उच्च नैतिकतेचे आव्हान!

By Admin | Updated: December 22, 2015 02:16 IST2015-12-22T02:16:48+5:302015-12-22T02:16:48+5:30

सार्वजनिक जीवनात उच्च नैतिकतेचे पालन केवळ आमचाच पक्ष करतो हा भाजपाचा प्रथमपासूनचा लाडका दावा आहे. त्यासाठी हमखास उदाहरण दिले जाते

High ethical challenge! | उच्च नैतिकतेचे आव्हान!

उच्च नैतिकतेचे आव्हान!

सार्वजनिक जीवनात उच्च नैतिकतेचे पालन केवळ आमचाच पक्ष करतो हा भाजपाचा प्रथमपासूनचा लाडका दावा आहे. त्यासाठी हमखास उदाहरण दिले जाते ते लालकृष्ण अडवाणी यांचे. त्यांच्यावर हवाला प्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांनी उच्च नैतिकतेचे दर्शन घडविताना लगेचच संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि चौकशीअंती आरोपाचे किटाळ हटले तेव्हांच पुन्हा विधिवत निवडून येऊन संसदेत पाऊल टाकले असे गौरवाने सांगितले जाते. त्यांच्या या उच्चतम नैतिकतेचे पक्षाने त्यांना कोणते आणि काय पारितोषिक दिले हे आज जगासमोर आहेच. अडवाणी यांच्यानंतर पुढे अशी नैतिकता दाखविण्याची संधीच बहुधा कुणाला मिळाली नसावी किंवा संधी मिळूनही कुणी तसे धाडस केले नसावे. पण दीर्घ काळानंतर आता तशी संधी चालून आली आहे. केन्द्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे तसेही अत्यंत धाडसी मंत्री म्हणून ओळखले जातात. परिणामी आलेली संधी साधून आणि आपल्या धाडसाचे दर्शन घडवीत जेटली आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतात का आणि उच्च नैतिकतेच्या दर्शनाचे आव्हान स्वीकारुन नवा मापदंड रुजू करतात हाच आता देशवासियांच्या दृष्टीने मोठ्या औत्सुक्याचा प्रश्न आहे. सुमारे दोन वर्षापूर्वीपर्यंत जेटली दिल्ली क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) प्रदीर्घकाळ अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सदर संघटनेने राजधानीतील फिरोजशाह कोटला मैदानाच्या नूतनीकरणाचे जे काम हाती घेतले, त्या कामात काही कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सध्या दिल्ली शहरावर ज्या पक्षाचा झेंडा आहे त्या आम आदमी पार्टीने गेल्याच सप्ताहात केला होता. हा आरोप होण्याच्या आदल्या दिवशी सीबीआयने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयावर धाड टाकून काही कागदपत्रे जप्त केली होती आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव राजेन्द्रकुमार यांची सलग चौकशी केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जेटलींवर आरोप करताना म्हटले होते की आपला भ्रष्टाचार उघड करणारी कागदपत्रे हस्तगत करण्यासाठी जेटलींच्या सांगण्यावरुनच ही धाड टाकली गेली होती. केजरीवाल यांनी केलेला आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे भाजपातर्फे सांगितले जात असतानाच खुद्द भाजपाचेच एक खासदार आणि माजी क्रिकेट खेळाडू कीर्ती आझाद यांनी खास पत्रकार परिषद आयोजित करुन जेटलींच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत डीडीसीएमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा पाढा ‘विकीलिक्स’चा आधार घेऊन वाचला. त्यांनी हा पाढा वाचताना भले जेटली यांचा स्पष्ट नामोल्लेख केला नसला तरी त्यांनी जेटलींच्याच दिशेने अंगुलीनिर्देश केला हे उघड आहे. आझाद यांच्या पत्रकार परिषदेनंतर साहजिकच ‘आप’ आणि काँग्रेस पक्षाने जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीचे स्वर अंतराळात कायम असतानाच काही क्रिकेट खेळाडूंनी समोर येऊन जेटलींना स्वच्छतेचे प्रमाणपत्रही बहाल केले. सार्वजनिक संस्थांमध्ये आर्थिक अपहाराची जी एक विशिष्ट कार्यप्रणाली सर्वत्र आढळून येते तीच दिल्ली क्रिकेट संघटनेतही आढळून येत असल्याचे आझाद यांनी जाहीर केलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते. आता हा अपहार नेमका जेटलींनी केला की आणखी कोणी याचा उलगडा केजरीवाल यांनी ताबडतोबीने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाचा अहवाल जाहीर होईल तेव्हांच होऊ शकेल. पण कोणत्याही संघटनेचा वा संस्थेचा अध्यक्ष ज्या न्यायाने चांगल्या कामाच्या श्रेयाचा धनी होत असतो त्याच न्यायाने कुकर्मांची नैतिक जबाबदारीही त्याला स्वीकारावीच लागते. कार्यबाहुल्यामुळे जेटलींना डीडीसीएच्या दैनंदिन कामकाजात लक्ष घालायला वेळच मिळत नव्हता असे सांगून हात झटकता येणार नाहीत. जर वेळ मिळत नव्हता तर त्यांनी पद स्वत:पाशी ठेवण्याचे कारण नव्हते. पण देशातील बहुतेक सत्ताकारण्यांना क्रिकेट किंवा तत्सम क्रीडा संघटना आपल्या दिमतीला हवीशा वाटत असतात आणि अशा संघटनांनादेखील राजकारण्यांविषयी ओढ वाटत असते. ज्या न्यायाने सोनिया आणि राहूल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी न्यायालयात स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करण्याची संधी प्राप्त असल्याचे जेटली आणि प्रभृती सांगत असतात त्याच न्यायाने तशी संधी जेटली यांनादेखील उपलब्ध होणारच आहे. केजरीवाल यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दिवाणी आणि फौजदारी खटला दाखल करण्याने किंवा व्यंकय्या नायडू यांनी कीर्ती आझाद यांच्याविरुद्ध पक्षशिस्तीच्या भंगाची कारवाई करण्याने मूळ मुद्याची उकल होऊ शकणार नाही. त्यासाठी नैतिकतेचा स्वीकार करुन जेटलींनी पदमुक्त होणे आणि निष्पक्षपाती चौकशीची वाट प्रशस्त करुन देणे हाच योग्य पर्याय ठरु शकतो. आझाद यांनी जसे जेटलींचे थेट नाव घेतले नाही तद्वतच आझाद यांचेही थेट नाव न घेता जेटली असे काही म्हणाले की, भाजपाचा एक खासदार मध्यंतरी काँग्रेसच्या लोकाना भेटला आणि त्याने डीडीसीए संबंधित कागदपत्रे गोळा केली. याचा अर्थ भाजपाच्या आझाद यांनी त्यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यावर काँग्रेसकडून फूस घेऊन आरोप केले. असेच त्रैराशिक मांडायचे ठरविल्यास आझाद आपल्या पत्रकार परिषदेत पुन:पुन्हा मोदींविषयी त्यांच्या मनातील जो आदरभाव व्यक्त करीत होते. त्याची संगती कशी लावायची?

Web Title: High ethical challenge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.