शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 07:27 IST

याआधीही अमेरिकेने पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, हक्कानी नेटवर्कसारख्या संघटनांनाही दहशतवादी म्हणून नामनिर्दिष्ट केले होते; परंतु केवळ घोषणांनी दहशतवाद संपत नाही, हे वास्तव भारताला वारंवार अनुभवायला मिळते.

अमेरिकेने नुकतेच ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केले. भारताने त्याचे स्वागत करत अमेरिकेचे आभार मानले आहेत. याआधीही अमेरिकेने पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, हक्कानी नेटवर्कसारख्या संघटनांनाही दहशतवादी म्हणून नामनिर्दिष्ट केले होते; परंतु केवळ घोषणांनी दहशतवाद संपत नाही, हे वास्तव भारताला वारंवार अनुभवायला मिळते.

अमेरिकेची दहशतवादासंदर्भातील भूमिका कायमच संदिग्ध आणि द्वैध राहिलेली आहे. एकीकडे ती पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर बंधने लादते आणि दुसरीकडे पाकिस्तानी सरकार आणि लष्कराचे दहशतवादाला प्रोत्साहन असल्याकडे डोळेझाक करून, त्या देशाला लष्करी मदत, विकास निधी आणि कुटनीतिक पाठबळही देते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धविराम झाल्यावर,  पाकिस्तानला ‘महान देश’ आणि ‘अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार’ संबोधले होते. अमेरिका एकाच वेळी दोन भिन्न धोरणांचा अवलंब करत असल्याचे त्यावरून स्पष्ट होते.

अमेरिकेवरील ९/११ हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन पाकिस्तानात लपून बसला होता. तरीही अमेरिकेने पाकिस्तान संदर्भातील भूमिका फारशी बदलली नाही. अमेरिकेचे हे दुटप्पी धोरण भारतासाठी अधिक धोकादायक ठरते; कारण पाक पुरस्कृत दहशतवादाचा मुख्य बळी भारतच ठरतो. जम्मू-काश्मीरमधील अस्थैर्य, भारत-पाक सीमेवरून घुसखोरी, भारतातील फुटिरांना शस्त्रास्त्र पुरवठा, जम्मू-काश्मिरातील स्थानिक तरुणांमधील कट्टरपंथाचे आकर्षण, यामागे पाकिस्तान प्रेरित दहशतवादच आहे. पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादी संघटनांसंदर्भात अमेरिकेने केवळ घोषणात्मक पातळीवर कठोर भूमिका घेतल्याचा फारसा उपयोग होणार नाही, हे स्पष्ट आहे.

प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील जबाबदार संघटनेस दहशतवादी ठरवण्यासाठी अमेरिकेकडे धाव घेतो, संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर हालचाल करतो; पण अशा संघटनांचे अस्तित्व फारसे डळमळीत होत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. पाकिस्तानातील सरकार आणि लष्कर अशा संघटनांना पाठबळ देतच राहतात. हाफिज सईद किंवा मसूद अझहर सारख्या दहशतवादी म्होरक्यांना काही काळ नजरकैदेत ठेवल्याचे नाटक होते आणि दबाव घटताच ते पुन्हा पाकिस्तानात मुक्त संचार करत भारताच्या विरोधात गरळ ओकतात, दहशतवादाचे प्रशिक्षण देतात!

अमेरिका, चीन, रशियासारखे बडे देश स्वहित जपण्यासाठी दहशतवादविरोधी भूमिकेत तडजोडी करताना दिसतात. हा पूर्वानुभव लक्षात घेता, भारताला दहशतवादाच्या विरोधातील लढाई स्वबळावरच लढावी लागेल. अमेरिका, युरोपियन संघ किंवा संयुक्त राष्ट्रांच्या घोषणांवर विश्वास ठेवून आपण सुरक्षित झाल्याचे मानणे धोकादायक आहे. अमेरिकेने अफगाणिस्तान, इराक, लिबिया, सीरिया इत्यादी देशांमध्ये स्वार्थासाठी वेळोवेळी हस्तक्षेप केला. त्याचे भीषण परिणाम तर त्या देशांतील जनतेला भोगावे लागलेच; पण त्यामुळे जगभर दहशतवादाचा आगडोंबही उसळला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अमेरिका इतर कोणत्याही देशाची हितचिंतक असल्याचे म्हणताच येत नाही. आता तर युरोपातील देशांनाही तसा अनुभव येऊ लागला आहे. त्या देशाला स्वत:च्या स्वार्थापलीकडे काहीही दिसत नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. अशा परिस्थितीत भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर दहशतवादाचा मुद्दा सातत्याने, प्रभावीपणे मांडत राहणे गरजेचे आहेच; परंतु त्याचबरोबर गुप्तचर यंत्रणा व सेनादलांचे आधुनिकीकरण, सीमावर्ती भागातील सुरक्षा, सायबर सुरक्षा, स्थानिक तरुणांचे मनोबल आणि रोजगार वाढविणे, याकडेही लक्ष द्यावे लागेल.

दहशतवाद ही केवळ बंदुकीची समस्या नाही. ती सामाजिक, मानसिक, धार्मिक आणि आर्थिक पातळीवर निर्माण झालेली गुंतागुंत आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रे केवळ सामरिक आणि राजकीय गरजांनुसार भूमिका घेतात. भारतानेही यापुढे आपले दीर्घकालीन हित लक्षात घेऊनच परराष्ट्र धोरण आखावे. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मैत्री किंवा वैर शाश्वत नसते, तर स्थिती आणि स्वार्थावर आधारित असते. त्यामुळे अमेरिकेवर संपूर्णपणे विसंबणे भारतासाठी शहाणपणाचे ठरणार नाही. अमेरिकेने पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांना काळ्या यादीत घालणे स्वागतार्हच; पण त्यावर अवलंबून न राहता, भारताने आपल्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम बनवणे, हाच या संदर्भातला खरा धडा ठरेल.

टॅग्स :IndiaभारतTerrorismदहशतवादAmericaअमेरिका