भारतीय जनता पक्षाने स्वबळावर ३०३ जागा जिंकल्या, याचा अर्थ त्यांना ५६ टक्के मताधिक्य मिळाले. त्यांच्या आघाडीतील पक्षांना मिळालेल्या जागा गृहीत धरून हे मताधिक्य ६५ टक्के इतके आहे. याचा अर्थ उर्वरित ३५ टक्के जागा विरोधकांना मिळाल्या असा धरायचा का? वस्तुस्थिती तशी नाही. दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला ९.६ टक्के जागा मिळाल्या, तर त्यांच्या संपुआला १६.८ टक्के जागा मिळाल्या. द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि वायएसआर यांचा पक्ष हे सारे प्रादेशिक पक्ष आहेत. त्यांच्यात कोणतेच साधर्म्य नाही. त्या प्रत्येकाला ४ टक्के जागा मिळाल्या. द्रमुकची राज्यात सत्तेत येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे तो पक्ष सत्ताधारी पक्षाचा विरोध करू शकत नाही. दोन्ही डगरींवर हात ठेवूनच त्या पक्षाला वाटचाल करावी लागेल.
रालोआ किंवा संपुआपासून अंतर राखूनच तो पक्ष राहील. तृणमूल काँँग्रेस पक्ष भरकटला आहे. त्याची ध्येयविहीन वाटचाल सुरू आहे. वायएसआर यांच्या पक्षाला अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सत्तारूढ आघाडीची कास धरावी लागणार आहे. त्यामुळे सत्तारूढ आघाडीचे बळ ६५ टक्क्यांवरून ६९ टक्के झाले आहे. बीजद, टीआरएस आणि बसपा यांचे संख्याबळ प्रत्येकी २ टक्के आहे. त्यापैकी पहिले दोन पक्ष सत्तारूढ आघाडीचे समर्थन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे बळ ७३ टक्के इतके होते. बसपाची अवस्था द्रमुकपेक्षा वेगळी नाही. उरलेल्या पक्षांची संख्या २० असून, त्यांचे संख्याबळ इतके कमी आहे की बाजू घेण्याची वेळ आली तर ते सत्तारूढ पक्षासोबत जाणे पसंत करतील.
लोकशाही ही लोकांची, लोकांकडून आणि लोकांसाठी असलेली व्यवस्था आहे, त्यामुळे लोकांनी जर ८० टक्के लोकांना निवडून त्यांना मताधिक्य दिले तर उर्वरित लोकांनी त्याबद्दल तक्रार करण्याचे कारण काय? त्याचा अर्थ असा की शासनासमोर वादग्रस्त असे विषयच उरलेले नाहीत. उलटपक्षी पूर्वीच्या काळी असे घडलेले आहे की सत्तारूढ पक्ष दुबळा असल्याने त्याने विरोधकांच्या मदतीने लोकांच्या वतीने कायदे केले.
विरोधक संपुष्टात आल्यामुळे मध्यस्थाचे काम कोण करील? तेव्हा यापुढे विरोधकांना स्वत:च्या काम करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणावा लागेल. सरकारने घेतलेल्या प्रत्येक पुढाकाराला विरोध करण्याची गरज काय? त्यांना लोकांनी निवडून दिले कारण त्यांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याची लोकांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे! तेव्हा सरकारच्या कामगिरीत त्रुटी आढळली तरच सरकारला विरोध करता येईल. पण त्यांच्या जाहीरनाम्यातील गोष्टींची त्यांनी अंमलबजावणी केल्यास त्यांना विरोध करणे शक्य होणार नाही.-डॉ. एस. एस. मंठामाजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस, बंगळुरू