हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली -
सध्याची राजकीय व्यवस्था अशीच चालू राहिली तर लवकरच अमित शाह हे देशाचे सर्वाधिक काळ गृहमंत्रिपदावर राहणारे मंत्री ठरतील. ३१ मे २०१९ रोजी त्यांनी गृहमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याला लवकरच सहा वर्षे पूर्ण होतील. यापूर्वी दोघे वगळता त्यांच्याइतके या पदावर एवढा काळ कोणी राहिलेले नाही. जुलै २०२५ मध्ये ते लालकृष्ण अडवाणी (सहा वर्षे ६४ दिवस) आणि गोविंद वल्लभ पंत (सहा वर्षे ५६ दिवस) या दोघांनाही मागे टाकतील. देशांतर्गत बाबींवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणारे मंत्री म्हणून शाह यांची कारकीर्द ओळखली जाईल. त्यांचे पूर्वसुरी विदेश दौरे करत. शाह यांनी मात्र एकही अधिकृत विदेश दौरा केलेला नाही. त्यांनी संघटनात्मक धोरण आणि देशांतर्गत कारभारावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले. सरकारमध्ये स्वतःच्या मंत्रालयापलीकडे शाह यांचा प्रभाव जाणवतो. भाजपचे मुख्य संकटमोचक आणि मुख्य डावपेचकार म्हणून ते प्रामुख्याने ओळखले जातात. ‘शब्दाला वजन असलेला नेता’ असे त्यांचे वर्णन दिल्लीतील राजनीतिज्ञ मंडळींच्या वर्तुळात केले जाते. ते कायमच पंतप्रधानांचे उजवे हात राहिले आहेत. दिलेले वचन स्मरण देण्याची वेळ न येऊ देता पाळण्याबाबत शाह यांची ख्याती आहे.
बहुतेक अंतर्गत सुरक्षा मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिस यंत्रणा तसेच सीमावर्ती भागातील व्यवस्थेत सुधारणा घडवून आणल्या. अर्थात, त्यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणे, दीर्घकाळ चाललेल्या वांशिक हिंसाचारानंतर ईशान्येत विश्वासाचे वातावरण निर्माण करणे, जातीय तणावाची हाताळणी, राजकीय ध्रुवीकरण वाढत असताना कायद्याची समतोल अंमलबजावणी ही त्यातली काही महत्त्वाची आव्हाने. नागरिकत्व सुधारणा कायदा संवेदनशीलतेने हाताळावा लागणार आहे. विशेषत: आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये अधिक काळजी घ्यावी लागेल. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, अमली पदार्थांची वाहतूक रोखणे आवश्यक आहे. पंजाब, ईशान्य भारताच्या सीमेवरून हा उपद्रव होत असतो. सर्व राज्यांमध्ये पोलिस दलात सुधारणा करणे हेही एक काम आहे. ऐतिहासिक विक्रमाकडे वाटचाल करत असताना, येणाऱ्या काळात त्यांनी आतापर्यंत काय केले यावरच मूल्यमापन होणार नसून तर वेगाने बदलणाऱ्या भारतात दीर्घकाळ टिकेल असे अंतर्गत स्थैर्य आणण्यामध्येही अमित शाह यांच्या क्षमतांची कसोटी लागणार आहे.
शांततावादी, डील-मेकर की जोकर? डोनाल्ड ट्रम्प यांची शैली उटपटांग म्हणता येईल अशीच आहे. आपली चूक ते कधीच मानत नाहीत. अनेकजण त्यांचे वर्णन ‘राजकीय शोमन’ असे करतात; परंतु प्रस्थापित गोष्टींना धुडकावण्याची हिंमत दाखवणारे म्हणून त्यांची प्रशंसाही होते. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून पहिल्या वेळी त्यांनी भारत-अमेरिका संबंध सुधारले. ‘हाऊडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’ या दोन घटनांनी उभय देशातील भागिदारी झळकवली. चीनविषयी त्यांची कठोर भूमिका भारताला वाटणाऱ्या चिंतेत सूर मिसळून गेली. संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवले. या सगळ्या गोष्टींचे नवी दिल्लीने स्वागत केले.
दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून अवघ्या काही महिन्यांतच ट्रम्प यांचा दुसरा चेहरा भारताला दिसतो आहे. चिनी वस्तूंवर त्यांनी पुन्हा आयात शुल्क लादले. महत्त्वाचा भागीदार म्हणून भारताबरोबर गुप्तचर माहितीची देवघेव करण्याचेही ठरले; तरी कोठे ना कोठे कटकटी आहेतच. एच वन बी व्हिसाच्या बाबतीत ट्रम्प यांनी बंधने लावली. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या धोरणाचा फेरविचार सुरू केला. हजारो भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार आहे. उदारमतवादी संस्थांवर त्यांचे हल्ले सुरू राहणे, भारतासह इतर लोकशाही देशातल्या माध्यमांमध्ये उमटणाऱ्या पडसादांवर नाखुशी दर्शविणे यातूनही चिंता निर्माण झाली आहे.
भारतीयांच्या नजरेत ट्रम्प यांचे ‘दोन चेहरे’ आहेत. काहींना ते धोरणात्मक संबंधातील हिस्सेदार, डील मेकर वाटतात; तर काहींना ट्रम्प हे सामाजिक मूल्यांच्या पडझडीची अजिबात पर्वा न करणारे ‘विध्वंसक नेते’ वाटतात. त्यांचा टोकाचा राष्ट्रवाद, चोख व्यापारात असावी तशा देवे-घेवीवर आधारलेले राजकारण यामुळे भारतासारख्या देशांवर ट्रम्प यांच्याबरोबरच्या संधीही ‘संकट’ तर नाहीत ना, हे नीट पारखून घेण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर प्रेम करा किंवा त्यांचा राग करा; ट्रम्प यांनी जगभरातल्या देशांना अमेरिकन सत्तेशी असलेले नाते पुन्हा तपासून पाहणे भाग पाडले आहे. ते बंदूक हातात धरत असतील किंवा भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाच्या बाबतीत त्यांनी जे केले तसे तोंड चालवत असतील; त्यांचा भारत-अमेरिका संबंधांवर आणि राजकीय जागतिक राजकारणावरील ठसा नाकारणे अशक्य आहे. अगदी अलीकडे व्हाइट हाऊसचा एक प्रवक्ता ट्रम्प यांचे वर्णन करताना म्हणाला, ‘ते शांततावादी आहेत. शांततेचे मूल्य जाणतात. ते ‘डील मेकर’ही आहेत. त्यांच्याकडे जोकर म्हणून पाहायचे की साहाय्यकारी म्हणून ते तुमचे तुम्ही ठरवा.’