देशात एखादी फ्रेंच क्रांतीच व्हायला हवी!
By Admin | Updated: June 24, 2015 00:38 IST2015-06-24T00:38:01+5:302015-06-24T00:38:01+5:30
मला तर असे दिसू लागले आहे की, आपला देश आगामी काही वर्षात एखाद्या फ्रेंच क्रांतीलाच सामोरा जाणार आहे! हे कदाचित उगाचच भय निर्माण करणारे वाटू शकेल.

देशात एखादी फ्रेंच क्रांतीच व्हायला हवी!
न्या. मार्कंडेय काटजू,(माजी अध्यक्ष, प्रेस कौन्सिल) -
मला तर असे दिसू लागले आहे की, आपला देश आगामी काही वर्षात एखाद्या फ्रेंच क्रांतीलाच सामोरा जाणार आहे! हे कदाचित उगाचच भय निर्माण करणारे वाटू शकेल. पण एकूण वस्तुस्थिती पाहता चिन्हे मात्र तशीच दिसत आहेत. आपल्या सर्व संस्था पोकळ व रिकाम्या काडतुसासारख्या झाल्या आहेत. आरोग्य सेवा आणि शिक्षण व्यवस्था ही पूर्णपणे कोलमडून पडण्याच्या मार्गावर आहे. आपली घटना कालबाह्य झाल्यासारखी वाटू लागली आहे.
आपल्याकडे लोकसभा आहे पण ती काम करेनाशी झाली आहे. लोकसभेचे सदस्य सभागृहात सतत ओरडत असतात. अशा वातावरणात कोणतेही अर्थपूर्ण कामकाज होणे शक्यच नसते. याशिवाय आपल्या बऱ्याच खासदारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेली आहे. आपले राजकारणी हे सुधारण्याच्या पलिकडे गेले आहेत. त्यांना या देशाविषयी अजिबात प्रेम नाही. त्यांनी हा देश अक्षरश: लुटून नेला आहे आणि देशाची संपत्ती विदेशी बँकात किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी दडवून ठेवली आहे. त्यांना जात आणि धर्म यांच्या व्होट बँकांचा वापर कसा करायचा हे पक्केपणी ठाऊक आहे. त्यासाठी ते कधी धार्मिक किंवा कधी जातीच्या दंगली देखील घडवून आणतात. आपली नोकरशाही ही भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे. तसेच आपली न्यायव्यवस्थासुद्धा भ्रष्ट झाली आहे. आपली लोकशाही सरंजामशाहीतील किल्लेदारांनी जणू दावणीस बांधली आहे. आपल्या निवडणुका या बहुतेक ठिकाणी जात आणि धर्माच्या नावावरच होत असतात. उमेदवाराच्या गुणवत्तेचा कुणीच विचार करताना दिसत नाही.
भारतात कमालीचे दारिद्र्य आहे. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे, तसेच कुपोषणसुद्धा आहे. दरवर्षी रोजगाराच्या क्षेत्रात एक कोटी तरुणांची भर पडते आहे, पण संघटित क्षेत्राकडून मात्र केवळ पाच लाख रोजगार निर्माण केले जात आहेत. मग उरलेल्या तरुणांनी काय करायचे? ते मग हातठेले चालवतात. रस्त्यात दुकाने थाटतात, धनाढ्यांचे बाऊन्सर्स होतात, गुन्हेगार होतात किंवा भीक मागतात. आपल्या देशातील अर्धी बालके कुपोषित असतात. युनिसेफचा अहवाल सांगतो, ‘‘जगातील कुपोषित तीन बालकांमध्ये एक बालक भारतीय असते.’’ आपल्या देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अल्पसंख्यांक दलित आणि महिला यांना भेदभावपूर्ण वागणूक देण्यात येते. आॅनर किलींग, हुंडाबळी, स्त्री भ्रूणहत्या या गोष्टी अनेक भागात सर्रास सुरू आहेत.बहुतेक पाश्चात्त्य राष्ट्रात वातावरणाचे किंवा पाण्याचे प्रदूषण अजिबात आढळत नाही. याचे कारण त्याविरुद्धचे तेथील कायदे अत्यंत कठोर आहेत. हे कायदे मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात येते. पाश्चात्त्य राष्ट्रात तेथील नळातून येणारे पाणी तुम्ही बिनधोकपणे पिऊ शकता. कारण ते मिनरल वॉटर इतकेच स्वच्छ असते. याउलट भारतात प्रत्येक गोष्ट प्रदूषित असते. आपल्या देशात प्रदूषणविरोधी कायदे आहेत. उदाहरणार्थ पर्यावरण रक्षण कायदा, वायु प्रदूषण कायदा, जलप्रदूषण कायदा, अन्नसुरक्षा आणि मानक कायदा इ. पण या कायद्याचे पालन कुणीच करीत नाही. (उदा. मॅगीत सापडलेले शिसे. पण ते एक हिमनगाचे टोकच आहे!)
तुमचा उद्योग जर टॉक्सिक द्रव्ये असलेले पाणी नदीत सोडत असेल, त्याऐवजी त्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प राबवीत नसेल तर तुम्ही संबंधित इन्स्पेक्टरला दरमहा काही हजार रुपये दिले की तो त्याकडे दुर्लक्ष करील. मग लोकांचे काही का होऊ दे. तो चिंता करीत नाही. मी काही वर्षांपूर्वी वाराणशीत गेलो होतो. तेथील संकटमोचन मंदिराचे बडे महंतो जे बनारस हिंदू विश्वविद्यालयात इंजिनिअरिंगचे प्रोफेसर होते आणि ज्यांचा मुलगा इंजिनिअरिंगचा प्रोफेसर असून या मंदिराचा आता महंत आहे. मला म्हणाले की वाराणशीच्या ३० नाल्यांमधून गंगा नदीत सांडपाणी सोडण्यात येत असते. अलाहाबाद हे माझे होम टाऊन आहे. तेथील माझ्या एका मित्राने सांगितले की अलाहाबादच्या संगमक्षेत्रात स्नान करण्यासाठी संपूर्ण भारतातून लोक येत असतात. पण हे संगम क्षेत्र सर्वाधिक प्रदूषित आहे.
भारतातील बहुतेक शहरांना नरकाचे रूप प्राप्त झाले असून ती राहण्यायोग्य उरलेली नाहीत. सगळीकडे वाहनांची कोंडी पहावयास मिळते. ट्रॅफिक जाम तर नियमितपणे होत असते. घरबांधणी करण्यासंबंधीच्या कायद्यांचे उघडपणे उल्लंघन करण्यात येत असते. दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी, साऊथ एक्स्टेंशन, ग्रेटर कैलाश इ. पॉश समजल्या जाणाऱ्या वस्त्यातील रस्त्यावर दिवसभर मोटारगाड्या उभ्या असतात. त्यामुळे रस्त्यांना गॅरेजेसचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जी गोष्ट दिल्लीची, तीच बेंगळुरु, चेन्नई, मुंबई, कोलकाता, हैद्राबाद, लखनौ इ. शहरांचीही पाहायला मिळते. या शहरात राहणे आणि रस्त्यातून प्रवास करणे हे दिव्य असते. काही दिवसांनी ही शहरे भयानक स्वरूप धारण करतील. पण आपले रक्षणकर्ते म्हणून ओळखले जाणारे राजकारणी मात्र रोम जळत असताना वाद्य वाजवीत बसलेल्या नीरो सारखे आहेत.
२० एप्रिल १६५३ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आपल्या सैन्यासह प्रवेश करणाऱ्या लॉर्ड क्रॉमवेलने तेथे उपस्थित असलेल्या सदस्यांसमोर भाषण देताना म्हटले, ‘‘या सभागृहात तुमचे बसणे मी संपुष्टात आणू इच्छितो. कारण तुम्ही आपल्या घृणास्पद वर्तणुकीने या सभागृहाला काळिमा फासला आहे. तुम्ही चांगल्या प्रशासनाचे शत्रू आहात. तुम्ही लोभी लोकांचा समुदाय आहात आणि तुम्ही हंडाभर कढीसाठी आपला देशदेखील विकाल आणि मूठभर पैशासाठी देवाचाही बाजार मांडाल. तुमच्यात काही चांगले गुण शिल्लक तरी आहेत का? असा एखादा तरी गुन्हा दाखवा जो तुमच्या नावावर जमा नसेल! पैसा हाच तुमच्यासाठी परमेश्वर आहे. तुम्ही आपली सद्सद्विवेक बुद्धी ही विकायला काढली आहे. समाजाचे हित करणारा तुमच्यापैकी एकतरी आहे का? हे सभागृह कलंकित झाले आहे. तुम्ही हे पवित्र मंदिर लुटारूंचे नंदनवन केले आहे. या राष्ट्राला तुमचा उबग आला आहे. तुम्हाला लोकांनी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी येथे पाठवले होते. तुम्ही येथे काही न करता दीर्घकाळ बसला होता. आता तुम्ही हे सभागृह सोडून चालते व्हा आणि आपले तोंड कायमचे काळे करा. परमेश्वरासाठी कृपा करून येथून निघून जा!’’ त्यानंतर क्रॉम्वेलच्या सैनिकांनी सगळ्या खासदारांना बाहेर काढून सभागृहाला कुलूप ठोकले. मला वाटते भारताची लोकसभासुद्धा त्याच दिशेने वाटचाल करीत आहे!
अशा स्थितीत एकूण व्यवस्थेतच कमालीचे परिवर्तन करण्याची गरज आहे. आपली घटना आता कालबाह्य झाली आहे. देशातील संपूर्ण व्यवस्था एखाद्या कोलमडून पडलेल्या इमारतीसारखी झाली आहे. त्यात काही दुरुस्ती करून काहीच साध्य होणार नाही. सगळी इमारत पाडून ती नव्याने बांधावी लागेल. नवी न्याय्य समाज व्यवस्था निर्माण करावी लागेल, जेथे सर्वांनाच चांगले जीवन जगणे शक्य होईल. सध्याच्या व्यवस्थेत ती गोष्ट साध्य होणार नाही. आपल्या देशासमोरच्या प्रश्नांसाठीची उत्तरे बाहेर शोधावी लागतील. म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांतीसारखे येथे काहीसे घडावे लागेल!