शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

नकाशामुळे बिघडलं वातावरण; पण भारत-नेपाळ संबंधात कटुता येण्यामागचं नेमकं काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 06:25 IST

भारत आणि नेपाळमधले मधुर संबंध बिघडायला लागलेले आहेत. त्यामागे नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारला असलेली चिनी फूस, हे कारण असले तरी भारताने सामंजस्याने चर्चेद्वारे द्विपक्षीय मतभेदांचे उच्चाटन करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

नेपाळसारखा दुबळा आणि अनेक बाबतीत भारतावर अवलंबून असलेला देश सीमावाद उकरून काढत आपल्याला आव्हान देऊ लागला असल्याची नोंद याच स्तंभातून याआधी घेण्यात आली होती. आता नेपाळने संघर्षाच्या दिशेने आणखीन काही पावले टाकली आहेत. त्या देशाच्या संसदेने एक घटनादुरुस्ती विधेयक एकमताने संमत करून देशाच्या नव्या नकाशाला मान्यता दिलेली आहे. या नकाशात असा भूभाग आहे, जो प्रत्यक्षात भारतात आहे. दोन्ही देशांदरम्यानचे शेकडो वर्षांचे ऋणानुबंध नेपाळी सांसदांना या धाडसापासून परावृत्त करू शकलेले नाहीत. अर्थातच यामागे चिनी चिथावणी आहे. नेपाळचे पंतप्रधान ओली आणि त्यांचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष चीनच्या इशाऱ्यावर चालतो, हे आता गुपित राहिलेले नाही.

ओली यांची लोकप्रियता हल्ली कमालीची घसरली होती, पण या नकाशाच्या निमित्ताने त्यांनी भारतविरोधी वातावरण तयार करून आपल्या मागे लोकमत उभे केले आहे. भारताने विचारपूर्वक पावले टाकली असती तर ओली यांना ही संधी लाभलीच नसती. नेपाळी प्रसारमाध्यमांच्या म्हणण्याप्रमाणे, भारताच्या पंतप्रधानांना १९ मे रोजी नेपाळी पंतप्रधानांशी संवाद साधायचा होता. या संवादातून तप्त वातावरण शमले असते. मोदी यांनी याआधीही थेट हस्तक्षेप करत द्विपक्षीय संबंध सुधारण्यास मदत केली होती, पण कोविडविरोधी उपाययोजनेत गुंतल्यामुळे असेल, मोदी यांनी संवादाचा बेत लांबणीवर टाकला. परिणामी इतके दिवस नवा नकाशा आणायचे मनसुबे बोलून दाखविणाऱ्या नेपाळने २० मे रोजी नकाशा सार्वजनिक अवलोकनार्थ प्रकाशितही केला. २६ मे रोजी त्याला सर्वपक्षीय बैठकीत मान्यता मिळाली आणि ३१ मे रोजी नेपाळी संसदेच्या एकमुखी संमतीची मोहर लागली.
नेपाळचे हे कृत्य आततायी असले तरी भारताकडेही बराच दोष जातो, हे मान्य करावे लागेल. दोन्ही देशांदरम्यान असलेल्या सीमावादातले ९८ टक्के मुद्दे गेल्या २६ वर्षांतील चर्चेने निकालात काढलेले आहेत. तरीही काही विवादास्पद भूभाग आहेत. विशेषत: कालापानी आणि सुस्ता या परिसरासंदर्भात नेपाळ सरकारच्या भावना तीव्र आहेत. त्यावर चर्चा व्हावी असा आग्रह तो देश गेले काही महिने सातत्याने धरत आलेला आहे. मात्र, भारताची घाईघाईत चर्चा करायची तयारी नव्हती. त्यावर नेपाळने आक्रमक पवित्रा घेतला. त्यासाठी त्या देशाला निमित्त मिळाले ते भारताच्या संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लिपुलेखा-मानसरोवर रस्त्याचे. गेले एक तप या रस्त्याचे बांधकाम चालू असताना नेपाळने साधी हरकतही घेतली नव्हती, पण यावेळी मात्र पंतप्रधान ओली यांच्यासह सगळेच सत्ताधारी भारतावर तुटून पडले.

त्याआधी गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात जम्मू-काश्मीरचा खास दर्जा काढत त्या राज्याचे विभाजन झाल्यानंतर भारताने आपला जो नकाशा प्रसिद्ध केला होता, त्यात भारत-नेपाळदरम्यानची नैसर्गिक सीमा असलेल्या काली नदीचा नामोल्लेख टाळला होता. त्यावरूनही नेपाळमध्ये वातावरण तप्त ठेवण्यात ओली यांनीच पुढाकार घेतला होता. नेपाळी पंतप्रधानांची पावले ओळखण्यात केंद्र सरकार कमी पडले की, भारताच्या आढ्यतेतून विसंवादाला वाव मिळालाय, हे सांगणे अवघड असले तरी एक जुना सोबती आपण गमावण्याच्या बेतात आहोत, हे नक्की.
आपल्याला हवा तसा नकाशा पाकिस्तान आणि चीनही प्रसिद्ध करत असतात, पण हे दोन देश आणि नेपाळ यांत फरक आहे. भारत आणि नेपाळच्या सैन्यदलांमधले संबंध अत्यंत घनिष्ट आहेत. गुरखा सैनिकांनी वेळोवेळी भारतासाठी प्राणांची आहुती दिलीय. आपले सरसेनापती नेपाळी सैन्याचेही मानद जनरल असतात आणि त्या देशाच्या सरसेनापतीला आपल्या सैन्यानेही तो बहुमान दिलेला आहे. नेपाळवरच्या कोणत्याही आपत्तीत पहिल्याप्रथम धावून जातो तो भारतच. आताही कोविडकाळात भारताने नेपाळला आपत्ती निवारणासाठी तब्बल २५ टन औषधे पुरवली आहेत. छोटा भाऊ म्हणूनच नेपाळकडे भारत पाहात आला आहे. कुणाच्या तरी चिथावणीने हे संबंध भाऊबंदकीत परावर्तित होत असतील तर सावध होण्याची जबाबदारी मोठ्या भावाचीच नाही का?

 

टॅग्स :NepalनेपाळchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदी