शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

Coronavirus : शांतिदूतांनाही पडले शांततेचे कोडे!

By किरण अग्रवाल | Updated: March 26, 2020 08:28 IST

Coronavirus : अंग टाकून विसावायच्या संधीचा शोध मात्र प्रत्येकालाच असतो. ही संधी सध्या ‘कोरोना’ने अपवादवगळता सर्वांनाच उपलब्ध करून दिली आहे.

किरण अग्रवालधावाधाव... ही तशी अव्याहत चालणारी क्रिया आहे. रोजीरोटीच्या झगड्यात आज प्रत्येकाचीच धावाधाव सुरू आहे. या धावण्याची गती ज्याच्या त्याच्या गरजेनुसार कमी-अधिक असेल; पण कुणी म्हणता कुणी त्याला अपवाद नाही. त्यामुळे या धकाधकीत दोन घटका जरा विसावायला मिळणे अवघडच! तशी संधी मिळाली तरी त्यातील दृश्य-अदृश्यता त्या संबंधितालाच ठाऊक असते. कारण प्रथमदर्शनी दृश्य स्वरूपात एखादी व्यक्ती निवांतपणे पहुडलेली अगर आरामात विसावलेली आढळून येत असली तरी तिचे मन कोणत्या विवंचनेत गुंतले आहे, हे अदृश्य असते, जे दुसऱ्याला कळणारे नसते. अर्थात तसे असले तरी अंग टाकून विसावायच्या संधीचा शोध मात्र प्रत्येकालाच असतो. ही संधी सध्या ‘कोरोना’ने अपवादवगळता सर्वांनाच उपलब्ध करून दिली आहे.

विसावण्याच्या किंवा आरामाच्याही प्रत्येकाच्या आपापल्या त-हा असतात. कुणी चक्क पलंगावर पाठ टाकून लोळण घेत आराम करतो, तर कुणी खुर्चीत निवांत पडून. ब-याच जणांना कार्यालयीन सेवेदरम्यान खुर्चीत मानेखाली हात घेऊन स्थिरावण्याचीही सवय असते. हा स्थिरावणे शब्द मुद्दाम यासाठी की, काम असो अगर नसो, अशांना सतत फिरफिर करण्याची सवय असते. आपण खूप कामात व परिणामी ताणात आहोत असे प्रदर्शन ते नेहमी करत असतात. त्यामुळे मिळाली संधी की, ते पद्धतशीरपणे खुर्चीत स्थिरावतात. तेव्हा हे स्थिरावणे व विसावणे एकच. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मराठी शब्दकोशाचा आधार याला आहे. शरीर थकले, अवयव - गात्र थकले की विश्रांतीची-विसावण्याची गरज भासतेच. पण हल्ली थकावट न बाळगता अगर दर्शवता सतत पळावे-धावावे लागते, हीच खरी समस्या आहे. सामान्य माणसाला तर मरायला जिथे फुरसत नसते, असे म्हटले जाते; तिथे विसावायला कुठे संधी मिळणार? त्याच्यासाठी हक्काचा एकच विसावा असतो, तो अंतिम यात्रेत पार्थिवाला मिळणारा! त्यामुळे रोजच्या धबडग्यात विसावायला मिळण्यासाठी सारेच आसुसलेले असणे अगदी स्वाभाविक आहे.

माझ्या विसाव्याचे स्थान म्हणजे, माझ्या दिवाणखाण्यातील आरामखुर्ची. सकाळी उठल्या-उठल्या बाल्कनीचे दरवाजे उघडून प्रसन्न वारा अंगावर घेत या खुर्चीत विसावायचे व एकेक करून घरी येणारी सारी वर्तमानपत्रे हातावेगळी करायची अशी रोजची परिपाठी. पण, ‘कोरोना’ने त्यात खंड पाडला. अमुक-तमुक वर्षात असे घडले नाही, फर्स्ट टाइम इन हिस्ट्री... यासारख्या संदर्भांनी सध्या अनेक संस्था, आस्थापना ‘लॉकडाउन’ झाल्या आहेत. त्यांच्याही कामात वा सिस्टीममध्ये खंड पडला आहे तसा. त्यामुळे वृत्तपत्रांऐवजी हाती मोबाइल घेत ऑनलाईन वाचन करणे क्रमप्राप्त ठरले आहे. यासंबंधीची आतापर्यंत रूढ झालेली सिस्टीम बदलल्याने दार बंद आहे, खुर्ची रिकामी आहे. हे रिकामपणच खरे तर आज मनाची कवाडे सताड उघडी करायला भाग पाडून गेले आहे. एरव्ही गांभीर्याने असो, की अलवार-अलगदपणे; कुठल्याही विषयावर मन:पूत मनात डोकावायला तरी कुठे मिळते? त्यामुळे ‘कोरोना’च्या आपत्ती काळात का होईना, अशी रिकाम्या मनातील भुंग्याची भुणभुण आत्मपरिक्षणाला, चिंतन-मननाला निमंत्रण देणारीच ठरली नसती तर नवल!

विचार आला, कोरोनाच्या धास्तीने आपले जे रिकामपण ओढवलेय; दारावर बसलेल्या कबुतर पक्ष्याच्या दाम्पत्याला त्याची काही कल्पना असेल का? स्वच्छंद-मुक्तपणे विहरण्याच्या गप्पा आपण करतो ख-या, पण तशी मुक्तता-स्वच्छंदता लाभते का कधी आपल्याला? कबुतराच्या गुटर्गुची बोली आपल्याला कळत नाही खरी; पण एरव्ही खुर्चीत पहुडणारी व्यक्ती आज त्यावर दिसत नसल्याबद्दलची चर्चा तर होत नसावी त्यांच्यात? जिवाच्या जिवलगाची ही जोडी रिकाम्या खुर्चीकडे काय म्हणून बघत असावी, व्यक्तीचे नसणे निर्भयतेचे असल्याचे आनंदनिधान त्यांच्या गुटर्गुत असावे, की दाणा-पाण्याची सोय टळण्यासंबंधीच्या हवालदिलतेचे रुदन? कबुतरांकडे आपण नेहमी शांतिदूत म्हणून पाहतो. शांततेचा संदेश देण्यासाठी कबुतरे उडवतो, पण आज या शांतिदूतांनाही ही शांतीच तर खटकत नसावी?.. एक नव्हे, असंख्य अशा प्रश्नांनी रिकामपणातल्या निवांततेतही मनाच्या कवाडावर जणू किलबिलाटच घडवून आणला. खरेच, आपण अशा बाबींकडे इतक्या मोकळ्या व प्रांजळपणे कधी बघतो का, हा प्रश्न त्यातून अधिकच गडद झाला.

सहज म्हणून हे छायाचित्र मी आमच्या साहित्यिक सुहृदाला, स्वानंद बेदरकर यांना पाठविले. त्यांनी लगेच त्यावर प्रसवले,‘कबुतरांना पडले कोडे, शांततेचे हे कुठले रूप?आरामखुर्चीचेही म्हणे, बसून बसून वाजले सूप...’

खरेच तर आहे, कबुतरांनाच काय; कुणाही सुजाण-संवेदनशील मनाला शांततेचे हे रूप कोड्यात टाकणारेच ठरावे. शांतता, निरवता, विसावा आदी. काहीही म्हणा, ते हवेहवेसे असले तरी कधी कधी ही शांतता व त्यातून येणारे रिकामपण मनाला खरवडणारेच ठरते. नदीकाठी बसून व पाण्याच्या प्रवाहात पाय सोडून आनंददायी शीत-शांती अनुभवण्याची परिस्थिती राहिली नाही. आता इतक्या कोलाहलाची सवय झालीय की शांतताही खायला उठते. आजची शांतता व त्यातून ओढवलेल्या विसाव्याला तर भयाची किनार आहे. आणि भय कसलेही असो, ते तर अस्वस्थ वर्तमानाच्या विटेवर अस्थिर भविष्याचा इमला उभारू पाहते. तेव्हा त्याला घाबरून चालत नाही. आत्मविश्वास व धीराच्या बळावर भयमुक्ती नक्कीच साधता येते. तेव्हा सद्यस्थितीत ‘कोरोनो’च्या संकटामुळे अनुभवास येणारे भय टाळून, स्वत:च्या, कुटुंबीयांच्या व समाजाच्याही स्वास्थ्यासाठी घरातच विसावणे गरजेचे ठरले आहे. ते सक्तीचे आहे, तसे सावधानतेसाठीचेही आहे. दारावर बसलेल्या कबुतरांचा सांगावाही तोच तर नसेल?

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या