बिहारला जातवादाच्या अंधारात ढकलू नका

By Admin | Updated: June 5, 2015 23:47 IST2015-06-05T23:47:22+5:302015-06-05T23:47:22+5:30

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांच्या काही अजरामर काव्यांची सुवर्णजयंती साजरी करण्यात आली.

Do not put Bihar in the darkness of casteism | बिहारला जातवादाच्या अंधारात ढकलू नका

बिहारला जातवादाच्या अंधारात ढकलू नका

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांच्या काही अजरामर काव्यांची सुवर्णजयंती साजरी करण्यात आली. त्यातील ‘संस्कृती के चार अध्याय’ या संग्रहाची प्रस्तावना स्व. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी लिहिली होती. या पुस्तकाचाही एक इतिहास आहे. कवी दिनकर हे या काव्यसंग्रहाची हस्तलिखित प्रत प्रकाशकाला देण्यासाठी एका टॅक्सीतून जात होते. प्रकाशकाकडे गेल्यावर ती प्रत टॅक्सीतच राहून गेली. अनेक प्रयत्नानंतरही ती प्रत काही मिळाली नाही. अखेर हिंमत करून कवी दिनकर यांनी ते पुस्तक पुन्हा लिहून काढले. या पुस्तकाच्या सुवर्णजयंती कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने बिहारमधील जातवादावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, ‘‘दोन तीन जातींना हाताशी धरून राजकारण करता येत नाही. जोपर्यंत तुम्ही जात-पातीचे राजकारण करणे सोडणार नाही, तोपर्यंत बिहारचा विकास होणार नाही. मोदी यांनी आपल्या भाषणात कवी दिनकर यांच्या एका पत्राचाही दाखला दिला होता. त्या पत्रात त्यांनी लिहिले होते- ‘‘बिहारला जातपात विसरावी लागेल आणि चांगल्या मार्गावर पदक्रमण करावे लागेल.’’
या समारंभाला बिहारमधील लोक मोठ्या संख्येने आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन खासदार डॉ. सी.पी. ठाकूर यांनी केले होते. काही वर्तमानपत्रांनी या कार्यक्रमाची टर उडविली होती. या कार्यक्रमावर टीका करताना, ‘‘हा कार्यक्रम प्रामुख्याने भूमिहार जातींच्या लोकांनी आयोजित केला होता’’ असे म्हटले होते. बिहारमध्ये काही महिन्यांनी निवडणुका होणार आहेत व त्यात भूमिहार जाती स्वत:चा ठसा उमटविण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी या कार्यक्रमावर टीका करण्यात आली होती. पण असा आरोप करणे हास्यास्पद आहे. कारण स्वत: कवी दिनकर हे जातवादाच्या विरुद्ध होते. तसेच डॉ. सी. पी. ठाकूर हेही जातवादी राजकारण करणाऱ्यांपैकी नाहीत. तसेच दिल्लीत कवी दिनकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम आयोजित करून बिहारमध्ये भूमिहार जातीची मते कशी काय मिळविता येतील?
आठव्या लोकसभेत डॉ. सी.पी. ठाकूर हे माझे सहकारी होते. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर आहेत याची कल्पना बऱ्याच लोकांना नाही. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या प्रसिद्ध दैनिकाच्या मुखपृष्ठावर एक वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यात बिहारचे डॉ. सी. पी. ठाकूर यांनी ‘‘कालाजार’’ या प्राणघातक रोगावर एका स्वस्त औषधाचे संशोधन केले होते. त्या औषधामुळे केवळ बिहार, बंगाल, आसाम, ओरिसा आणि उत्तर प्रदेशातील नव्हे तर आफ्रिका खंडातील अनेक देशातील अनेक लोकांचे प्राण वाचविले होते असे नमूद केले होते. अशा स्थितीत या कार्यक्रमामुळे डॉ. ठाकूर यांचा काही लाभ होणार होता, असे अजिबात नाही. तसेही कवी दिनकर हे आमच्या परिवाराचे चांगले मित्र होते. ते मला पुत्रासमान मानायचे. त्यांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही. लहानपणी आम्ही दिनकर यांच्या कवितांचे वाचन करीत असू. त्यांची एक प्रसिद्ध कविता ‘दिल्ली’ ही होती. त्यात दिल्ली ही तिच्या वैभवामुळे उन्मत्त झाली होती, अनाचार, अवमान याचे वार झेलणारी दिल्ली होती, असे दिल्लीचे वर्णन केले होते. दिनकर हे मध्यमवर्गीय कुटुंबातच लहानाचे मोठे झाले. पण त्यांच्या कवितेने त्यांना सगळ्या हिंदी भाषी क्षेत्रावर अधिराज्य गाजविता आले होते. बिहारच नव्हे; सगळ्या हिंदी भाषी राज्यांना जातवादाने वेढले आहे. जनता दलाचे लहान गट एकजूट होऊन आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा करीत असले तरी जातीचा अडसर त्यांना एकत्र येऊ देत नाही. नितीशकुमार यांना भावी मुख्यमंत्री म्हणून मान्यता देण्यास राजदचे नेते तयार नाहीत. तर जदयूच्या नेत्यांचे म्हणणे आहे की नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले तरच निवडणुकीत जागांचे वाटप होऊ शकेल. दुसरीकडे जीतनराम मांझी यांचे म्हणणे आहे की तुम्ही सोबत राहाल तर ही निवडणूक जिंकू शकाल. एकूणच बिहारच्या निवडणुकीत ‘जात’ हाच मुद्दा असणार आहे. जातीचा रोग बिहारला कुठे नेऊन ठेवणार आहे हे कळणे कठीण आहे.
१९९० मध्ये बिहारमध्ये ‘जंगलराज’ होते. त्यापासून स्वत:ची सुटका करण्यासाठी दिल्लीत आलेल्या बिहारी लोकात अनेक जातीचे लोक होते. पण दिल्लीत ते जात विसरून गेले आहेत. अनेक बिहारी लोकांनी रूढी आणि परंपरा यांच्यावर तिलांजली दिली आहे. बिहार राज्य आजही रूढीवादी संस्कारांनी ग्रासलेले आहे. तेथे परिवारातील कुणाचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबात अकरा दिवस जेवणावळी उठत असतात. अगोदर परिवारातील व्यक्ती मरण पावल्याच्या दु:खात कुटुंबीय असतात आणि भरीसभर कर्ज काढून मृत्यूचे दिवस करण्याची प्रथा बिहारमध्ये आजही पहावयास मिळते. दिल्लीत राहणारे बिहारी आपल्या राज्यात जेव्हा जातात तेव्हा ते या रूढी परंपरा सोडून द्या असे तेथील लोकांना सांगत असतात. निदान बिहारचे तरुण या जातीच्या बंधनातून मोकळे झाले तर बिहार राज्याला सुख आणि समृद्धी लाभू शकेल. येथील राजकारण्यांनी बिहारच्या जनतेची जातीच्या बंधनातून मुक्तता करायला हवी.
- डॉ. गौरीशंकर राजहंस
(लेखक माजी खासदार आहेत.)

Web Title: Do not put Bihar in the darkness of casteism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.