शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वाढती निडरता व उर्मटगिरी रोखणे गरजेचे

By किरण अग्रवाल | Updated: January 7, 2024 11:49 IST

It is necessary to stop the growing fearlessness and arrogance :  काहीएक कारण नसताना चाकू चालवून जीव घेण्याची मानसिकता येते कुठून?

- किरण अग्रवाल

कुटुंबाचा व समाजाचाही धाक न राहिल्यामुळे की काय, तरुणांमध्ये कसली भीती राहिलेली नाही आणि त्यामुळेच सहज चाकू- सुऱ्यांचा वापर वाढून निष्पापांचे बळी जाण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. भयमुक्त समाजस्वास्थ्यासाठी हे वेळीच रोखणे गरजेचे आहे.

नवीन वर्षात आश्वासकपणे वाटचाल सुरू झाली असतानाच केवळ धाक दाखविण्याच्या उद्देशातून अकोल्यात घडलेली एका विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून केला गेल्याची घटना केवळ समाजमन हादरवून टाकणारीच नसून, घसरत्या समाजस्वास्थ्याचा परिचय घडवून देणारीही आहे. सरकारी व्यवस्थांच्या धाकाचे व कौटुंबिक संस्कारांचे वासे खिळखिळे होत चालल्याची बाब यातून स्पष्ट होणारी आहे.

इयत्ता बारावीचे शिक्षण घेतानाच इंजिनीअरिंगच्या शिकवणीसाठी जळगाव जामोद येथून अकोल्यात येऊन राहणाऱ्या विशाल धोटेनामक विद्यार्थ्यांला कसलाही वाद अगर कारण किंवा ओळख नसताना काही मद्यपी युवकांनी चाकूने भोसकल्याने त्याचा बळी गेला. मोठ्या आशा अपेक्षेने एकुलत्या एक पोरास शिक्षणासाठी शहरात पाठविलेल्या या लेकराच्या कुटुंबीयांची या अनपेक्षित घटनेने काय अवस्था झाली असेल याचा विचारच अस्वस्थ करणारा आहे. ही अशी एवढी एकच घटना नाही, यापूर्वीही काहीएक ओळख-पाळख नसताना दारूसाठी पैसे मागत रस्त्याने जाणाऱ्यास भोसकले गेल्याच्या किंवा हाणामारी केल्या गेल्याच्या घटना घडून आल्या असल्याचे पाहता, ही निडरता व ‘मेरी मर्जी’ची उर्मटगिरी येते कुठून, असा प्रश्न उपस्थित होणारा आहे.

वैद्यकीय व शैक्षणिक हब म्हणून अकोला अलीकडे मोठ्या वेगाने नावारूपास येत आहे. उच्च व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनेक मुले अकोल्यात येतात व भाड्याने खोली घेऊन राहतात. आपल्या शिकवणी, क्लासेस, जेवणासाठीची खानावळ व आपली रूम एवढाच त्यांचा वावर असतो; पण या मुलांना स्थानिक टवाळखोर व मद्यपींकडून होणारा त्रास नेहमीच चिंतेचा मुद्दा ठरत आला आहे. बरे, असा त्रास देणाऱ्या घटकाचे वयोमानही फार काही नसते. तेही वीसी, पंचशीतीलच असतात. त्यामुळे या तरुण वयात नकार ऐकून न घेण्याची मानसिकता व काहीही करून बसण्याची जी बेडरता या पिढीत रुजताना दिसत आहे, ती कशी रोखायची, याकडे पालकांनीच लक्ष देणे गरजेचे होऊन बसले आहे.

सर्वसाधारणपणे अशा घटना घडल्या की, पोलिसांचा धाक ओसरला आहे, असे म्हणण्याची पद्धत रूढ झाली आहे. ते अंशत: खरेही असले तरी मुळात कुटुंब व्यवस्थेतील ज्येष्ठांचा जो धाक ओसरत चालला आहे त्याचे काय? शिक्षण व कामाच्या निमित्ताने सदैव घराबाहेर राहणारा तरुण वर्ग नेमका काय करतो आहे, कशाच्या आहारी जातो आहे; याचा आढावा किती पालकांकडून घेतला जातो? तो तितकासा घेतला जात नसल्यानेच तर ही मुले बेदरकार होतात व आपली हौस, चंगळ अगर व्यसने पुरविण्यासाठी नको त्या मार्गाला लागतात. घराघरातील संस्कारांचे शिंपण कमी होत चालल्यानेच की काय, घराचे वासे कमकुवत होत आहेत; याकडे गांभीर्याने लक्षच पुरविले जात नसल्याचा हा परिपाक म्हणायला हवा. आई- वडील असोत की आजी- आजोबा, त्यांनी आपल्या लेकरांशी संवाद साधून मुलांना समजून घेण्यापेक्षा मोबाइलच्या वेडातून डोके बाहेर काढायला वेळ नाही, ही अनेक घरातील कथा आहे.

राहता राहिला विषय तो कायद्याच्या धाकाचा, तर नवीन वर्षातच बदलून आलेले अकोल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह हे कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळखले जातात. अकोल्यात येण्यापूर्वी वाशिममध्ये त्यांनी कायद्याचा धाक निर्माण करतानाच संवेदनशीलता जपत समाजस्वास्थ्य सांभाळल्याचे दिसून आले आहे. अकोल्याचा पदभार स्वीकारल्यावरही त्यांनी गुन्हेगारी रोखतानाच नागरी सुरक्षेला व भयमुक्ततेला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. तेव्हा त्यांच्या या प्रयत्नांना समाजाकडूनही आपल्या जबाबदारीची साथ लाभणे अपेक्षित आहे.

सारांशात, तरुण पिढीतील वाढती निडरता रोखून किरकोळ अथवा काहीएक कारण नसताना होणारे वादाचे प्रकार टाळायचे असतील तर घराघरातील ज्येष्ठ व वडीलधाऱ्यांना मुलांशी संवाद वाढवून संस्काराचे धागे घट्ट करावे लागतील. सारे काही यंत्रणांकडून अपेक्षिण्यापेक्षा नवीन वर्षात व्यक्तिगत पातळीवर तेवढे नक्की करूया.