इतिहासाचा फार्स
By Admin | Updated: September 21, 2015 22:49 IST2015-09-21T22:49:58+5:302015-09-21T22:49:58+5:30
इतिहासापासून धडा घ्यायचा असतो. पण इतिहासातील घटनांच्या आधारे सद्यकालीन राजकारण करण्याचा प्रयत्न झाल्यास कसा फार्स होतो

इतिहासाचा फार्स
इतिहासापासून धडा घ्यायचा असतो. पण इतिहासातील घटनांच्या आधारे सद्यकालीन राजकारण करण्याचा प्रयत्न झाल्यास कसा फार्स होतो, त्याचे बोलके उदाहरण म्हणजे नेताजीविषयक दस्तावेजांवरुन खेळला जात असलेला वाद. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘काँगे्रसमुक्त भारत’ अशी घोषणा मोदी व भाजपा यांनी दिली होती. पुढे केंद्रात मोदी सरकार स्वबळावर सत्तेत आल्यापासून या दिशेने वाटचाल करण्यासाठी पावले टाकली जाऊ लागली. या ‘काँगे्रसमुक्त भारता’चे उद्दिष्ट गाठण्यासाठीच्या वाटचालीतील महत्वाचा टप्पा म्हणजे ‘नेहरूंच्या कारकिर्दी’त किती व कसे घोटाळे झाले, किती व कोणत्या नेत्यांना हेतूत: सत्तेपासून दूर ठेवले गेले’ यावर भर देत राहणे. त्या दृष्टीने पद्धतशीररीत्या तपशीलाची मोडतोड करून आणि पक्षपाती विश्लेषण करून प्रसार माध्यमांतर्फे अर्धसत्य पसरवण्याची मोहीमच हाती घेतली गेली. त्याचाच एक भाग म्हणून नेताजींच्या हाती देशाचे नेतृत्व जाऊ नये, यासाठी नेहरू कसे प्रयत्नशील होते आणि म्हणून नेताजीविषयक कागदपत्रे खुली केली जात नव्हती; कारण तसे केल्यास सत्य बाहेर येईल, असा दावा करण्यात आला. तथाकथित तज्ज्ञ व संशोधक उभे करण्यात आले. त्यांनी केलेल्या ‘संशोधना’चा निष्कर्ष म्हणून नेताजी विमान अपघातात मृत्युमुखी पडले नाहीत, येथपासून ते भारतात कसे ‘गुमनामी बाबा’ म्हणून आले, येथपर्यंत ‘संशोधनानंतरचा तपशील’ म्हणून प्रसिद्ध केला जात आहे. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीला जाण्याच्या सुमारास हा वाद अचानक उफाळून आला. मग मोदी जर्मनीला गेले, तेव्हा नेताजींचे काही नातेवाईक त्यांना तेथे भेटले. मोदी भारतात परत आल्यावरही काही नातेवाईक त्यांना भेटून गेले. पुढे हा वाद थंडावला. आता पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या ताब्यात असलेले नेताजीविषयक दस्तावेज जाहीर केल्याने या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत. बंगाली जनमानसात नेताजींचे एक स्थान आहे. त्याचा फायदा उठवण्यासाठी आणि ‘आम्ही दस्तावेज खुले केले, आता तुत्ही करा’, असे केंद्रातील मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी ममता बँनर्जी यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र इतका गाजावाजा करून जे दस्तावेज खुले केले गेले, त्यातून फक्त राज्यातील काँगे्रस सरकारने नेताजींच्या नातेवाईकांवर पाळत ठेवली होती, यापलीकडे काहीच ठोस हाती लागलेले नाही. या ‘पाळत ठेवण्याच्या’ प्रकारावरूनही हेतूत: गैरसमज पसवरले जात आहेत. नेताजींचे पुतणे व इतर काही नातेवाईक ‘सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी’ या संघटनेचे सदस्य होते आणि ही संघटना भारत व पाक या दोन्ही देशात एकाच वेळी उठाव करण्याचा बेत आखत होती, असा उल्लेख असलेला एक गुप्तहेर अहवाल या दस्तावेजात आहे. दुसरे म्हणजे नेताजींनीच ‘फॉरवर्ड ब्लॉक’ हा राजकीय पक्ष काढला होता. हा पक्ष डाव्या आघाडीचा घटक पक्ष म्हणून सत्तेतही आला होता. आपल्या विरोधकांवर वा देशात सशस्त्र उठाव करणाऱ्यांवर पाळत ठेवण्याचे काम सगळीच सरकारे करतात. मग ती कोणत्याही देशातील असोत. राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणे हे पोलीस दलातील स्थानिक गुप्तहेर शाखेचे कामच असते. या शाखेचे अधिकारी व कर्मचारी त्या आधारे अहवालही सादर करीत असतात व ते सर्व सरकारी दप्तरात जमा होतात. १९९१मध्ये चंद्रशेखर यांचे सरकार पाडताना, राजीव गांधी यांच्या घरावर हरयाणा पोलिसांची पाळत असल्याचे निमित्त काँगे्रसने शोधले होतेच की! अलीकडच्या काळात नितीन गडकरी यांच्या घरात चोरून संभाषण ऐकण्याची उपकरणे सापडल्याचे प्रकरणही गाजले होते. अगदी चाणक्याच्या काळापासून राज्यसंस्था कशी चालवावी, याचे जे धडे ‘अर्थशास्त्रात’ आहेत, त्यातही विरोधकांवर पाळत कशी ठेवावी, याचे उल्लेख आहेत. तात्पर्य पाळत ठेवणे हा जणू काही देशद्रोहच आहे, असा जो आभास निर्माण केला जात आहे, त्यामागे निव्वळ नेहरूंना बदनाम करण्याचा उद्देश आहे. खरे तर नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाला नसेल, तर त्यांनी आपली पत्नी एमिली शॅन्केल यांच्याशी निश्चितच संपर्क साधला असता. पण ममता बॅनर्जी यांनी खुल्या केलेल्या दस्तावेजात एमिली शॅन्केल यांचेही एक पत्र आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘जर नेताजी हयात असते, तर माझ्याएवढा कोणालाच आनंद झाला नसता. पण नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे, हे कटू वास्तव मी स्वीकारले आहे’. जेथे खुद्द नेताजींच्या पत्नीच असे म्हणत आहेत, तेथे इतर कोण काय बोलते वा लिहिते, याला किती महत्व द्यायचे? तरीही एमिली शॅन्केल यांच्या पत्रातील या आशयाचा फारसा उल्लेख न करता इतर कोणी नेताजींच्या मृत्यूविषयी कसा संशय व्यक्त केला, त्यासंबंधीचे दस्तावेज कसे खुले झाले आहेत, याचीच चर्चा प्रसार माध्यमातून केली जात आहे. नेमक्या याच वास्तवावर ‘नेहरू अॅॅन्ड बोस:पॅरलल लाईव्ह्ज’ या पुस्तकाचे लेखक आणि सुप्रसिद्ध इतिहासकार रूद्रांक्षू मुखर्जी यांनी बोट ठेवले आहे. अर्थात ज्यांना हा वाद खेळायचा आहे, त्यांना ऐतिहासिक विवेक पाळायचाच नाही. त्यांना इतिहासाचा फार्स बनवून आपले राजकीय उद्दिष्ट साधायचे आहे. त्यामुळेच हा वाद खेळला जात आहे.