शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

संपादकीय - उद्ध्वस्त स्वप्नांची हाक, अतिवृष्टीने बळीराजाच्या डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 09:57 IST

कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. महसूल व कृषी खात्यात समन्वय नाही.

सत्तांतराचा पोरखेळ संपला असेल, सुप्रीम कोर्टातील खटल्यातील युक्तिवादाची तयारी झाली असेल किंवा एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढून झाल्या असतील तर राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने राज्याच्या अनेक भागावर कोसळलेल्या अस्मानी संकटाकडे लक्ष द्यायला हरकत नाही. कारण, अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे भयंकर चित्र समोर येत आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार तब्बल ९ लाख हेक्टरपेक्षा अधिक शेती पाण्याखाली आहे. पिके हातातून गेल्यातच जमा आहेत. पुराचा फटका न बसलेल्या भागात गोगलगायींनी सोयाबीन फस्त केले आहे. मोठ्या प्रमाणात शेतजमीन खरडून गेली आहे. तिच्या दुरुस्तीसाठी मदतीची गरज आहे. हेक्टरी ६,८०० रुपये म्हणजे एकराला जेमतेम दोन हजार सातशे रुपये हा मदतीचा निकष तातडीने बदलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची दैना झाली आहे. मात्र, मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवून धीर देणारे, संकटाला हिमतीने सामोरे जाण्यासाठी उमेद वाढविणारे कोणी दिसत नाही. पंचवीस दिवस झाले तरी राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, असे दोघेच मंत्री आहेत. सगळी खाती दोघे मिळून पाहात आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे.

कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. महसूल व कृषी खात्यात समन्वय नाही. दोन्ही खात्यांनी नजरअंदाजाने काढलेले नुकसानीचे आकडेदेखील एकसारखे नाहीत. अनेक जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष नुकसानापेक्षा कितीतरी कमी आकडे दिले जात आहेत. अशावेळी लोकप्रतिनिधींनी दोन्ही खात्यांना समोरासमोर बसवायला हवे, अधिकाऱ्यांना खडसावून जाब विचारायला हवा. परंतु, ही मंडळी सध्याची सत्ता आणि भविष्यातील आडाख्यांच्या खेळात गुंतली आहे. मोजकेच अधिकारी चिखल तुडवत प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचत आहेत तर हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार-खासदार घरांची पडझड व शेतीच्या नासाडीने उद्ध्वस्त झालेल्या आपदग्रस्तांना धीर देताना दिसत आहेत. खरे पाहता राज्यातील नव्या सत्ताधाऱ्यांनी सुरुवात खूपच आशादायक केली होती. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस तातडीने गडचिरोलीत पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी पोहचले. हवामान चांगले नसल्याने त्यासाठी ते नागपूरवरून गडचिरोलीला हेलिकॉप्टरऐवजी रस्त्याने गेले. तेव्हा, लोकांना खरोखर आनंद झाला. आधीच्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने एकप्रकारे शिंदे यांनी पालकत्व निभावले, अशा सुखद प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले तेव्हा उपमुख्यमंत्र्यांनी वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याच्या पूरस्थितीची धावती पाहणी केली. पण, त्यावेळी एका मोठ्या अस्मानी संकटाची खरेतर फक्त सुरुवात झाली होती. त्यानंतरचे १५ दिवस विदर्भ, मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला. नद्या-नाल्यांना पूर आले. राज्यात शंभरावर बळी गेले. पेरणी झालेली शेती पाण्याखाली गेली. शेती नासली, पिके सडली, कापूस गेला, सोयाबीन गेले, धानाची रोवणी फसली. अजूनही नजर जाईल तिथपर्यंत शिवारात पाणीच पाणी दिसते. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यात शेताची अशी नासाडी बघून अमित मोरे नावाच्या अवघ्या वीस वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने पिकांवर फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक शेतातच स्वत:च्या घशात ओतले. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनीही अशीच महापुरामुळे झालेली शेतीची नासाडी पाहून आत्महत्या केली होती. अमित हा अशा हजारो, लाखो शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. अस्मान कोपले असताना कोणी वाली नाही, आपण निराधार, निराश्रित असल्याची भावना लाखो शेतकऱ्यांमध्ये आहे. अशावेळी लोकप्रतिनिधी, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, शेतकऱ्यांसोबत बांधावर दिसायला हवेत. काल-परवापर्यंत जे लाल दिव्यांच्या गाडीत फिरत होते, त्यांनी तो दिवा गेला म्हणून दु:खी न होता आणि मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या नव्या सत्तावर्तुळातील सगळ्या आमदारांनी लाल दिव्याची वाट न पाहता अस्मानी संकटात लोकांना धीर द्यायला हवा. काहीजण ते करताहेत. पण, खरी जबाबदारी राज्य सरकारची आहे. सत्तेसाठी राजकीय नाट्य झाले असले तरी आपले सरकार लोकाभिमुख आहे, हे सिद्ध करायला हवे. शेतीची भयंकर हानी पाहता सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करायला हवा. जेणेकरून दुष्काळी मदतीचे निकष सगळ्यांनाच लागू होतील. 

टॅग्स :Rainपाऊसchandrapur-acचंद्रपूरfloodपूरEknath Shindeएकनाथ शिंदे