कर्तव्यनिष्ठ, लोकाभिमुख डॉ. शंकरराव चव्हाण
By Admin | Updated: July 14, 2016 02:33 IST2016-07-14T02:33:05+5:302016-07-14T02:33:05+5:30
राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद आणि विधानसभा अशा केंद्र व राज्यातील चारही प्रतिनिधीगृहांचे सन्माननीय सभासद राहिलेले शंकरराव चव्हाण १९५२ ते २००२ असे एकूण ५० वर्षे सत्तेत होते़

कर्तव्यनिष्ठ, लोकाभिमुख डॉ. शंकरराव चव्हाण
राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद आणि विधानसभा अशा केंद्र व राज्यातील चारही प्रतिनिधीगृहांचे सन्माननीय सभासद राहिलेले शंकरराव चव्हाण १९५२ ते २००२ असे एकूण ५० वर्षे सत्तेत होते़ कोणालाही हेवा वाटावा, अशीच त्यांची उज्ज्वल राजकीय कारकीर्द होती़ सत्ता ही बहुजन हितार्थ राबवावी हा थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी दिलेला कानमंत्र शंकररावजींनी अखेरपर्यंत सांभाळला़ सत्तेसाठी कधीही मुद्दाम प्रयत्न केले नाहीत की लाजीरवाण्या खटपटी केल्या नाहीत़ त्यांचे नेतृत्वच इतके विलक्षण होते की, पदे त्यांच्याकडे अक्षरश: आपणहून चालत आली़ निष्कलंक चारित्र्य हे त्यांचे बलस्थान राहिले़
कुटुंबात कुठलाही राजकीय वारसा नसताना शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या शंकररावजींची राजकीय कारकीर्द सदैव चढती राहिली़ राज्याचे चौथे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी २१ फेब्रुवारी १९७५ रोजी शपथ घेतली़ त्यांच्या रुपाने मराठवाड्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद मिळाले़ १९७५ ते ७७ तसेच १९८६ ते ८८ असे दोन वेळा ते मुख्यमंत्री झाले़ त्यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या राजकीय व सामाजिक विचारांचा प्रभाव होता व स्वामींच्या सोबत ते हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यातही अग्रणी राहिले़
आपल्या राजकीय कारकिर्दीत २० पेक्षा जास्त खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला़ जायकवाडी, विष्णूपुरी, इसापूर, उजनी या धरणांबरोबरच भीमा व पैनगंगा नदीवरील धरणांची योजना राबविली़ कोयना, वारणा, कन्हेर, दूधगंगा, तितरी, सूर्या, अप्पर वर्धा, पेच, मनार, सिद्धेश्वर, येलदरी, दुधना, अप्पर पैनगंगा, मांजरा, पूर्णा, मुळा अशा कितीतरी प्रकल्पांच्या कालव्यांतून वाहणारे पाणी शंकररावांच्या कर्तृत्वाची गाणी गात आहे़ हे प्रकल्प सिद्धीला नेण्यासाठी त्यांनी जे भगीरथ प्रयत्न केले, त्यामुळेच शंकररावजींना आधुनिक भगीरथ असे संबोधले जाते़ राज्याच्या जलसंस्कृतीचे जनक असाही
त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख होतो़ पैठणचा जायकवाडी प्रकल्प होऊ नये म्हणून विरोधकांनी रान पेटविले होते़ शंकररावजींच्या खुनाचा प्रयत्न करण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली होती़ विरोधकांना विचार पटवून देऊन, शक्य नसेल तर प्रसंगी विरोध पत्करून शंकररावजींनी नाथसागर साकार केला़ शंकरराव चव्हाण यांनी राज्याच्या सिंचन क्षमतेचा बारकाईने अभ्यास केला होता़ तो व्यासंग पाहून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इंजिनिअर व केंद्रीय मंत्री के.एल़ राव हे देखील चकित झाले होते़ शंकररावांनी ज्या खात्याचा कारभार सांभाळला, तिथे शिस्त लावण्याचा प्रयत्न केला़ त्यांच्या शिस्त व परखडपणाबद्दल खुद्द दिवंगत पंतप्रधान पी़ व्ही़ नरसिंहराव म्हणाले होते, ‘आजही काही गोष्टी परखडपणे सांगायच्या असतील, तर मी शंकररावांना पुढे करीऩ शब्द किती निखळ असतात, हे अशावेळी जाणवते’. लोकरंजनापेक्षा लोककल्याण हेच शंकररावजींचे जीवितध्येय होते़ त्यासाठी त्यांनी कधी खोटा लोकानुनय केला नाही़ निवडणुकींवर नजर ठेऊन नव्हे, पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून निष्काम भावनेने राजकीय, रचनात्मक कार्य केले़ त्यामुळेच विरोधकही त्यांच्याकडे कधी बोट दाखवू शकले नाहीत़ ते म्हणत, व्यक्तीच्या बोलण्यातून आणि आचरणातून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा समाजावर उमटत असतो़ समाज जीवनाशी ज्यांचा संबंध असतो, अशा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी जनहिताची कामे करताना दिलेला प्रत्येक शब्द म्हणजे अलिखित वचन असेच मानले पाहिजे़ त्याच्या पूर्ततेसाठी परिश्रमाची पराकाष्ठा केली पाहिजे़ त्यांच्या या विचारसरणीसमोर पक्षातील आणि विरोधी पक्षातील नेतेही सदोदित नतमस्तक राहिले़ शंकरराव चव्हाण केंद्रात मंत्री असताना भाजपाचे नेते सिकंदर बख्त राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते़ कवीवृत्तीच्या बख्त यांनी म्हटले, ‘सरत चाललेल्या पिढीतील शंकरराव चव्हाण हे आशेचे किरण आहेत़ राज्यसभेत आमची नजरभेट होत नाही, तर आमची दिलं एकमेकांना भेटतात़’ दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे यांच्या भाषणांमधून शंकररावजींचा झालेला गौरव महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा आहे़ शंकररावजींनी आपल्या हयातीत डोंगराएवढी कामे केली़, परंतु त्या कामाचा गाजावाजा केला नाही़ काम करताना निष्ठा व श्रद्धांशी तडजोड केली नाही़ त्यांचे व्यक्तिमत्त्व, नेतृत्व आणि कर्तृत्व समाजाला सदैव सर्जनशीलतेची, उद्यमशीलतेची आणि सुसंस्काराची सदोदित प्रेरणा देत राहील.
- प्राचार्य डॉ़ सुरेश सावंत़
(मराठीचे अभ्यासक तथा साहित्यिक)