मी एक समाधानी कामगार कलाकार !
By Admin | Updated: May 1, 2016 03:16 IST2016-05-01T03:16:47+5:302016-05-01T03:16:47+5:30
मागच्या दोन महिन्यांमध्ये दोन वेळा आॅस्ट्रेलियाला जाण्याचा योग आला. पहिल्यांदा महेश मांजरेकर यांच्या अत्यंत नामांकित ‘माई मिक्ता २०१५’ या पुरस्कार सोहळ्यासाठी. ज्यामध्ये ‘त्या तिघांची गोष्ट’

मी एक समाधानी कामगार कलाकार !
- अश्विनी एकबोटे
मागच्या दोन महिन्यांमध्ये दोन वेळा आॅस्ट्रेलियाला जाण्याचा योग आला. पहिल्यांदा महेश मांजरेकर यांच्या अत्यंत नामांकित ‘माई मिक्ता २०१५’ या पुरस्कार सोहळ्यासाठी. ज्यामध्ये ‘त्या तिघांची गोष्ट’ या नाटकासाठी माझं नामांकन झालं होतं. दुसऱ्यांदा अखिल आॅस्ट्रेलिया मराठी संमेलनामध्ये ‘मांदीयाळी शब्दतालाची’ हा कार्यक्रम सादर करण्यासाठी. तेव्हा ३५% तरी आॅस्ट्रेलिया अनुभवता आलं. बाहेरच्या देशात गेलं की तिथली प्रेक्षणीय स्थळं जशी आवडतात, त्याहीपेक्षा जास्त तिथली जीवनशैली, माणसांचं जगणं, संस्कृती, परंपरा, इतिहास हे सगळं समजून घ्यायला मला आवडतं !
सगळ्यांचे छान टुमदार, कौलारू प्रशस्त बंगले, मागेपुढे अंगण, अप्रतिम बागा, आतूनही अगदी स्वच्छ, नीटनेटकी घरं आणि पूर्णपणे अद्ययावत ! हे सगळं पाहिलं आणि त्या क्षणी मनात लगेच विचार आला की इथे हे सगळं व्यवस्थित ठेवायला नोकर असणार! पण जे ऐकलं त्यानं धक्काच बसला. त्यांच्याकडे कशालाही माणसं नाहीत, कामगार नाहीत. सगळं काही अपना हाथ जगन्नाथ! प्रचंड श्रीमंत माणसंच इथे कामावर माणसं ठेवू शकतात. काही जणांकडे साफसफाई करायला महिन्यातून एकदा, १५ दिवसांत एकदा तर काही जणांकडे आठवड्यातून एकदा सफाई कामगार येतो. त्याचं रोज येणं इथे परवडतच नाही. कारण इथे लेबर हे सर्वांत जास्त महाग आहे. त्यांच्या कामाचा मोबदला हा जवळजवळ २४.५० डॉलर्स, प्रत्येक तासाला असा ठरवूनच दिलेला आहे. हे बेसिक पेमेंट झालं, जे तिथल्या गव्हर्नमेंटनं ठरवून दिलं आहे. तिथले स्वत:च्या हाताने, ताकदीने काम करणारे प्लंबर, कारपेंटर, गार्डनर वगैरे. साधारण तासाला ४० डॉलर असे त्यांचं मानधन असतं! इथे मला अजिबात आॅस्ट्रेलियाचे गोडवे गायचे नाहीत की आपल्या देशाला नावेही ठेवायची नाहीत. पण नकळत तुलना होते. शाळेत असल्यापासून आपल्या प्रत्येकाला प्रतिज्ञा म्हणायला लावतात. ती इतकी वर्षे घोकल्याने का त्या भावना आपल्या हृदयापर्यंत उतरतात? तर नाही. पण देशाचा अभिमान वाटायला, सारे लोक माझे बांधव वाटायला मुळात आधी देशावर प्रेम असणे महत्त्वाचे असते आणि प्रेमही भावना लादून होत नाही, करू म्हणून होत नाही, ती खूप नैसर्गिक, स्वाभाविक भावना आहे. तिथली परिस्थिती पाहताना नकळत डोळ्यांसमोर माझ्याकडे काम करणाऱ्या अनेकांचे चेहरे तरळून गेले. केवढी तफावत आहे तिकडच्या आणि इकडच्या जीवन पद्धतीमध्ये !
दुसरी महत्त्वाची गोष्ट कामगारांसाठीचे कायदे, नियम, लेबर लाँ, सगळ्याच देशांमध्ये आहेत. ते आपल्याकडे किती प्रमाणात अंमलात आणले जातात? हेच कायदे तिथे काटेकोरपणे अंमलात आणले जातात. कामगारांचे पगार, सुट्ट्या, कामाचे तास अशा आणि इतर सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. पण हे असे कायदे आपल्याकडेही असणारच, ते पाळले जातात का? जर जातात, तर मग कामगार वर्ग अजूनही दारिद्र्यरेषेखालीच का दिसतो आपल्याला? का कुठल्याही प्रकारचे कायदे आणि नियम आपण भारतीय पाळत नाही? का सर्वांच्या हितासाठी बनवलेले कायदे, नियम हे मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी बदलले जातात? का आपले राज्यकर्ते, राजकारणी नियम आणि कायदे पाळले जात आहेत की नाही याकडे दुर्लक्ष करतात?
या सदरासाठी मे महिन्यात लिखाण करायचं ठरल्यावर पहिला रविवार १ मे आहे हे लक्षात आलं. तेंव्हा हे सगळं विचारचक्र सुरू झालं आणि मग तेच मांडायचं ठरवलं! जो पोटासाठी, उदरनिर्वाहासाठी काम करतो, कमावतो तो प्रत्येक जण कामगार असतो असं मी मानते. फक्त काहींना मनासारखं काम मिळतं, काहींना नाही. काहींना त्याची आवड आणि व्यवसाय एकच ठेवता येतो. म्हणजे माझ्यासारख्या कलाकाराचा अभिनय करणे ही आवड एकच. नाचणं व ते शिकवणं हे तर अलौकिक आनंद देणारं काम. रात्रंदिवस शूटिंग केल्यावर, काही दुखत असो, खुपत असो, आजारी असो, सणवार असो, कुठल्याही परिस्थितीमध्ये शूटिंग, प्रयोग करावेच लागतात. १२ ते १३ तास सतत शूट केल्यावर कधीतरी मी कंटाळून म्हणायचे, ‘अरे! मी कलाकार आहे रे, कामगार नाही! वेठबिगारच!! काम करणारे परवडले, त्यांच्याही कामाच्या वेळा ठरलेल्या असतात आणि काम झालं की लगेच मोबदला हातात पडतो. नाहीतर आम्ही तीन महिने वाट पाहतो चेकची!’ हा झाला गमतीचा भाग. पण खरंच त्यांच्या कामाची आणि आमच्या कामाची तुलनाच होऊ शकत नाही. ते प्रचंड शारीरिक कष्ट करतात आणि तुटपुंजा मोबदला त्यांना मिळतो. आम्ही मालिकेच्या, चित्रपटांच्या, नाटकाच्या माध्यमांतून रसिकांच्या मनात, घरात पोहोचतो. त्यांचं अनमोल प्रेम मिळवतो. यश, कीर्ती, पैसा हळूहळू का होईना पाठोपाठ येतं, एखादी पुरस्काराची बाहुली मिळाली की समाधान मिळतं. चांगल्या कलावंतांच्या अंत्ययात्रेला जनसमुदाय जमा होतो, त्यांच्या तसबिरी लागतात, तो त्यांच्या कामामुळे अनेकांच्या अनेक वर्षे स्मरणात राहतो, त्याचे दाखले दिले जातात, तो अनेकांसाठी आदर्श ठरतो.
हा! आता आमच्याही क्षेत्रात वाईट गोष्टी घडतात, पिळवणूक होते, नियम-कायदे असूनही पाळले जात नाहीत; पण तुलनेत पदरात जे पडतं ते मात्र नक्कीच त्रासदायक गोष्टींना बाजूला सारून नव्या उमेदीनं काम करायला शक्ती देणारं असतं. आम्हा अभिनय क्षेत्रातील कामगारांच्या आयुष्यात त्या परमेश्वराचे आभार मानायला हवेत, माझी आवड आणि माझं काम, व्यवसाय यांची सांगड घालता येईल असा कलाकाराचा जन्म दिलास!
(मे महिन्याच्या मानकरी असलेल्या लेखिका या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.)