स्वातंत्र्य मिळाले, त्याचे सुराज्य करण्याची जबाबदारी आपली !

By राजू इनामदार | Published: August 31, 2022 06:16 AM2022-08-31T06:16:15+5:302022-08-31T06:17:17+5:30

Baba Adhav: १४ ऑगस्ट १९४७. पहिल्या स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या. १५० वर्षांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त होणार. मी त्यावेळी मॅट्रिकला, म्हणजे आताच्या अकरावीत होतो.

Got freedom, it's our responsibility to rule it! | स्वातंत्र्य मिळाले, त्याचे सुराज्य करण्याची जबाबदारी आपली !

स्वातंत्र्य मिळाले, त्याचे सुराज्य करण्याची जबाबदारी आपली !

Next

- डॉ. बाबा आढाव
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
१४ ऑगस्ट १९४७. पहिल्या स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या. १५० वर्षांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त होणार. मी त्यावेळी मॅट्रिकला, म्हणजे आताच्या अकरावीत होतो. राष्ट्र सेवा दलाचे काम करायचो. तिथेच समजले की १४ ऑगस्टला पुण्यातून भव्य मिरवणूक निघणार. मध्यरात्री १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावरील इंग्रजांचा युनियन जॅक खाली खेचणार व तिथे भारताचा तिरंगा फडकवणार. मंडईतून लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय असा मिरवणुकीचा मार्गही ठरला होता.

आम्हा मुलांना उत्सुकता होती ती युनियन जॅक खाली कसा येतो व तिरंगा वर कसा जातो, ते पाहण्याची. सुदैवाने मिरवणुकीची सर्व व्यवस्था पाहण्याची, म्हणजे त्यात शिस्त ठेवणे वगैरे जबाबदारी नेते मंडळींनी राष्ट्र सेवा दलावर सोपवली. सेवा दलातील कार्यक्रम, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे व यासारख्या नेत्यांची व्याख्याने, चर्चा, सेवा दल सैनिकांना ते देत असलेले धडे यातून मला स्वातंत्र्य चळवळ, देशातील तिचे परिणाम याची बरीच माहिती झाली होती. त्यामुळे १४ ऑगस्टचा प्रसंग ऐतिहासिक असणार हे मला लक्षात आले. आपण त्याचे साक्षीदार व्हायचे, हे मी मनोमन ठरवले.

सायंकाळी टिळक पुतळ्यापासून मिरवणूक सुरू झाली. पुण्यातील सर्व प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक जात होती. खादीचे कपडे घातलेले लोक शिस्तबद्धतेने मिरवणुकीत चालत होते. ‘भारत माता की जय’च्या घोषणा सगळीकडे दुमदुमत होत्या. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, काकासाहेब गाडगीळ असे पुण्यातील देशस्तरावरचे अनेक नेते मिरवणुकीत असल्याचे मला आठवते. रात्री १२ वाजता मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. तिथे पाहिले तर युनियन जॅक आधीच काढून घेतला होता. त्यामुळे आम्हाला फक्त तिरंगा वर जाताना व नंतर फडकताना दिसला; पण त्यात आनंद होता. दुसऱ्या दिवशीही म्हणजे १५ ऑगस्टलाही पुण्यात सगळीकडे दिवसभर जल्लोष होता. लोक एकमेकांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देत होते. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात जल्लोष होता. गोडधोड वाटले जात होते. स्वातंत्र्याचा जयघोष होत होता. लोक घोळक्याने फिरून स्वातंत्र्य चळवळीची चर्चा करताना दिसत होते.

त्याकाळात राष्ट्र सेवा दलाने दिलेली शिकवण, पहिल्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष मला आजपर्यंत प्रेरणा देत राहिला आहे. स्वातंत्र्य मिळवल्यावर माझे शिक्षण वगैरे झाले. डॉक्टर झालो. काही वर्षे राजकारणातही काढली. नगरसेवक झालो. गरिबांसाठी, समाजातील दीनदलित दुबळ्यांसाठी काम करायचे हे मी ठरवूनच टाकले होते. राजकारण त्याच्या आड येते म्हणून मी नंतर ते सोडूनच दिले. राजकारणातून बाहेर पडलो.
स्वातंत्र्य मिळाले, आता त्याचे सुराज्य करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे मी समजतो. माझे नंतरचे सगळे सार्वजनिक जीवन मी त्यासाठीच व्यतीत केले. तेच आपले ध्येय ठरवले. ‘एक गाव एक पाणवठा’सारखी चळवळ असेल किंवा ‘हमाल पंचायत’, कचरा वेचकांसाठीचे काम असेल हे सगळे त्या प्रेरणेतूनच आले आहे. हमालांसाठी अनेक कायदे करून घेणे त्या चळवळीमुळेच शक्य झाले.

या सर्व चळवळींमध्ये अनेकांची साथ मिळाली. त्यांचे सहकार्य विसरता येणार नाही. माणसाला माणसाप्रती सहानुभूती हवी. प्रेम हवे. तेच नसेल तर मग माणूस म्हणवून घेण्यात काय अर्थ, असे मला वाटते. आज वयाच्या ९२ व्या वर्षीही मी गाव तिथे घटनामंदिर सुरू करण्याचा निर्धार केला आहे. हे मंदिर असे असेल की तिथे प्रवेश करण्यासाठी कोणालाही मज्जाव नसेल. गावातील कोणीही तिथे जाऊन घटनेचा अभ्यास करू शकेल. त्यात काय म्हटले आहे ते पाहू शकेल. प्रत्येक गावात असे एकतरी मंदिर असावेच, असा माझा प्रयत्न आहे. आमच्या कष्टकऱ्यांच्या शाळेपासून मी याची सुरुवात केली आहे.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी काय वाटते, याबद्दल काय सांगू? इंग्रजांबरोबर नाही तितके स्वकियांबरोबरच लढावे लागते आहे. किमान नीट राहता येईल, हा इथल्या प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. सरकारांनी त्यासाठी काम करण्याची गरज आहे. इथे दुसरेच दिसते आहे. कोट्यवधीची संपत्ती साठवून राजकारणी, सरकारी अधिकारी करणार तरी काय? भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. तशी ती होताना दिसत नाही. न्याय लवकर मिळत नाही. खटले प्रलंबित राहतात. सरकारी यंत्रणा निगरगट्ट झाल्या आहेत. सरकारकडून अपेक्षा बाळगावी तर आता सरकारच अशा मार्गाने तयार होत आहे की त्याची चीड यावी; पण हरकत नाही. कारण आपण स्वतंत्र आहोत, हेच भाग्याचे आहे. आम्ही लढायला घाबरत नाही. गरिबांना न्याय मिळण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढतच राहणार आहे.
शब्दांकन : राजू इनामदार, 
उपमुख्य बातमीदार, लोकमत, पुणे
    (लेखमाला समाप्त)

Web Title: Got freedom, it's our responsibility to rule it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.