धर्म आणि कामात अडकलेल्या बड्यांची नीतिकथा
By Admin | Updated: March 12, 2015 23:08 IST2015-03-12T23:08:24+5:302015-03-12T23:08:24+5:30
गेल्या जवळजवळ सहा आठवड्यांपासून शशी थरूर ‘मीडिया ट्रायल’चा सामना करीत आहेत. आयुष्य जेव्हा एखाद्या वाईट वळणावर पोहोचते, तेव्हा माध्यमेही कटूपणे वागत असतात

धर्म आणि कामात अडकलेल्या बड्यांची नीतिकथा
गुरुचरणदास
(विख्यात शिक्षणतज्ज्ञ)
गेल्या जवळजवळ सहा आठवड्यांपासून शशी थरूर ‘मीडिया ट्रायल’चा सामना करीत आहेत. आयुष्य जेव्हा एखाद्या वाईट वळणावर पोहोचते, तेव्हा माध्यमेही कटूपणे वागत असतात. अर्थात जर तुम्ही सतत प्रसिद्धीच्या झोतात वावरत असाल, तर तुम्हाला याची मानसिक तयारी ठेवावीच लागते.
थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचे निधन होऊन आता वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्याआधी म्हणजे जानेवारी २०१४ मध्ये त्यांनी आपल्याच पतीवर एक गंभीर आरोप करताना, शशी थरूर यांचे एका पाकिस्तानी महिला पत्रकारासोबत संबंध असल्याचे म्हटले होते व साहजिकच ही बातमी देशातील बहुतेक वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर छापली होती. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू दिल्लीतल्या एका पंचतारांकित हॉटेलात आत्महत्त्या केल्याने झाल्याचे तेव्हा जाहीर झाले होते. पण गेल्या महिन्यात पोलिसांनी त्यांच्या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तो विषप्रयोगाने झाल्याचे दिल्लीचे पोलीस प्रमुख बी. बी. बस्सी यांनी म्हटले आहे.
शशी आणि सुनंदा दोघेही परस्परांच्या उघड प्रेमात होते. पाच वर्षांपूर्वी त्यांचे लग्नसुद्धा झोकात झाले. त्यांचे वैवाहिक जीवनसुद्धा एखाद्याला असूया वाटावी असेच होते. सुनंदा पुष्कर यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक, तर शशी थरूर चांगले वक्ते, अभ्यासू, छाप पाडणारे आणि पारंपरिक राजकारण्यांपेक्षा वेगळे. आज त्याच थरूर यांना दिल्ली पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे.
मनुष्यप्राणी कोणतीही दु:खद घटना नीट समजून घेण्याऐवजी कोणती ना कोणती बाजू घेत असतो. थरूर दांपत्याच्या बाबतीत कुणी काय केले, याचे अंदाज बांधण्यात अर्थ नाही, ते पोलिसांचे काम आहे. त्यामुळे कुणावरही थेट ठपका ठेवण्यापेक्षा मानवी कर्म (काम), त्याचे गुणधर्म, संदिग्ध सीमा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी समजून घेणे उपयोगी ठरू शकेल. त्यादृष्टीने आपण स्वत:ला थरूर पती-पत्नीच्या जागी कल्पून बघणे अधिक बरे.
ख्रिश्चन धर्माच्या मान्यतेनुसार, सृष्टीचा प्रारंभ सूर्यप्रकाशापासून झाला, तर भारतीय परंपरा सांगते की सर्वात आधी होती इच्छा (काम). ऋग्वेदानुसार मनात पहिले बीज रुजले ते इच्छेचे आणि त्याचमुळे विश्वाची निर्मिती झाली. ब्रह्मांडाची निर्मिती आदिकालीन जैविक ऊर्जेमुळे झाली. सृष्टीत अवतरलेल्या पहिल्या जीवाला एकटेपण वाटले म्हणून त्याने स्वत:चे शरीर दोघात विभागून घेतले आणि त्यातूनच पुरुष आणि स्त्री यांची उत्पत्ती झाली. याचा उल्लेख उपनिषदांमध्ये आहे. त्यातून हेच जाणवते की, मानवाची मूळ अवस्था एकटेपणाचीच आहे. आपण एकटेच या जगात येत असतो आणि एकटेच इथून जात असतो. हा एकटेपणा घालवण्यासाठी आदिकालीन पुरुषाने स्त्रीचा सहवास मिळवला आणि त्यातून मानव जातीचा उगम झाला. शारीरिक जवळीकच आपल्यातली एकटेपणाची जाणीव घालवत असते.
काम हेच जीवनाचे स्त्रोत, कृतीचे मूळ आणि सर्व
क्रियांचे कारण आहे. प्राचीन ऋषींंनी याला त्रिवर्गात म्हणजेच जीवनाच्या तीनपैकी एका ध्येयात स्थान दिले आहे. पण भारतीय लोकांच्या काम या संकल्पनेच्या बाबतीतल्या धारणा नेहमीच दोलायमान राहिल्या आहेत. कारण, इच्छा आंधळी असू शकते, वेडेपणाची असू शकते, प्रक्षुब्ध आणि अनियंत्रित असू शकते व कपट, विश्वासघात, असूया आणि अपराध तिच्या भोवती फिरत असतात. सुनंदा पुष्कर प्रकरणात असूया हेच कारण असू शकते. या दोलायमान गुणधर्मामुळे त्याकडे बघणारे आशावादी तसेच निराशावादीही असतात. आशावादी कामात सुख बघतात. गुप्त साम्राज्याच्या काळात उदयास आलेला कामसूत्र, कामुक कला आणि प्रेमावरच्या कविता यामागे हाच आशावाद आहे. वैरागी, त्यागी आणि संन्याशी निराशावाद्यांंमध्ये मोडतात व इच्छा ही त्यांना त्यांच्या आध्यात्मिक मार्गातली अडचण वाटत असते. संभ्रमात पडलेले गृहस्थाश्रमी मात्र या टोकाच्या दोन्ही प्रकारांमध्ये लोंबकळत असतात. धर्मशास्त्र्यांनी कामाच्या सकारात्मक बाबी स्वीकारून त्यांना विवाह आणि प्रजोत्पादनाच्या मर्यादेत ठेवले आहे. एकपत्नीत्वाची मर्यादा धर्माने घातली असली, तरी स्त्री आणि पुरुष ही मर्यादा तोडण्याचे मार्ग शोधत असतात आणि यातूनच अवैध प्रेमाला प्रेरणा लाभत असते.
महाकाव्यांची रचना करणाऱ्या कवींनी कामाची तीन प्रकारात विभागणी केली आहे. ते प्रजनक आहे, पुलकित करणारे आहे आणि तरीही अनावर आहे. त्यांनीच यात शोकांतिकेच्या उद्भवाचीही शक्यता पाहिली व त्यामागील कारण आहे धर्म आणि काम यातील द्वंद्व. जर धर्म हे आपले इतरांप्रतीचे कर्तव्य आहे, तर काम हे स्वत:प्रतीचे कर्तव्य आहे. महाकाव्यांमध्ये धर्म नेहमीच कामाच्या विरोधात विजयी राहिला आहे. त्याचे एकमात्र कारण म्हणजे स्वत:च्या सुखासाठी दुसऱ्याला दुखावणे अयोग्य असल्याचे प्रत्येकाला माहीत असते. पुरुषप्रधानता आणि लैंगिक संबंधातील असमानता यामुळे सुनंदा पुष्करांसारख्या स्त्रीच्या नशिबी शोकांतिका येण्याची शक्यता अधिक असते. महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण हे पुरुषी सत्तेचे मोठे उदाहरण असून, पुढे तेच महायुद्धाचे कारण ठरले.
पुष्कर-थरूर प्रकरणात आपले वैवाहिक संबंध आणि धर्म आणि काम यातील वादविषय केवळ थरूर यांनाच ठाऊक असणार. प्रसिद्ध व्यक्तींच्या कामासंबंधी विषयांमध्ये माध्यमांना जरी कितीही रुची असली तरी माझ्या मते, पुष्कर-थरूर शोकांतिकेमागील दु:ख अधिक खोलवरचे आहे. काम फक्त निर्मितीचे मूळ आणि कारण नाही, तर ते चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींचे कारक आहे. एका बाजूला ते निर्मिती, आसक्ती आणि आनंदाचे कारक, तर दुसऱ्या बाजूला ते असूया, हिंसा आणि क्रोधाचेही कारण आहे.
मध्यमवर्गीयांवर नेहमीच नीतिमत्ता लादण्यासाठी तत्पर असणाऱ्या व १९ व्या शतकातील व्हिक्टोरियन इंग्लंडमधील ख्रिश्चन मिशनऱ्यांसारखे वागणाऱ्या हिंदू राष्ट्रवाद्यांसाठीसुद्धा येथे एक संदेश आहे. ते कामेच्छांना विरोध करतात, अन्यथा कामाचा संबंध पापकर्माशी लावतात व सामान्य माणसाला अपराधी भावनेने भारून टाकतात. पण ते विसरतात की, आपल्या संस्कृतीनेच कामामागील निर्मिती गुणधर्माला ओळखून त्याला पुरुषार्थामध्ये स्थान दिले आहे. पाश्चात्त्य जगत आज जेव्हा या गोष्टींकडे सकारात्मक आणि स्वतंत्रपणाने बघू लागले आहे, तेव्हा येथील हिंदुत्ववादी मात्र व्हॅलेन्टाईन डे सारख्या निरुपद्रवी गोष्टींकडेही जरा जास्तीच पाखंडीपणे आणि असहिष्णूतेने बघत आहेत.