शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

भारत व इराणचा चाबहार बंदर करार अन् अमेरिकेला झोंबल्या मिरच्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2024 07:51 IST

जगाचा पोलिसदादा बनू पाहणाऱ्या अमेरिकेने पुन्हा एकदा भारतावर डोळे वटारले आहेत.

जगाचा पोलिसदादा बनू पाहणाऱ्या अमेरिकेने पुन्हा एकदा भारतावर डोळे वटारले आहेत. जगाची सगळी सूत्रे आपल्या मर्जीने, कलाने हलली पाहिजेत असा अमेरिकेचा प्रयत्न नेहमीच राहतो आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तिची तयारी असते. गेली काही वर्षे चीनच्या सामर्थ्याचा सामना करताना भारताला मित्र म्हणविणाऱ्या अमेरिकेला तीन दिवसांपूर्वीच्या भारत व इराणने केलेल्या चाबहार बंदर करारामुळे मिरच्या झोंबल्या आहेत. या करारानुसार पुढची दहा वर्षे चाबहार बंदराचे संचालन भारताकडे राहील. 

इराणच्या पोर्ट्स अँड मेरिटाइम ऑर्गनायझेशनने त्यासाठीच स्थापन केलेल्या इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड या सरकारी कंपनीसोबत तसा करार केला. भारताच्या सागरमाला प्रकल्पातील ही कंपनी चाबहार बंदराच्या विकासात १२० दशलक्ष डॉलर्सची थेट गुंतवणूक करील आणि आणखी अडीचशे दशलक्ष डॉलर्सचे वित्तीय साहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. इराणमधील दुसऱ्या क्रमांकाचे चाबहार बंदर भारताच्या पश्चिमेकडील व्यापाराचे प्रवेशद्वार बनू शकेल. विविध बहुराष्ट्रीय प्रकल्पांमधील पाकिस्तानचा अडथळा चाबहारमुळे दूर होईल. कारण, पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापासून चाबहार फार लांब नाही. पाकिस्तान व चीन मिळून सध्या ग्वादर बंदराचा विकास करीत आहे. पाकिस्तानच्या आडमुठ्या धोरणामुळे रखडलेल्या इराण-भारत तेलवाहिनी प्रकल्पाला चाबहार हा पर्याय उपलब्ध होईल. आता ती तेलवाहिनी समुद्राच्या तळाशी टाकण्याचा प्रस्ताव आहे. 

महत्त्वाचे म्हणजे अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबान्यांना भारताशी संबंध वाढवायचे आहेत. बामियान प्रांतातील कोळसा खाणी व अन्य कारणाने भारताचीही ती गरज आहे. त्यामुळे तालिबानशी जुळवून घेतले जात आहे. म्हणजेच, आंतरराष्ट्रीय व्यापारातील पाकिस्तानचा अडथळा दूर करण्यासाठी चाबहार हा भारतासाठी हुकमी एक्का आहे. विशेषत: भारताला रस्त्याने थेट युरोपशी जोडणाऱ्या इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोरला या बंदराचा मोठा उपयोग होईल. तिथून इराण, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैझान, रशिया, मध्य आशियातील छोटे-छोटे देश व युरोपपर्यंत ७,२०० किलोमीटरची मालवाहतूक ही संपूर्ण जगाच्या दृष्टीने स्वप्नवत योजना आहे. अशा बहुपयोगी बंदराचे संचालन, कंटेनर हँडलिंग, वेअरहाउसिंग हाती येणे, हे भारताचे मोठे यश आहे. तथापि, अण्वस्त्र कार्यक्रम, मानवाधिकारांचे कथित उल्लंघन, कडव्या धर्मांधांना मदत आदी कारणांनी अमेरिकेचे इराणवर प्रतिबंध  आहेत. 

चाबहार बंदर करारानंतर अमेरिकेने त्या प्रतिबंधांची आठवण करून देताना भारताला त्यातून कोणतीही सूट मिळणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी, या कराराचे काय होणार, हा प्रश्न उभा राहिला आहे. तथापि, भारतावर इराणसारखे कडक प्रतिबंध घालणे अमेरिकेला परवडणारे नाही. त्यातून चीन व भारत या आशियातील दोन शक्ती अमेरिकेच्या विरोधात जातील. फारतर चाबहार प्रकल्पात सहभागी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना व्हिसा नाकारणे, त्या कंपन्यांची खाती सांभाळणाऱ्या बँकांवर निर्बंध अशी पावले अमेरिका उचलू शकते. जर्मनी किंवा हॉलंड यांसारख्या अमेरिकेच्या मित्रदेशांकडून बंदरविकासासाठी आवश्यक मोठ्या क्रेन मिळण्यात अडचण येईल. या शक्यतांचा विचार करतानाच भारताने अमेरिकेच्या या दबावाला अजिबात भीक घालू नये. कारण, आशियात भारतापुढे आव्हान आहे ते चीनचे. ते कसे पेलायचे, जागतिक बाजारपेठेत शक्तिमान चीनच्या स्पर्धेत कसे उभे राहायचे हे ठरविण्याचा अधिकार सार्वभौम भारताला आहेच. आर्थिक अडचणीतील पाकिस्तानच्या हतबलतेचा फायदा उचलताना चीनकडून इकॉनाॅमिक कॉरिडाॅर उभा केला जात आहे. 

अरबी समुद्र व हिंदी महासागरातील व्यापार वाढविण्यासाठी पाकिस्तानच्या ग्वादर बंदराचा विकास केला जात आहे. श्रीलंका व मालदीवसोबतचे संबंध वाढविण्यावर चीनचा भर आहे. अशावेळी भारताने मात्र अमेरिकेला काय वाटेल हा विचार करीत हातावर हात ठेवून बसावे, अशी अपेक्षा ठेवता येणार नाही. भारतीय उपखंडाला चोहोबाजूंनी चीनचा विळखा घट्ट होत असताना त्यातून सुटण्यासाठी इराण किंवा अन्य देश भारतासोबत व्यापार वाढविण्यासाठी अनुकूल असतील तर ती संधी भारताने अजिबात सोडू नये. अमेरिकेने भारतावर डोळे वटारण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. अनेकदा तिने असा प्रयत्न करून पाहिला आहे आणि दरवेळी तिच्या हाती अपयशच लागले आहे. यावेळीही भारताने चाबहार बंदराचा विकास, संचालन आणि युरोपपर्यंत वाहतूक व व्यापार वाढविण्याच्या आपल्या योजनांवर ठाम राहण्याची आवश्यकता आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाChabaharचाबहारIndiaभारतIranइराण