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर समाजामध्ये त्याला

दया
अॅड. जयवंत महाराज बोधले -
मनुष्य समाजामध्ये वावरत असताना समाजातील त्याची ओळख ही त्याच्या स्वभावावरून ठरत असते. एखाद्याने वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर समाजामध्ये त्याला ‘डॉक्टर’ म्हणून ओळखले जाते. परंतु ही झाली बाह्य ओळख. त्याच्या अंगी असलेल्या सद्गुणांनी जी ओळख निर्माण होते तीच खरी ओळख. सामान्यत: संसारात सत्ता, संपत्ती, संतती प्राप्त होण्यालाच धन्यता समजले जाते. परंतु अध्यात्मिक दृष्टीने खरे धन्य कोण, याचे उत्तर संत तुकाराम महाराज सांगतात -
धन्य ते संसारी। दयावंत जे अंतरी।।
ज्यांच्या अंत:करणा दया आहे तेच खरे या संसारात धन्य आहेत, तीच त्यांची खरी ओळख आहे. दया हा एक अत्यंत महत्त्वाचा सद्गुण आहे. संत कबीर महाराज तर ‘दया धर्म का मूल है।’ असे सांगतात. कायद्यामध्येसुद्धा ‘दयेचा अर्ज’ याला खूप महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर महाराज दैवी संपत्तीमध्ये या दयेचा विस्तार असा करतात की,
आता दया ते ऐसी। पूर्णचंद्रीका जैसी।
निवविता न कडसी। साने थोर।।
पौर्णिमेचे चांदणे गारवा देताना जसे लहान थोर पाहात नाही तशी ही दया मनुष्यामध्ये कोणताही भेद पाहात नाही. मनुष्याच्या जीवनामधील देहभाव जावा, ब्रह्मभाव प्राप्त व्हावा आणि दयाभावामध्ये संपूर्ण जीवनाचा प्रवास चालावा.
स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जीवनातील एक प्रसंग असा आहे की, त्यांच्यावर त्यांच्याच जवळच्या एका शिष्याने विषप्रयोग केला. ते बेशुद्ध झाले. इतर शिष्यांनी त्या विष प्रयोग केलेल्या शिष्याला पकडले व एका खांबाला बांधून ठेवले. काही वेळानंतर स्वामीजी शुद्धीवर आले. त्यांनी डोळे उघडले व पाहिले की त्या शिष्याला खांबाला बांधले आहे, तेव्हा इतर शिष्य म्हणू लागले, स्वामीजी यानेच तुमच्यावर विष प्रयोग केला व म्हणून त्याला बांधले आहे. याला काय शिक्षा द्यायची ते सांगा. स्वामीजींनी त्याच्याकडे शांतपणे पाहिले आणि सर्व शिष्यांना सांगितले, जे बांधले आहे ते सोडा. कारण मी या जगात बांधायला नाही तर जे बांधलेले आहेत त्यांना सोडायला आलो आहे. यालाच दया म्हणतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की, अशा दयावान महात्म्याचा मी स्वत: ऋणी आहे.
तो पुरूष वीरराया।
मूर्तीमंत जाण दया।
मी उदयजतांचि तया।
ऋणिया लाभे।।।१६/१६२
अशी दया मनुष्याने अंत:करणात आणावी. उन्हाळ्याते मुक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तर ही दया म्हणजेच भगवंताची खरी पूजा होय व तिनेच भगवंत संतुष्ट होतील.