शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

जा, जी ले अपनी जिंदगी !; अपेक्षा फिल्मी नव्हे, वास्तवच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 07:54 IST

मुलांप्रमाणेच मुलींच्या लग्नाचेही किमान वय २१ करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारच्या बैठकीत मान्य केला. तसे विधेयक संसदेत सादर होईल आणि त्यावर मोहोर उमटली की कायदा येईल.

मुलांप्रमाणेच मुलींच्या लग्नाचेही किमान वय २१ करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारच्या बैठकीत मान्य केला. तसे विधेयक संसदेत सादर होईल आणि त्यावर मोहोर उमटली की कायदा येईल. त्यासाठी १९५४ चा विशेष विवाह कायदा, १९५५ चा हिंदू विवाह कायदा आणि २००६ च्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यात सुधारणा केल्या जातील. या निर्णयाशी स्त्री-पुरुष समानतेसह अनेक चांगल्या गोष्टी निगडित आहेत आणि सरकार किमान असा कायदा करण्याच्या मानसिकतेत असणेदेखील कमी महत्त्वाचे नाही. बालविवाह, कमी वयात लादले जाणारे मातृत्व, ती अल्पवयीन माता व तिच्या उदरात वाढणारा गर्भ या दोन्हींचे कुपोषण, रक्तक्षयासारखे अडथळे, बाळ व बाळंतिणींचे मृत्यू, आरोग्यावरील दुष्परिणाम, अर्भक मृत्युदर, माता मृत्युदर अशा अनेक बाबींचा विचार करता, लग्नाचे वय वाढविण्याचा निर्णय योग्यरीत्या अमलात आला तर तो क्रांतिकारी ठरेल. 

ॲनिमिया हा महिलांचा, विशेषत: अल्पवयीन मुलींचा मोठा शत्रू ! त्यात अशा अशक्त, कोवळ्या मुलींची लग्ने उरकून आपण त्यांना मुले जन्माला घालण्याच्या कामाला जुंपतो आहोत. एकदा त्या या चक्रात अडकल्या की त्यातच त्यांचे आयुष्य संपून जाते. वरवर पाहता देशातील बालविवाहांचे प्रमाण २०१५-१६ च्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या तुलनेत ताज्या सर्वेक्षणात २७ टक्क्यांवरून २३ टक्के असे चार टक्क्यांनी घसरलेले दिसत असले, तरी ही पाहणी कोरोना महामारीच्या आधीची आहे. २०२० मध्ये बालविवाहात तब्बल ५० टक्क्यांची चिंताजनक वाढ झाली. कारण ‘मुलगी शिकली - प्रगती झाली,’ वगैरे घोषणा सरकारी भिंतीवरच राहिल्या. बापासाठी ओझे बनलेल्या मुलींच्या हातावर कोवळ्या वयात मेंदी निघतच राहिली. मुलगी म्हणजे खानदानाची इभ्रत वगैरे मानणाऱ्यांनी ती शिकत राहिली तर कुठेतरी पाय घसरेल, वगैरे खुळचट कल्पना जोपासल्या. आपला समाज मुलींना चूल आणि मूल या दुष्टचक्रात अडकवतच गेला. 

जोडीला आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना होणाऱ्या विरोधाने राजकीय स्वरूप धारण केल्यामुळे आयुष्याचा जोडीदार निवडण्याची नैसर्गिक प्रक्रियाच कुंठित झाली. तेव्हा, महिलांच्या सशक्तीकरणाच्या मुळाशी असलेल्या समस्येची ही गुंतागुंत सोडविण्यात नव्या कायद्याची मदत होईल. अर्थात, केवळ कायदा केल्याने समस्या चुटकीसरशी सुटेल, असेही नाही. त्याचे कारण घोड्यावरून दौडत येणाऱ्या राजकुमाराची स्वप्ने पडण्याच्या वयात, शाळेतच मुलामुलींना लैंगिक शिक्षण, त्यासाठी घराघरांत, शाळा-महाविद्यालयांमध्ये जागृती, कोवळ्या मुलांना शरीर व प्रजनन पद्धतीची वैज्ञानिक माहिती देण्याच्या आघाडीवर आपण सपशेल अपयशी ठरलो आहोत. 

शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाचा विषय आपण नैतिकतेशी, काय चांगले व काय वाईट ठरविण्याच्या आपल्या जुनाट संकल्पनांशी जोडला आहे. ज्या मुलांसमोर टीव्ही, मोबाईलच्या पडद्यांवर सारे काही बीभत्स लैंगिक प्रकार दिसत असताना, पॉर्न फिल्मस‌्चा सुळसुळाट झालेला असताना, पालक व अवतीभवतीच्या वयाने मोठ्या मंडळींच्या डोळ्यांवर मात्र दांभिकतेची झापड आहे. ती दूर सारायला हवी. लग्नाचे व मातृत्वाचे वय पुढे गेले तरच मुलींना शिक्षण, करिअरच्या अधिक संधी मिळतील. त्या परिश्रमांसाठी त्यांना मोकळे अवकाश उपलब्ध होईल. शिकून त्या कमावत्या झाल्या की त्यांच्यात प्रगल्भता येईल. व्यावहारिक जगात आयुष्याचा अधिक अनुरूप जोडीदार निवडण्याची समज त्यांना आपोआप येईल. थोडक्यात, कोवळ्या, नासमज वयात पायांत अडकविल्या जाणाऱ्या लग्न नावाच्या साखळदंडापासून त्यांची सुटका होईल. आर्थिकदृष्ट्या त्या स्वावलंबी होतील. पुरुषांसोबतच त्याही कमावत्या असल्या तर कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत त्यांच्या शब्दाला मान मिळेल. अंतिमत:  खऱ्या अर्थाने समानता येईल. महिला म्हणजे समाजाचे निम्मे आकाश. ते असे सबळ झाले की समाज बलवान होईल.

तसेही आता अशा प्रतिष्ठेने जगण्याचा ध्यास घेतलेल्या शहरी मुली पंचविशीच्या पुढेच लग्नाचा विचार करतात. हे पाहता हा नवा कायदा व त्याला जोडून समाजात आवश्यक जागृतीचा अधिक फायदा दुबळ्या वर्गाला, झोपडपट्ट्या, ग्रामीण व आदिवासी भागांत राहणाऱ्या मुलींना अधिक होईल. गरिबांच्या मुलींना अधिक शिक्षण मिळू शकेल आणि शिकली-सवरलेली मुलगी माहेर व सासर दोन्हींकडील अज्ञानाचा, निरक्षरतेचा अंधकार दूर करील. कर्मठ समाजाने या मुलींचा हात जरा सोडून त्यांना ‘जा सिमरन, जी ले अपनी जिंदगी,’ असे म्हणावे, ही अपेक्षा फिल्मी नव्हे, वास्तवच आहे !

टॅग्स :marriageलग्नIndiaभारत