शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जा, जी ले अपनी जिंदगी !; अपेक्षा फिल्मी नव्हे, वास्तवच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 07:54 IST

मुलांप्रमाणेच मुलींच्या लग्नाचेही किमान वय २१ करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारच्या बैठकीत मान्य केला. तसे विधेयक संसदेत सादर होईल आणि त्यावर मोहोर उमटली की कायदा येईल.

मुलांप्रमाणेच मुलींच्या लग्नाचेही किमान वय २१ करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारच्या बैठकीत मान्य केला. तसे विधेयक संसदेत सादर होईल आणि त्यावर मोहोर उमटली की कायदा येईल. त्यासाठी १९५४ चा विशेष विवाह कायदा, १९५५ चा हिंदू विवाह कायदा आणि २००६ च्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यात सुधारणा केल्या जातील. या निर्णयाशी स्त्री-पुरुष समानतेसह अनेक चांगल्या गोष्टी निगडित आहेत आणि सरकार किमान असा कायदा करण्याच्या मानसिकतेत असणेदेखील कमी महत्त्वाचे नाही. बालविवाह, कमी वयात लादले जाणारे मातृत्व, ती अल्पवयीन माता व तिच्या उदरात वाढणारा गर्भ या दोन्हींचे कुपोषण, रक्तक्षयासारखे अडथळे, बाळ व बाळंतिणींचे मृत्यू, आरोग्यावरील दुष्परिणाम, अर्भक मृत्युदर, माता मृत्युदर अशा अनेक बाबींचा विचार करता, लग्नाचे वय वाढविण्याचा निर्णय योग्यरीत्या अमलात आला तर तो क्रांतिकारी ठरेल. 

ॲनिमिया हा महिलांचा, विशेषत: अल्पवयीन मुलींचा मोठा शत्रू ! त्यात अशा अशक्त, कोवळ्या मुलींची लग्ने उरकून आपण त्यांना मुले जन्माला घालण्याच्या कामाला जुंपतो आहोत. एकदा त्या या चक्रात अडकल्या की त्यातच त्यांचे आयुष्य संपून जाते. वरवर पाहता देशातील बालविवाहांचे प्रमाण २०१५-१६ च्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या तुलनेत ताज्या सर्वेक्षणात २७ टक्क्यांवरून २३ टक्के असे चार टक्क्यांनी घसरलेले दिसत असले, तरी ही पाहणी कोरोना महामारीच्या आधीची आहे. २०२० मध्ये बालविवाहात तब्बल ५० टक्क्यांची चिंताजनक वाढ झाली. कारण ‘मुलगी शिकली - प्रगती झाली,’ वगैरे घोषणा सरकारी भिंतीवरच राहिल्या. बापासाठी ओझे बनलेल्या मुलींच्या हातावर कोवळ्या वयात मेंदी निघतच राहिली. मुलगी म्हणजे खानदानाची इभ्रत वगैरे मानणाऱ्यांनी ती शिकत राहिली तर कुठेतरी पाय घसरेल, वगैरे खुळचट कल्पना जोपासल्या. आपला समाज मुलींना चूल आणि मूल या दुष्टचक्रात अडकवतच गेला. 

जोडीला आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना होणाऱ्या विरोधाने राजकीय स्वरूप धारण केल्यामुळे आयुष्याचा जोडीदार निवडण्याची नैसर्गिक प्रक्रियाच कुंठित झाली. तेव्हा, महिलांच्या सशक्तीकरणाच्या मुळाशी असलेल्या समस्येची ही गुंतागुंत सोडविण्यात नव्या कायद्याची मदत होईल. अर्थात, केवळ कायदा केल्याने समस्या चुटकीसरशी सुटेल, असेही नाही. त्याचे कारण घोड्यावरून दौडत येणाऱ्या राजकुमाराची स्वप्ने पडण्याच्या वयात, शाळेतच मुलामुलींना लैंगिक शिक्षण, त्यासाठी घराघरांत, शाळा-महाविद्यालयांमध्ये जागृती, कोवळ्या मुलांना शरीर व प्रजनन पद्धतीची वैज्ञानिक माहिती देण्याच्या आघाडीवर आपण सपशेल अपयशी ठरलो आहोत. 

शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाचा विषय आपण नैतिकतेशी, काय चांगले व काय वाईट ठरविण्याच्या आपल्या जुनाट संकल्पनांशी जोडला आहे. ज्या मुलांसमोर टीव्ही, मोबाईलच्या पडद्यांवर सारे काही बीभत्स लैंगिक प्रकार दिसत असताना, पॉर्न फिल्मस‌्चा सुळसुळाट झालेला असताना, पालक व अवतीभवतीच्या वयाने मोठ्या मंडळींच्या डोळ्यांवर मात्र दांभिकतेची झापड आहे. ती दूर सारायला हवी. लग्नाचे व मातृत्वाचे वय पुढे गेले तरच मुलींना शिक्षण, करिअरच्या अधिक संधी मिळतील. त्या परिश्रमांसाठी त्यांना मोकळे अवकाश उपलब्ध होईल. शिकून त्या कमावत्या झाल्या की त्यांच्यात प्रगल्भता येईल. व्यावहारिक जगात आयुष्याचा अधिक अनुरूप जोडीदार निवडण्याची समज त्यांना आपोआप येईल. थोडक्यात, कोवळ्या, नासमज वयात पायांत अडकविल्या जाणाऱ्या लग्न नावाच्या साखळदंडापासून त्यांची सुटका होईल. आर्थिकदृष्ट्या त्या स्वावलंबी होतील. पुरुषांसोबतच त्याही कमावत्या असल्या तर कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत त्यांच्या शब्दाला मान मिळेल. अंतिमत:  खऱ्या अर्थाने समानता येईल. महिला म्हणजे समाजाचे निम्मे आकाश. ते असे सबळ झाले की समाज बलवान होईल.

तसेही आता अशा प्रतिष्ठेने जगण्याचा ध्यास घेतलेल्या शहरी मुली पंचविशीच्या पुढेच लग्नाचा विचार करतात. हे पाहता हा नवा कायदा व त्याला जोडून समाजात आवश्यक जागृतीचा अधिक फायदा दुबळ्या वर्गाला, झोपडपट्ट्या, ग्रामीण व आदिवासी भागांत राहणाऱ्या मुलींना अधिक होईल. गरिबांच्या मुलींना अधिक शिक्षण मिळू शकेल आणि शिकली-सवरलेली मुलगी माहेर व सासर दोन्हींकडील अज्ञानाचा, निरक्षरतेचा अंधकार दूर करील. कर्मठ समाजाने या मुलींचा हात जरा सोडून त्यांना ‘जा सिमरन, जी ले अपनी जिंदगी,’ असे म्हणावे, ही अपेक्षा फिल्मी नव्हे, वास्तवच आहे !

टॅग्स :marriageलग्नIndiaभारत