देशात स्फोटके सहजपणे कशी उपलब्ध होऊ शकतात?

By विजय दर्डा | Published: August 16, 2020 07:28 PM2020-08-16T19:28:34+5:302020-08-17T16:01:31+5:30

बैरुतमधील स्फोटाने फार मोठ्या धोक्याची प्रकर्षाने झाली जाणीव

How can explosives be easily available in the country? | देशात स्फोटके सहजपणे कशी उपलब्ध होऊ शकतात?

देशात स्फोटके सहजपणे कशी उपलब्ध होऊ शकतात?

googlenewsNext
ठळक मुद्देबैरुत बंदरात गेली सहा वर्षे अयोग्य पद्धतीने साठवणूक केलेल्या २,७०० टन अमोनियम नायट्रेटच्या साठ्यामध्ये काही कारणाने ठिणगी पडून हा महाभयंकर विनाश झाला.

- विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

दोन आठवड्यांपूर्वी लेबेनॉनची राजधानी बैरुतमध्ये झालेल्या भीषण स्फोटांची बातमी आली तेव्हा हा दहशतवाद्यांनी केलेला घातपात असावा, असेच सर्वांना सुरुवातीस वाटले; परंतु नंतर असे स्पष्ट झाले की, बैरुत बंदरात गेली सहा वर्षे अयोग्य पद्धतीने साठवणूक केलेल्या २,७०० टन अमोनियम नायट्रेटच्या साठ्यामध्ये काही कारणाने ठिणगी पडून हा महाभयंकर विनाश झाला. त्या स्फोटाने संपूर्ण जग हादरून गेले. त्यात दीडशेहून अधिक लोक ठार झाले व चार हजारांहून अधिक गंभीर जखमी झाले. हजारो इमारती पूर्णपणे उद््ध्वस्त झाल्याने किंवा राहण्यायोग्य न राहिल्याने सुमारे दोन लाख लोक बेघर झाले. प्राणहानीखेरीज इतर नुकसान सुमारे १५ अब्ज डॉलरचे झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. बंदरामध्ये हे अमोनियम नायट्रेट अयोग्य पद्धतीने साठविले गेल्याने हा विनाश सोसावा लागला हे जेव्हा स्पष्ट झाले, तेव्हा लेबेनॉनचे नागरिक स्वाभाविकपणे संतापले. लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून लोकांनी हा संताप व्यक्त केला.

या दबावाने लेबेनॉनच्या संपूर्ण मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागला. जेथे अशाच प्रकारे अमोनियम नायट्रेटचे साठे कित्येक वर्षे पडून आहेत, अशा इतरही अनेक देशांची झोप बैरुतमधील या घटनेने उडाली. यात भारताचाही समावेश आहे. एका कंपनीने अयोग्य पद्धतीने आयात केलेले ७४० टन अमोनियम नायट्रेट कस्टम्स विभागाने सन २०१५ मध्ये जप्त केले व ते चेन्नई बंदरात तेव्हापासून पडून आहे. सरकारला जणू त्याचा विसर पडला. बंदरात ज्या ठिकाणी ते ठेवले आहे, तेथून ७०० मीटर अंतरावर सात हजार लोक राहत असलेली एक वस्ती आहे. बैरुतमध्ये स्फोट होताच व त्याचे कारण स्पष्ट होताच भारतात अधिकाऱ्यांना खडबडून जाग आली व त्यांनी चेन्नईतील २०० टन अमोनियम नायट्रेट तातडीने हैदराबादला हलविले. तेथे दुसºया एका कंपनीने ते खरेदी केले. खरा प्रश्न असा आहे की, जप्त केलेला हा एवढा घातक माल गेली पाच वर्षे कंटेनरमध्ये असुरक्षितपणे भरलेल्या अवस्थेत बंदरात का व कसा ठेवला गेला? बहुधा हा निष्काळजीपणा किती घातक ठरू शकतो याची अधिकाऱ्यांना कल्पना नसणे हेच याचे कारण असावे.



खरे तर अमोनियम नायट्रेट ही वस्तू स्फोटक नाही; पण त्यात आॅक्सिजनचे प्रमाण खूप असल्याने जेव्हा उघड्या आगीशी त्याचा संपर्क येतो, तेव्हा त्यातील आॅक्सिजन मुक्त होऊन आग आणखी भडकविण्यास ते मदत करते. या रासायनिक प्रक्रियेने प्रचंड स्फोट होतो. याची भीषणता किती असू शकतो हे बैरुतमध्ये दिसलेच आहे. अमोनियम नायट्रेट हे एक औद्योगिक वापराचे रसायन आहे. त्याच्यापासून रासायनिक खताचेही उत्पादन केले जाते. या दोन्ही वापरांसाठीच्या अमोनियम नायट्र्ेटची श्रेणी निरनिराळी असते. या वस्तूच्या साठवणुकीसाठी विस्फोटक नियमावलीनुसार अनेक कडक नियम केलेले आहेत. त्याची साठवणूक मोकळ्या आणि हवेशीर जागेत करण्याचे बंधन आहे. तसेच थेट सूर्यप्रकाश व पाण्याच्या संपर्कात ते येता कामा नये, अशी काळजीही घ्यावी लागते. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघानेही याचा समावेश धोकादायक वस्तूंमध्ये केला आहे. सरकारने नंतर जी धावपळ केली, त्यावरून चेन्नईत ते सुरक्षित ठेवलेले नव्हते, हेच स्पष्ट होते. आता त्याच्या सुरक्षेची व्यवस्था केली गेली व दरम्यानच्या काळात काही विपरीत घडले नाही, हे सुदैव म्हणायचे.

हा विषय फक्त चेन्नई बंदरातील अमोनियम नायट्र्ेटपुरता मर्यादित नाही. आपल्याकडे एकूणच असे विस्फोटक पदार्थ अत्यंत निष्काळजीपणाने का हाताळले जातात व ते बाजारात सहजपणे कसे उपलब्ध होऊ शकतात, हा खरा कळीचा मुद्दा आहे. सरकारने या दोन्ही बाबतीत गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. यातील निष्काळजीपणा एवढा सर्रास आहे की, फटाक्यांच्या कारखान्यात आग लागून लोकांचे मृत्यू झाले नाहीत, असे एकही वर्ष जात नाही. चेन्नईपासून जवळच शिवकाशी हे फटाका उद्योगाचे मुख्य केंद्र आहे. देशातील ९० टक्के फटाके तेथे तयार होतात. तेथील फटाके कारखान्यांमध्ये सात लाख लोक काम करतात. फटाक्यांमध्येही अन्य रसायनांसोबत अमोनियम नायट्रेट वापरले जाते. ही रसायने परवान्याशिवाय मिळत नाहीत; पण दुर्घटना घडली की असे समोर येते की, त्या कारखान्यात परवान्याशिवाय ही स्फोटके आणली, साठवली व वापरली जात होती. पंजाबमध्ये गुरदासपूर शहरात भर वस्तीत असलेल्या अशाच एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन व आग लागून २५ लोकांचा हकनाक बळी गेला होता. उत्तर प्रदेश, ओडिशा व खुद्द राजधानी दिल्लीतही अशा दुर्घटना घडल्या आहेत. हे सर्व विस्फोटकांच्या बाबतीत बेफिकिरपणा केल्यामुळेच घडू शकते.



या घातक वस्तू बाजारात सहजपणे उपलब्ध होण्याच्या बाबतीतही हेच दिसते. सुरुंग लावून दगड फोडण्यासाठी, जमिनीत मोठा खड्डा करण्यासाठी किंवा शहरांमध्ये बांधलेल्या बहुमजली बेकायदा इमारती सुरक्षितपणे पाडण्यासाठी जिलेटिन कांड्यांचा सर्रास वापर केला जातो. तुम्ही या जिलेटिनच्या कांड्या बाजारातून उघडपणे विकत घेऊ शकता. याच सहजपणे मिळणाºया जिलेटिनचा वापर दहशतवादी व नक्षलवादीही करतात. सन २०१७ मध्ये मध्य प्रदेशमधील पेटलावद येथे घडलेली घटना या संदर्भात नमूद करावी लागेल. तेथे वाळूच्या गोण्यांमध्ये भरून ठेवलेल्या जिलेटिन कांड्यांचा स्फोट हाऊन १०० हून अधिक व्यक्तींना प्राण गमवावे लागले होते. जिलेटिनचा वापर करून बॉम्ब अगदी सहजपणे बनविता येतो. केरळमध्ये शेतमळ्याचे नुकसान करणाºया हत्तींचा बंदोबस्त करण्याच्या नादात काही महिन्यांपूर्वी एका हत्तीणीला अननसातून विस्फोटक खायला घातले गेले व त्याने तिचा मृत्यू झाला होता. यावरून देशात ही विस्फोटके किती सहजपणे कोणालाही कशी उपलब्ध होऊ शकतात, हेच विदारक वास्तव स्पष्ट होते.

याच सहजपणे उपलब्ध होणाºया स्फोटकांचा वापर करून दहशतवादी व नक्षलवादी ‘इप्रोवाईज्ड एक्स्प्लोजिव डिवाइस’ (आयईडी) तयार करतात. अशा ‘आयर्ईडीं’च्या स्फोटांनी सशस्त्र सैन्यदले व पोलिसांचे शेकडो जवान आतापर्यंत मारले गेले आहेत. तरीही सरकार स्फोटकांची सहज उपलब्धता व त्यांचा अवैध वापर बंद करण्यासाठी काहीही खंबीर उपाय योजत नाही, हे पाहून आश्चर्य वाटते. स्फोटकांचा व्यापार कठोरपणे नियंत्रित केल्याशिवाय व त्याच्या वाहतूक , साठवणुकीची सुरक्षित व्यवस्था केल्याखेरीज आपण सुरक्षितपणे राहू शकणार नाही. म्हणूनच खूप सावधपणे वागणे गरजेचे आहे.

(vijaydarda@lokmat.com)

Web Title: How can explosives be easily available in the country?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.