गुणांच्या खैरातीनं शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ
By Admin | Updated: June 11, 2015 00:26 IST2015-06-11T00:26:49+5:302015-06-11T00:26:49+5:30
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांच्या निकालाने गुणांचा महापूर आणला आहे. त्यामुळे आनंदीआनंद आहे. मात्र यशाच्या या आनंदोत्सवाला भविष्यातील निराशेची

गुणांच्या खैरातीनं शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ
प्रकाश बाळ
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक) -
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांच्या निकालाने गुणांचा महापूर आणला आहे. त्यामुळे आनंदीआनंद आहे. मात्र यशाच्या या आनंदोत्सवाला भविष्यातील निराशेची एक काळीकुट्ट अशी जी जाड किनार आहे, ती पाहण्याची आज कोणाचीच तयारी नाही. त्यामुळे आज आनंदोत्सव साजरा करणारे विद्यार्थी व त्यांचे पालक यांंच्यावर निराशेचे सावट जेव्हा धरले जाईल, तेव्हा त्यांना कोणाचाच आधार उरलेला नसेल. गुणांची इतकी खैरात होऊनही योग्य तो अभ्यासक्रम का निवडता येत नाही आणि पदवी मिळाल्यावर नोकरी हाती पडलेली पाहताना जीव कंठाशी का येतो, हे प्रश्न विचारून त्याची उत्तरे मिळविण्याची कोणाचीच तयारी नाही.
गुणांच्या या महापुरात शिक्षणव्यवस्था गटांगळ्या खात आहे. शिक्षणाचा ज्ञानाशी संबंध उरलेला नाही. विद्यापीठं आणि शाळा परीक्षांचे कारखाने बनले आहेत. हे घडत आहे, त्याचे मूलभूत कारण प्रचंड संख्या हे आहे. त्याने पुरी शिक्षणव्यवस्था कोलमडून गेली आहे. तशी ती जाऊ नये, यासाठी काय करायला हवं, हे कोठारी आयोगानं १९६६ साली आपल्या अहवालात सांगितलं होतं. प्रचंड लोकसंख्या, त्यामुळं शिक्षणव्यवस्थेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची अमर्याद संख्या आणि त्याचा पडणारा ताण हा पेच सोडवायचा असेल, तर पदवी व नोकरी याची घातलेली सांगड तोडणं भाग आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोठारी आयोगानं माध्यमिक स्तरानंतर दोन वर्षांसाठी (+२) विविध प्रकारचं यांत्रिकी, औद्योगिक व इतर प्रकारचं व्यावसायिक प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना नोकरीयोग्य कौशल्ये मिळवून द्यावीत, असं सुचवलं होतं. त्यामुळं उच्च माध्यमिक स्तरापर्यंत जाणारा लाखो विद्यार्थ्यांचा ओघ कमी होईल. कोठारी आयोगाची शिफारस स्वीकारली गेली. देशभर १०+२+३ ही पद्धत अंमलात आणण्याचा निर्णय झाला. त्यासाठी मधल्या +२ या स्तरासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम आणि तसं प्रशिक्षण देणाऱ्या अगणीत संस्था उभ्या राहणं गरजेचं होतं. येथेच नेमका हितसंबंधियांनी घोळ घातला. बहुतेक ठिकाणी या मधल्या +२ स्तरासाठी ‘कनिष्ठ महाविद्यालयं’ निघाली. त्यातून शिक्षण सम्राट निर्माण झाले. लाखोंच्या संख्येनं माध्यमिक परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ तसाच उच्च माध्यमिक व नंतर महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्र मापर्यंत चालू राहणं, यातच या ‘शिक्षण सम्राटां’ना आपलं हित दिसू लागलं. नफा हाच मुख्य उद्देश असल्यानं शिक्षणाच्या बाजारीकरणाला सुरूवात झाली. खाजगी क्लासेसचं पेव फुटलं. कसंही करून व्यावसायिक अभ्यासक्र माला प्रवेश मिळायला हवा, इंजिनिअर वा डॉक्टर बनून अथवा एमबीए पदवी मिळवून चांगली नोकरी हाती पडते, असं समीकरण बनवलं गेलं. मग अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्याची लाटच आली. शिक्षणक्षेत्रात अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या लाटा आता येतच राहिल्या आहेत आणि त्यात विद्यार्थी बुडून जात असले, तरी खाजगी क्लासेसचं उखळ पांढरं होत आहे.
एकदा बाजारच उघडला गेल्यावर त्यात सहभागी होऊन आपलं ‘उत्पादन’ कसं चांगलं आहे, याची जाहिरात करणं अपरिहार्यच. सध्याच्या २१ व्या शतकात ‘मीडिया’ हे अशा जाहिरातीचं मोठं प्रभावी माध्यम आहे. त्यामुळं विविध ‘पॅकेजेस’ तयार करून व ‘मीडिया’लाही त्यात सहभागी करून घेऊन नवनव्या क्लृप्त्या शोधून काढण्यात येऊ लागल्या. त्यातीलच एक म्हणजे ‘करीयर मार्गदर्शन’. माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल लागले की अशा ‘मार्गदर्शन’ कार्यक्रमांचं पेवच फुटतं. शिक्षणाच्या या बाजारात अनेक ‘मार्गदर्शन तज्ज्ञ’ उदयाला आले आहेत. त्यांंच्या दृष्टीनं ही एक पर्वणीच असते. या ‘मार्गदर्शन’साठी ‘मीडिया पार्टनर’ म्हणून वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्याही पुढं येतात. या ‘मार्गदर्शना’ला खाजगी क्लासेसची ‘स्पॉन्सरशिप’ असते आणि त्या ठिकाणी असंख्य खाजगी क्लासेसचे स्टॉल्सही असतात.‘आमच्याकडं आल्यास यशाची गॅरंटी’ अशा जाहिराती केल्या जातात. आधी किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्याची नावं व छायाचित्रं वृत्तपत्रांत पानभर छापली जातात.
....आणि अशा या ‘मार्गदर्शना’त आपले मौलिक विचार मांडण्यासाठी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्रीही जातीनं हजर असतात. ज्यांच्यामुळं रोग बळावतो आहे, त्यांनाच बरोबर घेऊन रोगाचा मुकाबला करण्याचा हा प्रकार आहे. अशा परिस्थितीत शिक्षणाचा ज्ञानाशी असलेला संबंध तुटला नाही तरच नवल! आता ज्ञानाऐवजी ‘कौशल्यं’ (स्कील्स) महत्वाची ठरत आहेत. पण ‘कौशल्य’ हे साधन आहे. त्याचं मूळ ज्ञानात आहे. म्हणजे सुटे भाग जोडून संगणक तयार करणं वा तो दुरूस्त करणं हे कौशल्य आहे. पण संगणक वा लॅपटॉप, अथवा स्मार्टफोनचा आराखडा बनवणं हे ज्ञान आहे. ही नवनिर्मितीची प्रक्रि या आहे. हे ज्ञान आपल्याकडं पुरेसं नाही. शिक्षणाचा असाा बट्ट्याबोळ झाला असल्यानंच भारतात ‘नवनिर्मिती’चं (इनोव्हेशन) प्रमाण नगण्य आहे. आपण चीनकडं बघत असतो. पण त्या देशातही नवनिर्मिती फारशी होत नाही. तिथे एखादी चांगली वस्तू आहे, तशीच बनविण्यावर (डुप्लिकेशन) भर आहे. पण चीनमध्ये फक्त वस्तू तयार होतात. या वस्तूंचे आराखडे (डिझाइन्स), दर्जा इत्यादी पाश्चिमात्य देशातून येते.
.... कारण नवनिर्मिती तिथे होत असते.
म्हणूनच एका अभ्यासकानं म्हटलं आहे की, ‘भारतापुढं दोन पर्याय आहेत. पहिला ‘टू बिकम चायना आॅफ द वेस्ट’ ंिकवा दुसरा ‘टू बिकम जर्मनी आॅफ द इस्ट’. जर ‘जर्मनी आॅफ द इस्ट’ बनायचं असेल, तर गुणांचा महापूर थांबवून शिक्षण व्यवस्था ‘नवनिर्मिती’साठी सक्षम बनवावी लागेल. नुसता ‘कौशल्यां’वर भर देत राहण्यानं ‘चायना आॅफ द वेस्ट’च बनावं लागेल. सध्या आलेला गुणांचा महापूर बघता आणि ‘स्कॅम इंडिया नव्हे, तर स्किल इंडिया’ अशी खिल्ली देशाचे पंतप्रधानच उडवत असल्यानं, आपण ‘चायना आॅफ द वेस्ट’ हा पर्याय निवडला आहे, असं म्हणायला हरकत नाही.