‘फडणवीस कसले हिन्दू’?
By Admin | Updated: October 3, 2015 10:13 IST2015-10-02T22:14:23+5:302015-10-03T10:13:03+5:30
अन्य कोणी म्हणो अथवा ना म्हणो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र आज नक्कीच म्हणत असतील, ‘बरे झाले आपण अहिन्दू ठरविले गेलो.

‘फडणवीस कसले हिन्दू’?
अन्य कोणी म्हणो अथवा ना म्हणो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र आज नक्कीच म्हणत असतील, ‘बरे झाले आपण अहिन्दू ठरविले गेलो. असेच उद्या कुणी आपल्याला अब्राह्मणही ठरविले की जो काय साडेचार-पावणेपाच वर्षांचा सत्ताकाळ हाताशी आहे, तो निर्विघ्नपणे तर पार पडेल’! बरं, त्यांना अहिन्दू ठरविणारी असामी कोणी अशीतशी नाही. तर साक्षात द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनीच त्यांना ही पदवी बहाल केली आहे. द्वारकापीठ म्हणजे साक्षात आदि शंकराचार्यांनी देशात स्थापन केलेल्या उण्यापुऱ्या चार पीठांपैकी एक. एव्हाना या चार पीठांची भूमितीय पद्धतीने वाढ होत चालली असली आणि प्रत्येक पीठाचेच शंकराचार्य जगद्गुरुही म्हणविले जात असले तरी अखेर जगाचा आकार केवढा तर तो त्याच्याकडे पाहाणाऱ्याच्या लहान्या मेंदूएवढा. त्यामुळे या समस्त जगद्गुरुंचे जगदेखील तेवढेच. काही वर्षांपूर्वी अशाच एक जगद्गुरुंना तर म्हणे अन्य जगद्गुरुंनी चक्क बहिष्कृतच केले होते. पण स्वरुपानंदाचे तसे नाही. त्यांचा अधिकार खूप मोठा. याच अधिकारातून त्यांनी मध्यंतरी देशात भरमसाठ शंकराचार्य आणि जगद्गुरु निर्माण झाल्याबद्दल खरमरीत टीका केली होती. खरे तर शंकराचार्यांच्या वाणीला खरमरीत हे विशेषण बहाल करणे म्हणजे पातकच म्हणायचे. पण स्वामीजी जे बोलतात ते खरमरीतच असते. याच खरमरीतपणाचा आणखी एक आविष्कार दाखविताना त्यांनी अलीकडे शिर्डीच्या साईबाबांना आपल्या लक्ष्यस्थानी आणले होते. साईबाबा हे कोणी संत महंत नव्हेत त्यामुळे त्यांची मंदिरे बांधण्याची व त्यांची पूजा करण्याची गरज नसल्याचे सांगून त्यांनी देशातील साईबाबाची सर्व मंदिरे उद्ध्वस्त करण्याचे आदेशही दिले होते. त्यातून खुद्द शिर्डीत दंगलसदृश स्थितीदेखील निर्माण झाली होती. आजवर अगदी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतीलही कुणी साईबाबांवरील असंख्यांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह लावले नव्हते. पण स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी तेही करुन दाखविले. याचा अर्थच त्यांचा अधिकार अन्य कोणाहीपेक्षा मोठा आणि उच्च कोटीचा. परिणामी आता तेच जेव्हां देवेन्द्र फडणवीसांना अहिन्दू ठरवितात तेव्हां ही बाब भले ते स्वत: देवांचे देव देवेन्द्र असले तरी मान्य आणि स्वीकारावीच लागेल. पण देवेन्द्रांना तडकाफडकी धर्मभ्रष्ट करण्याइतपत त्यांचा प्रमाद वा त्यांचे पातक कोणते? अत्यंत घोर पातक! त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील कथित पवित्र कुशावर्तात सिंहस्थ पर्वणीतील अलीकडेच पार पडलेल्या अखेरच्या शाही स्नानाच्या आधी मानसरोवरातील पाणी मिसळले होते! एरवी सप्त नद्यांचे जल अत्यंत पवित्र मानले जाते. परंतु स्वरुपानंद सरस्वतींनी कथिलेल्या हिन्दू शास्त्राधारानुसार भारतातील सात नव्हे तर जगभरातील साऱ्या नद्यांचे उदक गोदावरीत आपोआपच येत असते आणि तेच पुढे कुशावर्तात प्रवाहित होते. असे असताना (चिन्यांनी बाटवलेल्या?) मानसरोवरातील साधे पाणी कुशवर्तात टाकून ते अपवित्र करण्याचे कारणच नव्हते. फडणवीसांनी नेमके ते केले आणि म्हणून ते धर्मभ्रष्ट ठरले! पण खरे तर यात त्या बिचाऱ्या मुख्यमंत्र्याचा काय दोष बरे? एक चिनी शिष्टमंडळ खास मानसरोवरातील पाणी घेऊन आधी भारतात आणि नंतर नाशकात आले. दोन देशांचा, त्यांच्या संस्कृतींचा आणि मैत्रीपूर्णतेचा अनोखा संगम म्हणून माध्यमांनी त्याचे वर्णनदेखील केले. पण तरीही मुख्यमंत्र्यांचे चुकलेच. सिंहस्थ पर्व सुरु असताना नाशकात आणि त्र्यंबकेश्वरी काही करावयाचे झाल्यास आणि विशेषत: दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरीशी छेडछाड करावयाची झाल्यास तिथे जमलेल्या साधू-संत-महंत आणि जगद्गुरु यांची अनुमती घ्यावी लागते. त्यांना शरण जावे लागते. खरे तर सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत करायला हवे होते. पण तेच बिचारे एकीकडे समस्त भगव्या वसनधाऱ्यांची हाँजी हाँजी करण्यात आणि कोणत्या बाजूने नेमका कोणत्या बाजूला सूर मारायचा याच विचारात मश्गुल राहिल्याने त्यांनाही ते सुचले नसावे. पण तरीही दोष ना महाजनांचा ना फडणवीसांचा. सारा दोष सुधीन्द्र कुळकर्णी यांचा. होय, हेच ते सुधीन्द्र कुळकर्णी ज्यांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर निघालेल्या लालकृष्ण अडवाणी यांच्यासाठी भाषण लिहून दिले. अडवाणी यांनी कायदे आझम बॅरिस्टर मुहंम्मद अली जीना यांच्या ‘मजार’ला साक्षी ठेवून ते वाचून दाखविले, ज्यात जीना यांना धर्मनिरपेक्षतेचे पाईक ठरविले गेले होते! या एका भाषणाने आणि त्यातील या एका उल्लेखाने अडवाणी यांचा जमिनीपासून चार अंगुले वर जाणारा रामरथ दाणकन जमिनीवर आला आणि ‘बाकी जो है वह इतिहास है’! तेव्हांपासून अडगळीत पडलेले सुधीन्द्र मुख्य प्रवाहात परतण्यासाठी निमित्ताच्या शोधातच होते. त्यांनी ते बरोबर शोधले. हिन्दी-चिनी भाईभाईचा नवा अध्याय सुरु करण्याच्या मिषाने आणि कामात काम, भज रामराम या धर्तीवर स्वोद्धार करण्याच्या इराद्याने त्यांनी सारा घाट घातला व देवेन्द्र फडणवीस यांनाही त्यात ओढून घेतले. यात देवेन्द्रांची म्हटले तर चूक इतकीच की त्यांनी सुधीन्द्रांवर डोळे झाकून विश्वास ठेवला. जरा अडवणींचे मार्गदर्शन घेतले असते तर! एवीतेवी तेही इतक्यापुरतेच उरले आहेत.