शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

भोंदूबाबाचे भोळे बळी ! पाखंडाला मानवतेचे ढोंग जोडण्याचा प्रयत्न करणारा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 06:02 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती घोषित केली आहे

दिल्लीजवळ उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात सिकंदराराऊ येथे सत्संगावेळी चेंगराचेेंगरीत मरण पावलेले १२२ जण हे श्रद्धेच्या नावाखाली चाललेल्या अव्यस्थेचे निष्पाप बळी आहेत. नारायण साकार हरी ऊर्फ भोले बाबा नावाच्या भोंदूचे प्रवचन ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने आलेले भोळेभाबडे भक्त तो बुवा आलिशान गाडीत निघून जात असताना त्याच्या दर्शनासाठी तसेच त्याच्या वाटेवरची माती कपाळाला लावण्यासाठी वेड्यासारखे धावले. त्या बाबाच्या सेवादारांनी महिला, मुले अधिक असलेल्या भक्तांचा लोंढा निर्दयीपणे रोखला. परिणामी, चेंगराचेंगरी झाली. त्या बाबाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्पर्श, दर्शन मोक्ष देणार आहे असे समजून गर्दीच्या लोंढ्यात अनेकजण खाली पडले. बाकीच्यांनी बेभान होऊन त्यांच्या शरीरांचा व मृतदेहांचा चिखल बनविला.

हे इतके भयंकर होते की चोवीस तासांनंतरही अनेकांची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये महिला व मुले मोठ्या संख्येने आहेत. ही अत्यंत उद्विग्न करणारी दुर्घटना आहे. अशिक्षित, अंधश्रद्धांच्या जोखडांमध्ये अडकलेला समाज सार्वजनिक भान आणि सोबतच स्वत:च्या जीविताबद्दल किती बेफिकीर होऊ शकतो, याचे हे अत्यंत उद्विग्न करणारे उदाहरण आहे. तथापि, केवळ दुर्घटना म्हणून या बळींकडे पाहता येणार नाही. मुळात सत्संगाच्या निमित्ताने लाखो लोक एकत्र येणार हे माहिती असतानाही प्रशासनाने खबरदारी का घेतली नाही, आपल्यामागे लाख-दोन लाखांचा लोंढा धावतो आहे, हे लक्षात येऊनही स्वत:ला संत म्हणविणारा तो भोंदू बाबा थांबला का नाही, सेवादार म्हणविणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांनी जमावाची काळजी का घेतली नाही, आजूबाजूच्या शेतात उतारावर घसरून पडलेल्या व त्यांच्या अंगावरून इतर लोक धावत गेल्याने चेंदामेंदा झालेल्या भक्तांचा आकडा लपवून ठेवण्याचा प्रयत्न का झाला, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती घोषित केली आहे. तथापि, अशा समित्यांचे अहवाल काय असतात व त्यांचे पुढे काय होते, हे सर्वांनाच माहिती असल्याने या चेंगराचेंगरीत बळी गेलेल्यांना न्याय मिळण्याची कोणतीही शाश्वती नाही. आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे, तर पाखंडी बाबा गायब आहे. मानव मंगल मिशन असे नाव देऊन आपल्या पाखंडाला मानवतेचे ढोंग जोडण्याचा प्रयत्न करणारा हा भोले बाबा प्रत्यक्षात भोळा अजिबात नाही. मूळचा कासगंज जिल्ह्यातील बहादूरनगर गावचा रहिवासी असलेल्या या बाबाचे खरे नाव सूरजपाल जाटव. तो पोलिस खात्याच्या स्थानिक गुप्तचर विभागात शिपाई होता. नोकरीवर असताना विनयभंगाच्या आरोपात त्याला अटक झाली. तो निलंबित झाला. नंतर न्यायालयाच्या आदेशाने त्याला पुन्हा नोकरी मिळाली आणि ती मिळताच त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली. मग, त्याला परमेश्वरी साक्षात्कार झाला म्हणे. स्वत:चे नाव त्याने नारायण साकार हरी असे बदलून घेतले व तो प्रवचने झोडायला लागला. लोक त्याला भोले बाबा म्हणायला लागले.

यादरम्यान, अघाेरी उपचार प्रकरणात आग्रा येथे या बाबासह सातजणांवर गुन्हाही दाखल झाला होता. सबळ पुराव्याअभावी तो सुटला. इतर बाबांसारखा हा भोले बाबा सोशल मीडियावर नाही. त्याऐवजी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व हरयाणा या राज्यांच्या सीमाभागात म्हणजे राजधानीच्या दिल्लीच्या पूर्वेकडे व दक्षिणेकडे फरिदाबाद, पलवल, मथुरा, आग्रा, पिलिभित, अलीगढ, बुलंदशहर ते अगदी औरेया, कानपूर व ग्वाल्हेरपर्यंत गावोगावी त्याचे मोठे प्रस्थ आहे. मंगळवारच्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांमध्ये या चार राज्यांमधील तब्बल सोळा जिल्ह्यांचे भक्त आहेत, यावरूनच काय ते स्पष्ट व्हावे. एरव्ही अशी घटना घडली की काहूर माजते.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होते. परंतु, उत्तर प्रदेशात धर्माचे अधिकारी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत. त्यांचे विरोधक, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीच गेल्या वर्षी या बाबाच्या दरबारात हजेरी लावून भक्तांपुढे भाषण केले होते. त्यामुळे भाेले बाबाला शिक्षा होण्याची शक्यता नाही. त्यातही अशा विषयावर राजकारण नको, असे उपदेशाचे डोस योगींनी विरोधकांना पाजले आहेत. निरपराध, भोळ्याभाबड्या, श्रद्धाळू सामान्य माणसांच्या अशा शे-सव्वाशे बळींच्या मुद्द्यावर बोलायचे नसेल, मग राजकारण करायचे तरी कशावर, हे एकदा योगी व त्यांच्या भक्तांनी सांगून टाकायला हवे.