शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दहशतवादी हल्ल्याची 20 वर्षे : न्यू यॉर्कच्या फुप्फुसांत आजही 9/11 ची धूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 12:03 IST

वर्ल्ड ट्रेंड सेंटरवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज २० वर्षे पूर्ण झाली. तेव्हा उसळलेली धूळ आजही अमेरिकन लोकांच्या मृत्यूचे कारण ठरते आहे!

ठळक मुद्देमर्सीचं जगणं पार बिघडून गेलं. तिला धड श्वास घेता येत नसे. डोळ्यासमोर धुळीचा ढग येत असे, त्या ढगात तिला ओसामा बिन लादेन दिसत असे

निळू फुले

११ सप्टेंबर २००१. सकाळी ९.३७ वाजता न्यू यॉर्कच्या आकाशात धुळीचा ढग तयार झाला. चक्क सकाळी अंधार झाला. जणू संध्याकाळच झाली होती. दोन विमानं वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या जुळ्या मनोऱ्यांवर धडकली  तेव्हा प्रत्येक मनोऱ्याची उंची ११० मजले होती. दोन्ही मनोऱ्यात मिळून ४३० कंपन्यांच्या कचेऱ्या होत्या. या कचेऱ्यांत सुमारे ५० हजार माणसं काम करत आणि सुमारे दीड लाख माणसं दिवसभरात ये-जा करत. सकाळचे जेमतेम साडेनऊ वाजलेले असल्यानं माणसं कामावर येत होती, कचेऱ्या पूर्ण भरलेल्या नव्हत्या, ४७३३ माणसंच कामावर पोहोचली होती. दहशतवादी हल्ल्यात इमारतीतली सुमारे २७०० माणसं मेली. उरलेली जिवाच्या आकांतानं सटकली. सटकलेल्यांमध्ये होती २८ वर्षांची मेर्सी बॉर्डर्स. ८१ व्या मजल्यावर काम करत होती. रस्त्यावर आली तेव्हां धुळीनं माखली होती. ओळखू येणार नाही इतकी. दुसऱ्या दिवशी तिचा फोटो प्रसिद्ध झाला. फोटोला शीर्षक होतं डस्ट लेडी. आपण जिवंत आहोत या कल्पनेनंच ती सुखावली होती; पण ती भावना फार टिकली नाही.

मर्सीचं जगणं पार बिघडून गेलं. तिला धड श्वास घेता येत नसे. डोळ्यासमोर धुळीचा ढग येत असे, त्या ढगात तिला ओसामा बिन लादेन दिसत असे. मर्सीकडं इन्शुरन्स नव्हता, उपचारासाठी पदरचे पैसे खर्च करावे लागत होते. कर्जाचाही डोंगर झाला. नातेवाईक, मित्र तिचा खर्च सोसत. मर्सी विस्कटत गेली, शेवटी नशेच्या आहारी गेली. त्यासाठी पुन्हा उपचार करून घ्यावे लागले. मर्सी खंगली. शेवटी २०१५ च्या ऑगस्टमधे ती वारली. तिच्या डेथ सर्टिफिकेटवर डॉक्टरनं कारण लिहिलं होतं-कॅन्सर. 

अकरा सप्टेंबरच्या हल्ल्यात उसळलेल्या  धुळीनं तिला कॅन्सर दिला होता. या हल्ल्यात मेलेल्यांची संख्या दाखवतात २९७७. ही टपाटप मेलेली माणसं. नंतर मरणाऱ्यांची संख्या वाढत गेली. आजही त्या दुर्घटनेचा परिणाम म्हणून मरत आहेत. दुर्घटना घडल्यावर लगोलग अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस आणि इतरही सरसावले होते. त्यांची संख्या होती सुमारे १ लाख. त्यांनीही बरीच धूळ खाल्ली होती. शिवाय असंख्य नागरिक मदतकार्यात सरसावले होते. अशी दोनेक लाख माणसं आज २० वर्षांनंतरही फुप्फुसात धूळ घेऊन जगत आहेत. २०१७ साली म्हणजे घटना घडल्यानंतर १६ वर्षांनी दुर्घटनाग्रस्त रोगी न्यू यॉर्कच्या माऊंट सिनाई इस्पितळात येत असत.  छातीच्या रोगांच्या शस्त्रक्रिया करणारा तिथला विभाग प्रमुख सांगतो, ‘पुढल्या १५-२० वर्षांत अकरा सप्टेंबरग्रस्त नागरिकांची संख्या वाढणार आहे, ही समस्या गंभीर होणार आहे. अकरा सप्टेंबरची धूळ कॅन्सरला कारणीभूत ठरते, त्या कॅन्सरमुळे मरणाऱ्यांची संख्या १० लाखांच्याही पलीकडं जाऊ शकते...’

मर्सी हल्ल्यानंतर १४ वर्षांनी मेली, त्या वेळी धूळ खाल्लेली लाखो माणसं अजून ती धूळ फुप्फुसात बाळगून आहेत, सावकाशीनं मरत आहेत. त्या धुळीत काय होतं? असं विचारण्यापेक्षा काय नव्हतं असा प्रश्न विचारायला हवा. ४३० कचेऱ्यांत फर्निचर होतं, कॉम्प्युटर होते. इमारतीच्या बांधकामात काचा आणि असबेस्टॉसचा वापर झाला होता. या सर्व गोष्टींची भुकटी झाली होती. भुकटी इतकी बारीक झाली होती की,  ती वाऱ्यावर उडू शकत होती. मॅनहॅटनच्या पलीकडे कित्येक मैल ही ४ लाख टन धूळ पसरली होती. मर्सीसारख्या व्यक्ती धुळीनं माखल्या होत्या कारण त्या व्यक्ती धुळीच्या केंद्रातच होत्या; गावांगावातल्या छोट्या मुलांच्या नाकातही ही धूळ गेली; पण ते लक्षात आलं नाही. २००१ साली ज्यांची वयं दोन-पाच अशी असतील अशी मुलं आज पंचविशीत आहेत.

काच आणि असबेस्टॉसचे तंतू खतरनाक असतात. ते फुप्फुसात गेल्यावर तिथंच राहतात. माणसाच्या शरीरातली रसायनं ते तंतू पचवू शकत नाहीत आणि बाहेरही टाकू शकत नाहीत. या तंतूंपासून पुढं फायब्रोसिस होतो आणि माणसं मरतात. फार सावकाशीनं, कित्येक वर्षांनी. असबेस्टॉस आणि काच यांच्याशिवाय विविध वस्तूंमध्ये वापरलेले विषारी पदार्थ माणसांच्या शरीरात गेले. ते पदार्थ घातक आहेत हे वैज्ञानिकांना माहीत आहे; पण त्याचे नेमके परिणाम माहीत नाहीत. कोणता कॅन्सर किंवा घातक रोग होताे याचा निश्चित अभ्यास झालेला नाही; पण परिणाम होताहेत यावर वैज्ञानिकांचं एकमत आहे. ११ सप्टेंबरचा धुळीचा ढग ६ ऑगस्टच्या मश्रूम ढगाची आठवण करून देतो. ६ ऑगस्ट १९४५ म्हणजे हिरोशिमा दिवस. त्या दिवशी अमेरिकेनं हिरोशिमावर बाॅम्ब टाकला. त्या दिवशी आणि नंतरच्या काही आठवड्यांत सुमारे २ लाख माणसं अणुसंसर्गानं मरण पावली. आज त्या घटनेला ७५ वर्षं होताहेत आणि जपानी डॉक्टर्संना संशय आहे की, हिरोशिमा दुर्घटनेत वाचलेल्या मुलांमधेही अणुसंसर्गाचे परिणाम दिसतात. म्हणजे वाचलेल्या लोकांची नंतर लग्नं झाली आणि त्यांना मुलं झाली. त्या मुलांमध्येही अणुसंसर्ग असावा, असा संशय संशोधकांना आहे. कमी तीव्रतेचा आहे; पण संसर्ग आहे, असं डॉक्टर्स म्हणतात.

अकरा सप्टेंबरनं त्या काही दिवसांत माणसं मारली आणि आजही मरणं चालूच आहे; पण त्यांच्या पक्क्या नोंदी सापडणं कठीण आहे. नेमक्या अकरा सप्टेंबरमुळं कॅन्सर झालाय की इतर कारणांनी हे नेमकं सांगणं अवघड आहे. दुसरं असं की, अकरा सप्टेंबरमुळं कॅन्सर झालाय असं सिद्ध झालं तर मोठ्ठी नुकसानभरपाई सरकार आणि विमा कंपन्यांना द्यावी लागेल. त्यामुळं त्या दोन्ही संस्था ‘‘अकरा सप्टेंबरच्या कारणाने घडलेला मृत्यू’’ असा शिक्का असलेला कागद मान्यच करत नाहीत. पण, अकरा सप्टेंबरनं आणखी एक मृत्युमालिका सुरू केली. लगोलग डिसेंबरमध्ये अमेरिकेनं ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी अफगाणिस्तानवर क्षेपणास्त्रं सोडायला सुरुवात केली. बिन लादेन मरे ना. मग अमेरिकेनं त्याला थारा देण्याचा संशय असणाऱ्या तालिबान सरकारवरच हल्ले सुरू केले. त्यासाठी अफगाणिस्तानवर आक्रमण केलं. तालिबान सरकार पडलं; पण तालिबान शिल्लक होतं.  अमेरिकेनं तालिबानविरोधात लढाई सुरू केली. ती २०२० पर्यंत चालली. त्यात लाखापेक्षा जास्त माणसं मेली. ते सारे मृत्यू अकरा सप्टेंबरचेच म्हणायला हवेत. २०२२ उजाडतंय. तालिबान पुन्हा सत्तेवर आलंय आणि माणसं मारणं सुरू झालंय. म्हणजे अमेरिका आणि दोस्तांना पुन्हा एकदा माणसं मारावी लागणार. न्यूयॉर्कमध्ये फायब्रोसिसनं माणसं मरतायत आणि अफगाणिस्तानात गोळीबारानं. भीषण आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टॅग्स :TerrorismदहशतवादAmericaअमेरिकाTalibanतालिबान