शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

सरकारी कर्मचाऱ्यांनी हक्कांसाठी अवश्य लढा द्यावा; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 09:54 IST

हंगामाच्या शेवटी अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिपाची पिके हातची गेल्यामुळे रब्बी हंगामापासून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या; पण...

राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा, जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठीचा संप अखेर मागे घेण्यात आला आणि सरकारसोबतच सर्वसामान्य नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. सुमारे एक आठवडा राज्यातील सरकारी कामकाज जवळपास ठप्प झाले होते. त्याच काळात राज्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले. हंगामाच्या शेवटी अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिपाची पिके हातची गेल्यामुळे रब्बी हंगामापासून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या; पण दैवदुर्विलास असा, की पिके ऐन काढणीला आली असतानाच पुन्हा एकदा अस्मानी आसूड कडाडला अन् हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा एकमेव आधार म्हणजे शासकीय मदत आणि पीकविमा! त्यासाठी नुकसानाचे पंचनामे तातडीने होणे गरजेचे असते; परंतु नेमक्या त्याचवेळी संपूर्ण महसूल यंत्रणा संपामुळे ठप्प झाली होती. अशाप्रसंगी शेतकऱ्यांच्या जिवाची कशी घालमेल होते, हे जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे! संपामुळे आरोग्य यंत्रणा ठप्प झाल्याने हजारो रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कसे हाल झाले, याच्याही सचित्र कहाण्या प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांमधून झळकल्या. मार्चअखेर तोंडावर येऊन ठेपल्याने सर्वच खात्यांना विकासनिधी खर्च करण्याची लगीनघाई होती; पण संपामुळे राज्यभरात विकासकामेही ठप्प झाली.

एकूण काय तर राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या दोन टक्क्यांपेक्षाही कमी असलेल्या संघटित वर्गाने तब्बल आठवडाभर संपूर्ण राज्य हवालदिल करून सोडले आणि ते करून मिळवले काय, तर कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक असून, त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून लवकरात लवकर अहवाल प्राप्त करून घेऊन त्यावर उचित निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निवेदन! त्यामध्ये नवे काहीही नाही. संप सुरू होण्यापूर्वीही सरकारने अशीच भूमिका घेतली होती आणि तेव्हा कर्मचारी संघटनांनी ती सपशेल फेटाळून लावली होती. मग ऐन मार्चअखेर व परीक्षांची धामधूम सुरू असताना, हवामान खात्याने अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला असताना, संपाच्या भूमिकेवर ठाम राहून कर्मचाऱ्यांनी मिळवले तरी काय? जर समितीचा अहवाल येईपर्यंत प्रतीक्षाच करायची आहे, तर ती संप न पुकारताही करता आली असती की! त्यासाठी संपूर्ण राज्याला वेठीस धरण्याची काय गरज होती? मुळात तर्कसंगत विचार केल्यास कर्मचाऱ्यांची जुन्या निवृत्तीवेतन योजनेची मागणी वाजवी ठरवता येईल का?

महाराष्ट्रात २००५ मध्ये नवी निवृत्तीवेतन योजना लागू झाली. जे कर्मचारी नवी योजना लागू झाल्यानंतर रुजू झाले, त्यांना नियुक्तीच्या वेळी नव्या योजनेनुसार निवृत्ती वेतनाचे लाभ मिळणार असल्याचे ज्ञात होते आणि त्यानंतरही त्यांनी नोकरी स्वीकारली होती. मग आता जुन्या योजनेनुसार लाभ हवेत, अशी मागणी करणे कितपत न्यायोचित आहे? दुसरी गोष्ट म्हणजे स्वत:च्या थाळीत आणखी ओढून घेण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, संख्येने आपल्यापेक्षा कितीतरी पट मोठ्या असलेल्या अनेक घटकांच्या थाळीत काय आहे, हेदेखील डोकावून बघायला हवे. अनेकांची थाळी तर रिकामीच आहे! राज्यातील शेतकरी, शेतमजुरांची काय अवस्था आहे, हे शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना ठाऊक नाही का? त्यांना वृद्धत्व ग्रासत नाही? त्यांना नको निवृत्तीवेतन? खासगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना किती तुटपुंजे निवृत्तिवेतन मिळते! त्यांनी कसे जगावे निवृत्तीनंतर?  

आयुष्यभर धोके पत्करून व्यवसाय करीत शासनाच्या तिजोरीत करांच्या रूपाने भर घालणाऱ्या व्यापारी-उद्योजकांना नको निवृत्तीवेतन? शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे लाभ, सुविधा मिळायलाच हव्यात; पण त्यासाठी संपाचे हत्यार उपसून राज्याला वेठीस धरणे हाच एकमेव मार्ग आहे का? राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत आठवड्यात विधानपरिषदेत या विषयावर बोलताना, राज्याचा वेतन, निवृत्तीवेतन आणि कर्जांवरील व्याजावर होणारा अत्यावश्यक खर्च एकूण महसुली उत्पन्नाच्या ५६ टक्क्यांच्या घरात पोहचला असून, जुनी निवृत्तीवेतन योजना लागू केल्यास तो ८३ टक्क्यांच्या घरात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली. मग विकासकामे कशी करायची? फडणवीस यांनी त्यावर चर्चा करण्यासाठीच कर्मचाऱ्यांना निमंत्रण दिले होते. दुर्दैवाने त्यावेळी कर्मचाऱ्यांनी ते धुडकावले होते. सरकारी कर्मचाऱ्यांनी हक्कांसाठी अवश्य लढा द्यावा; पण ते करताना राज्य कोलमडणार नाही, याचीही काळजी घ्यावी!

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संप