शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
4
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूम शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
5
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
6
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
7
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
8
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
9
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
10
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
11
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
12
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
13
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
14
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
15
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
16
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
17
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
18
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
20
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित

भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 06:22 IST

भैरप्पा हे विलक्षण प्रतिभेचे लोकप्रिय लेखक खरेच, मात्र गेल्या दशकातले त्यांचे रूप वेगळे होते. त्यांच्या कादंबऱ्या समारोपाला ज्याप्रमाणे अनपेक्षित वळण घेत, तसेच काहीसे त्यांचेही झाले

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी एस. एल. भैरप्पा आले होते. एका प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, ‘मी मूळचा मराठी आहे. पण कन्नडमध्ये लेखन करतो, असाच माझ्याबद्दल कर्नाटकमध्ये समज आहे!’ भैरप्पा हे मराठीच वाटावेत, एवढे त्यांचे मराठी माणसाशी घट्ट नाते होते. कर्नाटकनंतर त्यांचे सर्वाधिक चाहते महाराष्ट्रामध्येच होते. भैरप्पा गेल्यानंतर एक मोठा लेखक गेला, ही तर भावना मराठी माणसांची आहेच; पण त्याचवेळी आपल्या जवळचा माणूस गेला, असे दुःख आहे! ज्यांना वाचनाची आवड आहे, अशा मराठी घरात भैरप्पांची पुस्तकं नाहीत, असे शक्यतो होत नाही. ‘वंशवृक्ष’, ‘पर्व’, ‘जा ओलांडुनी’, ‘धर्मश्री’, ‘तंडा’, ‘काठ’, ‘सार्थ’, ‘मंद्र’, ‘तंतू’, ‘आवरण’, ‘सत्य आणि सौंदर्य’ यासारख्या त्यांच्या अनेक कादंबऱ्या आणि वैचारिक ग्रंथही मराठीत अनुवादित झाले. अनुवादाचे श्रेय उमा कुलकर्णी यांचे !

भैरप्पा गेले तेव्हा ९४ वर्षांचे होते. काळाचा मोठा तुकडा त्यांच्या वाट्याला आला. साठच्या दशकात त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि २०१७मध्ये त्यांची शेवटची कादंबरी आली. काळ बदलत गेला, मात्र भैरप्पांची लोकप्रियता तशीच राहिली. लोक वाचत नाहीत, असे म्हटले जात असताना, त्यांची पुस्तके मात्र बाजारात येताक्षणी विकली जात. भैरप्पांचे आयुष्य हाच खरे म्हणजे कादंबरीचा विषय. न कळत्या वयात आईचे छत्र हरपले. प्लेगच्या साथीत आई-भावंडे असे सगळेच गेल्यानंतर हा अनाथ मुलगा दिसेल त्या वाटेने भटकत राहिला आणि उत्तुंग प्रतिभेचा लेखक झाला. विचारवंत प्राध्यापक झाला. हा प्रवास सोपा नव्हता. पोटासाठी मुंबई गाठली. रेल्वेत पडेल ती कामे केली.  शिक्षणासाठी कर्नाटकात परतल्यानंतर हा मुलगा स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतो काय, पुढे तत्त्वचिंतनामध्ये रमतो काय, तत्त्वज्ञानामध्ये डॉक्टरेट मिळवतो काय, हा सगळाच प्रवास चित्तथरारक. भैरप्पांच्या आत्मचरित्रात हा सगळा प्रवास येतो.

मुक्काम करण्यावर त्यांचा विश्वास कधीच नव्हता. ते कायम स्वतःला प्रवासी आणि पर्यटक मानत आले. विघटन झाल्यानंतर रशियामध्ये गेले. पेरूमध्ये गेले. मानवी संस्कृतीचा शोध घेत राहिले. हस्तिदंती मनोऱ्यात भैरप्पा कधी रमले नाहीत. ते भटकत राहिले. ‘माणूस’ हा त्यांच्या विचारप्रक्रियेचा केंद्रबिंदू होता. कुतूहल ही त्यांच्या लेखनाची प्रेरणा होती. त्यामुळेच त्यांना रामायण-महाभारताइतकाच सोव्हिएत रशियाच्या विघटनामध्येसुद्धा रस होता. आपल्या गावातल्या शेतमजुराइतकाच व्हिएतनाममधील माणूस त्यांना जवळचा वाटत असे. त्यातून ते नवनव्या गोष्टींकडे कुतूहलाने पाहात राहिले. त्याविषयी लिहित राहिले. फार वेगळ्या प्रकारचे जगणेही त्यांच्या वाट्याला आले! त्यातून त्यांच्या लेखनाचा एक वेगळा पोत तयार झालेला दिसतो. जमिनीवरचे आयुष्य आणि तत्त्वज्ञानाची जोड यामुळे त्यांच्या लेखनाने विलक्षण उंची गाठली. त्यांच्यापूर्वी ‘महाभारता’वर अनेकांनी लिहिले. मात्र, भैरप्पांनी जे लिहिले, ते अविस्मरणीय ठरले. याचे कारणही हेच.

समाजशास्त्रीय आणि मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांनी महाभारताकडे पाहिले. त्यासाठी द्वारकेपासून ते कुरूक्षेत्रापर्यंत अनेक ठिकाणी ते स्वतः भटकले. त्या अभ्यासातून आणि तत्त्वचिंतनातून ‘पर्व’ साकारली. महाभारताला त्यामुळे मानवी चेहरा मिळाला. अशा नजरेने महाभारतातील व्यक्तिरेखांकडे तोवर कोणी पाहिले नव्हते. हे अनेक कादंबऱ्यांबद्दल सांगता येणे शक्य आहे. ‘दाटू’ ही त्यांची अशीच गाजलेली कादंबरी. चौदा भारतीय भाषांमध्ये तिचा अनुवाद झाला. जातीव्यवस्थेचे इतके पापुद्रे त्यांनी बारीकसारीक प्रसंगांतून उलगडून दाखवले आहेत की, थक्क व्हायला होते. भैरप्पा हे कन्नडमधील सर्वात लोकप्रिय लेखक. त्यांच्या पुस्तकांचे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले. त्यांच्या ‘आवरण’  या कादंबरीच्या दहा आवृत्त्या अवघ्या पाच महिन्यांत आल्या. भारतीय साहित्यातील हा विक्रम मानला जातो. ‘उत्तरकांड’ ही त्यांची अखेरची कादंबरी. ती ‘रामायणा’वर आहे. हे पुस्तक आले आणि काही तासांमध्ये सगळ्या प्रती विकल्या गेल्या. भैरप्पांच्या अनेक कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले. त्या चित्रपटांनाही अनेक पुरस्कार मिळाले. भैरप्पा हे विलक्षण प्रतिभेचे लोकप्रिय लेखक खरेच, मात्र गेल्या दशकातले त्यांचे रूप वेगळे होते. त्यांच्या कादंबऱ्या समारोपाला ज्याप्रमाणे अनपेक्षित वळण घेत, तसेच काहीसे त्यांचेही झाले. मात्र, या लेखकाने,  त्यांच्या प्रत्येक कादंबरीने वाचकांना श्रीमंत केले. भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही!

English
हिंदी सारांश
Web Title : Bhairappa's literary legacy: A timeless contribution to Indian literature.

Web Summary : S.L. Bhairappa, a renowned Kannada writer with Marathi roots, passed away, leaving behind a rich literary legacy. His translated works explored Indian society, philosophy, and mythology, captivating readers across Maharashtra and beyond. His impact on literature remains profound.