ऐतिहासिक विजयाकडून अपेक्षा

By Admin | Updated: May 19, 2014 09:01 IST2014-05-19T09:01:40+5:302014-05-19T09:01:40+5:30

गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून आलेली जबाबदारी म्हणजे एक आव्हान होते. पंतप्रधानपदाचा नरेंद्र मोदींचा कार्यकाळ त्यापेक्षा अधिक आव्हानात्मक राहणार आहे. जणू काटेरी मुकुटच.

Expectation from the historical victory | ऐतिहासिक विजयाकडून अपेक्षा

ऐतिहासिक विजयाकडून अपेक्षा

शेषाद्री चारी

अतिशय चुरशीने लढल्या गेलेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टीने मिळवलेला प्रेक्षणीय विजय अभूतपूर्वच म्हटला पाहिजे. केंद्रात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला निर्णायक बहुमत मिळाले आहे. याचे श्रेय मोदींकडे जाते. निवडणूक प्रचाराचे सूत्र पक्षाने दिले त्या दिवसापासून मोदी कामाला लागले होते. याआधीचे आपले सारे विक्रम मोडत भाजप दिल्लीच्या तख्ताकडे निघाला आहे. गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून आलेली जबाबदारी म्हणजे एक आव्हान होते. पंतप्रधानपदाचा त्यांचा कार्यकाळ त्यापेक्षा अधिक आव्हानात्मक राहणार आहे. जणू काटेरी मुकुटच. प्रचाराच्या मोहिमेत मोदींनी विकासाचा अजेंडा चालवला. काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीतील दोष दाखवून दिले. भारतवासीयांनी मोदींना भरभरून मते दिली. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला. नियोजित पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळापुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. महागाईची समस्या आहे, वाढत्या अन्न सबसिडीचा विषय आहे. अन्नधान्याचा मोठा साठा सडतो आहे. त्याची विल्हेवाट लावायची आहे. दुष्काळग्रस्त आणि गरिबांना जगवायचे आहे. अलीकडे मॉन्सून लहरी बनला आहे. अनिश्चित मॉन्सूनच्या मुकाबल्याची तयारी करायची आहे. वित्तीय तूट नियंत्रणात आणावी लागेल. औद्योगिक उत्पादन वाढवायचे आहे...अशी बरीच सारी कामे करायची आहेत. जनतेने मोठ्या संख्यने भाजपाला निवडून दिले आहे. भाजपाला आता बहाणेबाजी करता येणार नाही. काम दाखवावे लागेल. रिझल्ट दाखवावे लागतील. दिल्लीचे राजकारण मोदींना भलेही नवे असेल, पण दिल्लीत ते परके नाहीत. भाजपाचे प्रचारप्रमुख म्हणून मोदींनी राष्टÑीय राजकारणात पाऊल ठेवले तेव्हा राष्टÑीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएमध्ये भाजपा आणि इतर फक्त दोन पक्ष होते. पण, प्रचाराचा वेग वाढला तेव्हा डझनभर पक्षांना सोबत घेण्यात मोदी यशस्वी झाले होते. एक्झिट पोलचे निकाल आले तेव्हा अनेक पक्ष पाठिंब्याला तयार होते. पण, त्याची आवश्यकता भासली नाही. भाजपाला बहुमत मिळाले होते. स्वबळावर भाजपा सरकार बनवू शकतो? असे असतानाही मोदींनी एनडीएबाहेरच्यांनाही सोबत घेण्याची तयारी दाखवली. आपल्या अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी हे स्पष्ट केले आहे. निवडून आलेल्या ५४३ पैकी प्रत्येकाचे सहकार्य घेण्याची मोदींची तयारी आहे. निवडून आलेला प्रत्येक खासदार भारतवासीयांचे प्रतिनिधित्व करतो, अशी त्यांची भूमिका आहे. मोदी ही फूटपाडू व्यक्ती आहे, असे चित्र रंगवत आलेल्या लोकांनी मोदींचीे आता माफी मागितली पाहिजे. मोदींची शैली अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी मिळतीजुळती आहे. वाजपेयींची वक्तृत्वशैली तर मोदींनी जशीच्या तशी घेतली आहे. १२ मेनंतर मोदींच्या देहबोलीतही फरक पडला. त्यांची आक्रमक छबी चमत्कार करू शकते. मात्र, कसोटीच्या काळात त्यांना आपल्या छबीचा उपयोग करून घेता आला पाहिजे. निकालानंतरच्या वडोदरा इथल्या सभेत, निवडणूक हरलेल्यांनाही सहभागी करून घेण्याची तयारी मोदींनी दाखवली. सत्तेच्या घोड्यावर स्वार होणे सोपे आहे. पण, सत्ता राबवणे, काम करवून घेणे अवघड आहे. मोदींना आपली प्रशासकीय चमू लवकरात लवकर निवडावी लागेल. योग्य व्यक्ती सापडणे हे कठीण झाले आहे. मोदी कामात वाघ आहेत. त्यांचा कामाचा वेग प्रचंड आहे. गुजरातमध्ये काम करण्याची त्यांची शैली ज्यांनी पाहिली आहे ते हे सांगतील. शेष देशात आर्थिक विकास खुंटला होता, गुंतवणूक थांबली होती, तशा दिवसांमध्ये गुजरात वाहन आणि औषध उद्योगाचा हब बनले. देशातील सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प तिथे आला. विकासाचे हे ‘गुजरात मॉडेल’ उर्वरित देशातही यशस्वी होऊ शकते, ही बाब मोदींना सिद्ध करावी लागेल. सत्तेसोबत केवळ अधिकारच येत नाहीत, तर जबाबदारीही येत असते. मोदी यांच्या ध्येयवादाची आणि बौद्धिकतेची मुळे राष्टÑीय स्वयंसेवक संघात जुळली आहेत, हे मोदींनी कधीही लपवले नाही. त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात जनसंघापासून केली. यंदाच्या निवडणुकीत निर्णायक विजय मिळविण्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांनी जिवापाड मेहनत घेतली. त्यामुळे मोदी हे संघाचा अजेंडा पुढे चालवतील, अशीच त्यांच्यापासून अपेक्षा राहील. गुजरातमधील १२ वर्षांच्या अनुभवाने एक चांगला प्रशासक व स्वयंसेवक यातील समतोल ते साधतील, असे गृहित धरले जाते. विरोधकांनी ही निवडणूक धर्मनिरपेक्षतावाद विरुद्ध जातीयवाद अशी वळवण्याचा प्रयत्न केला. पण, मोदींनी आपल्या प्रचारात भारताच्या विविधतेवर भर दिला. त्याचा मोदींना फायदाही झाला. या निवडणुकीकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले होते. आशिया खंडातील राष्टÑ एकमेकांशी जशी जुळली आहेत तशी राजकीयदृष्ट्या वेगळीही आहेत. आज सारे जगच परस्परावलंबी झाले आहे. अशास्थितीत भारताचे राष्टÑीय हितसंबंध बदलत्या राजकीय वास्तवाशी जुळवून घ्यायला हवेत. मोदींची जगाविषयीची जी कल्पना आहे तिच्याशी लोकांना जुळवून घेण्याचे काम मोदींच्या टीमला करावे लागणार आहे. प्रशासनाची विश्वासार्हता पुन्हा स्थापित करावी लागेल आणि प्रशासनात अडथळे आणणारे गैरप्रकार बाजूला करावे लागतील. राजकारणावरचा लोकांचा विश्वासही पुन्हा मिळवावा लागेल. मोदींनी आपल्या प्रचारात विकासासाठीच मते मागितली; त्याच्या बदल्यात निर्णायक नेतृत्व देण्याची त्यांनी हमी घेतली. आजवर आर्थिक विकासात जो गतिरोध निर्माण झाला होता तो दूर करून लोकशाहीतील लोकांचा सहभाग वाढविण्यावर ते भर देणार होते. आता लोकांनी त्यांच्या हातात सत्ता सोपविली आहे, तेव्हा त्यांनी काम करण्याकडे अधिक लक्ष पुरविले पाहिजे. त्यांच्या पूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे त्यांना लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. आजवर पंतप्रधानपदी बसणार्‍या व्यक्तीची निवड केली जात असे. या वेळी लोकांनी प्रथमच पंतप्रधानपदासाठीच्या व्यक्तीची निवड केली आहे. ( लेखक भाजपा राष्टÑीय कार्यकारिणीचे सदस्य आणि परराष्टÑ व्यवहार धोरण विभागाचे संयोजक आहेत.)

Web Title: Expectation from the historical victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.