भविष्याला गवसणी घालायला सज्ज व्हा!
By Admin | Updated: April 13, 2015 03:21 IST2015-04-13T03:21:24+5:302015-04-13T03:21:24+5:30
भविष्यातील घटनांबद्दल केली गेलेली काही भाकिते आपल्या आयुष्यातच खरी ठरणे हे आपल्याला नेहमीच विस्मयकारी वाटते. यादृष्टीने टॉफलर्स-अल्विन आणि हेईदी या

भविष्याला गवसणी घालायला सज्ज व्हा!
विजय दर्डा
(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)
भविष्यातील घटनांबद्दल केली गेलेली काही भाकिते आपल्या आयुष्यातच खरी ठरणे हे आपल्याला नेहमीच विस्मयकारी वाटते. यादृष्टीने टॉफलर्स-अल्विन आणि हेईदी या अमेरिकी दाम्पत्याने केलेली भाकिते लक्षणीय म्हणावी लागतील. या दाम्पत्याने १९७० पासून लिहिलेल्या ‘फ्युचर शॉक’, ‘थर्ड वेव्ह’, ‘वॉर अॅण्ड अँटी -वॉर’ इत्यादी पुस्तकांनी खपांचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले. आपण सर्वजण गेले जेमतेम एक दशक संगणक तंत्रज्ञानाची महती अनुभवत आहोत. पण अल्विन-टॉफलर्स यांनी १९९४ मध्येच लिहून ठेवले होते: ‘‘यापुढे युद्धे केवळ शस्त्रसाधनांनी नव्हे तर इलेक्ट्रॉनिक दहशतवादाने लढली जातील. अमेरिकी गुप्तहेर संस्थेसाठी काम करणारा एक अधिकारी आमच्या परिचयाचा आहे. त्याचे कृत्रिम प्रज्ञा (आर्टिर्फिशियल इन्टेलिजन्स) विकसित करण्यावर आणि संगणकांवर संशोधन सुरू आहे. मला फक्त १० माणसे व (अगदीच नगण्य) १० लाख डॉलर दिलेत तर मी अमेरिकेचा चक्का जाम करून दाखवू शकेन, असे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. यासाठी काय करायचे हेही तो जाणतो. काही मोक्याच्या कळी फिरविल्या की प्रत्येक संगणक बंद होईल. बँकिंग व्यवस्था, एटीएम यंत्रे, इस्पितळे व वाहतूक व्यवस्था ठप्प होईल. यासाठी फक्त एका ‘सुपरहॅकर’ची गरज आहे. मग हा ‘हॅकर’ तेहरानसाठी काम करणारा असू शकेल किंवा झिरिनोव्हस्कीसाठी. अल्विन-टॉफलर्स ज्या ‘सुपरहॅकिंग’ विषयी म्हणत होते ते प्रत्यक्षात झालेही नसेल. पण त्यांच्या या भाकितानंतर सात वर्षांनी २००१ मध्ये केवळ १९ व्यक्तींनी तंत्रज्ञानाचा वापर करून केलेला न भूतो असा विध्वंस आपण जरूर पाहिला. दहशतवादाचे हत्त्यार म्हणून इंधनाने पूर्ण भरलेले विमान न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ‘टिष्ट्वन टॉवर’वर मुद्दाम आदळविण्यात आले. ३५०० हून अधिक निरपराधांचे बळी घेणाऱ्या त्या दहशतवादी घटनेनंतर जणू संपूर्ण जगच बदलून गेले. त्यानंतर युद्ध म्हणजे जुन्या पद्धतीची लढाई राहिली नाही.
आता त्याच सुमारास भाषा आणि संदेशवहनाच्या संदर्भात टॉफलर्स यांनी काय म्हटले होते ते पाहा: ‘‘तुम्ही ‘थर्ड वेव्ह’ होऊनही चिनी, इंग्लिश किंवा मेक्सिकन राहू शकाल का, असे मला व हेईदीला जगात सर्वत्र विचारले जाते. याचे उत्तर असे की, तुमचे आहे ते कायम राहू शकत नाही. ‘थर्ड वेव्ह’ सांस्कृतिक वैविध्याला वाव देते, नव्हे खरे तर प्रोत्साहन देते. तुम्ही तुमची स्वत:ची अशी वेगळी संस्कृती दाखवू शकाल. पण ती संस्कती पूर्वीची असणार नाही. बाहेरून आलेल्या गोष्टींनी तिला नवे स्वरूप प्राप्त झालेले असेल. जेव्हा जगभरातून पाठविले जाणारे संदेश तुमच्या भाषेत आपोआप भाषांतरित होऊन तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि जेव्हा तुम्ही नायजेरियापासून ते फिजीपर्यंतच्या देशांतून किंवा जगातून कुठूनही प्रक्षेपित होणारे टीव्हीचे कार्यक्रम पाहता, तेव्हा हळूहळू तुम्ही त्या त्या संस्कृतींमधील गोष्टी आत्मसात करून त्यांचे संकलन करत असता. तेव्हा तुम्ही तुमची स्वत:ची अशी भावी इंग्लिश किंवा भावी जपानी संस्कृती घडवीत असता. लोक जसाच्या तसा भूतकाळ कधीच जगत नसतात.’’
आपल्या आयुष्यातही हेच घडते आहे, हे आपण नाकारू शकतो का? जो कोणी नाही म्हणण्याचा आव आणत असेल त्याने दीपिका पदुकोणचा सध्या इंटरनेटवर गाजत असलेला ‘माय चॉइस’ हा व्हिडीओ पाहण्यासाठी काही मिनिटे खर्ची घालावीत आणि त्यानंतर स्वत:च्या मनाचा धांडोळा घ्यावा. किंवा स्त्री-पुरुष संबंधांच्या बदलत्या सामाजिक पटलावरून नजर टाकावी, समलिंगी संबंधांवर उघडपणे होणाऱ्या चर्चेचा कानोसा घ्यावा, एकाच पालकाने मुलांचे संगोपान करण्याचे दिव्य स्वत:हून पत्करणाऱ्यांच्या मनात डोकवावे, खासगीतील खासगी संबंधही जगापुढे उघड करणाऱ्या ‘व्हॉट्स अॅप’ क्रांतीचे स्पंदन अनुभवावे, म्हणजे पूर्वी कधीही न घडलेले असे भविष्यात काय काय घडू शकते याची कल्पना येईल.
१९६०च्या दशकाच्या उत्तरार्धात टॉफलर्स दाम्पत्याने लिखाणास सुरुवात केली त्याची पूर्वपीठिका जाणून घेणे रंजक आहे. अमेरिकेचा राज्यकारभाराचा गाडा हाकणाऱ्या राजकीय मंडळींनी जी प्रशासकीय यंत्रणा उभी केली ती भविष्याला गवसणी घालण्यास असमर्थ होती, ही त्यांच्या लेखनाची मुख्य प्रेरणा ठरली. भारतवासीयांपुढे तर याहूनही खडतर आव्हान आहे. पाच हजार वर्षांच्या प्राचीन संस्कृतीचा आपण डंका पिटत असतो. रामायणातील पुष्पक विमान आणि श्रीगणेशाला प्लॅस्टिक सर्जरीने बसविलेल्या सोंडेचे आपण दाखले देतो. भारतीय संस्कृतीने पूर्वी हरतऱ्हेची आव्हाने पेललेली आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्यासाठी गरज आहे पुन्हा एकदा त्या संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाची, असा दावा संस्कृतिरक्षक करतात. अशा फुशारक्या पूर्वीही मारल्या जायच्या. आता त्यास सरकारचीही साथ मिळत आहे आणि ज्या परिषदांमध्ये खरे तर वैज्ञानिक निकषांवर खल व्हायचा अशा परिषदांमध्ये शास्त्रज्ञही अशी पूर्वगौरवाची भाषा बोलत आहेत.
टॉफलर्स आणि दीपिकाने मांडलेल्या मुद्द्यांमध्ये फरक असला तरी ते अगदी सरळ सोपे आहेत व त्याकडे दुर्लक्ष करणे आत्मघाती ठरणारे आहे. जग बदलत आहे आणि हा बदल आधीच्या सर्वांचा चेहरामोहरा बदलून जाईल, असा आहे. त्यासाठी तयार राहणे, एवढा एकच पर्याय आपल्यापुढे आहे. विध्वंस आणि विनाशासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यामुळे उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी तंत्रज्ञानानेच उत्तर द्यावे लागेल. आक्रमक अशा प्र्र्रत्येक शस्त्र-अस्त्रासाठी बचाव तयार केला जाण्यापूर्वीच आक्रमक तंत्रज्ञान तयार होत असल्याने ही एक निरंतर प्रक्रिया असायला हवी.
मात्र सामाजिक पातळीवर होत असलेले बदल खळबळकारी असल्याने त्यांना सामोरे जाण्यासाठी व्यक्ती आणि समाजाच्या मानसिकतेत बदल करणे गरजेचे आहे. शिवाय जुने आचार-विचार खोलवर रुजलेले असल्याने ते घालवून त्याजागी नवे रुजविणे कठीण जाणार आहे. माणूस बदलाशी जुळवून घेण्यात जरा संथच असतो. तंत्रशास्त्रीय बदलांमध्ये सारखेपणा असू शकतो, पण सामाजिक बदलांचे तसे नाही. भारत हा अनेक कालखंडांत जगणारा देश आहे. मुंबईत राहणारे आणि हरियाणा किंवा छत्तीसगढच्या खेड्यात राहणारे कुटुंब एकाच वेळी निरनिराळया कालखंडात जगत असते. कायदा केला तरी तो अशा विविध पातळींवर नैतिक व सामाजिक मूल्यांची अचूक पकड घेऊ शकत नाही.
भांडवलदारी किंवा समाजवाद यांचा आग्रह धरणाऱ्यांनी टॉफलर्स यांनी दिलेला हा इशाराही ध्यानात घ्यावा की, औद्योगिक क्रांतीतून जन्माला आलेल्या या दोन्ही विचारसरणी मोडकळीस येणार आहेत व त्यांच्यासंबंधी अर्थतज्ज्ञांची मते सहजपणे स्वीकारू नयेत. त्यामुळे जागतिकीकरण आणि तंत्रशास्त्रीय व सामाजिक बदल हे जरी सत्य असले तरी सध्या जे काही सुरू आहे तेच यशस्वी होईल, याची खात्री आपण देऊ शकत नाही.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
मंत्र्यांनी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवले तर ते सरकार आणि निकोप सार्वजनिक विचारमंथनासाठी चांगले होईल. प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करायची असो वा माध्यमांवर आगपाखड, मंत्री सभ्य भाषा वापरूनही म्हणणे मांडू शकतात. त्यामुळे माजी लष्करप्रमुख असोत अथवा बिहारमधील भूमीहर समाजाचा उच्चकुलीन, दोघांनीही सभ्यतेचे धडे घेणे गरजेचे आहे. ते जेवढे लवकर घडेल तेवढे हिताचे ठरेल.