शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 07:35 IST

आपण खरेतर मानसिक दारिद्र्यात जगत राहतो. दिवाळीनिमित्ताने माझ्या मानसिक दारिद्र्याचा नाश होऊ दे, अशी प्रार्थना आपण करायला हवी.

- अश्विनी बर्वे(मुक्त पत्रकार)

आपण सर्वच जण पैशाच्या मागे धावतो आहोत. जगायला पैसा लागतो हे कोणी नाकबूल करणार नाही. मात्र, कुणाकडे अधिकचा पैसा असेल तर अशा व्यक्तीकडे संशयाने पाहिले जाते, हेही खरे. त्यांनी तो पैसा प्रामाणिकपणे मिळवला नसेल, असे उगाच गृहीत धरण्याची प्रवृत्ती असतेच. दिवाळीत घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते. त्यावेळी अनेक जण आपल्या घरातील मौल्यवान वस्तू देवासमोर ठेवून पूजा करतात. धनाची पूजा करतात आणि त्याबद्दल कृतज्ञता बाळगतात. त्याचा सन्मान करतात. मात्र, धन म्हणजे केवळ सोने-नाणे, पैसे नव्हे! आपली जमीन, गाईगुरे, आपल्या घरातील अनेक वस्तू या सगळ्याच गोष्टी ‘धन’ या शब्दात येतात.

घरातील समाधान हेसुद्धा ‘धन’ या शब्दात गृहित धरले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेक घरांत ‘श्री सुक्त’ म्हटले जाते. त्यावरून असे लक्षात येते की, आपल्याला हवे असणारे वैभव आपण मागायचे आहे. माणसाला जीवनात सुख व समृद्धी मिळाली पाहिजे. मग तो ती कोणाकडे मागणार तर आदिमशक्तीकडे जी मातृत्वाचे रूप घेऊन येते आणि सर्वांना तृप्त करते. माणसाला लक्ष्मी कशी पाहिजे?- तर ‘अनपगामिनीम्’ म्हणजे कोणत्याही वेळी परत न जाणारी!  ती आली की, तिने परत जाऊ नये. ती पाहुणी म्हणून आलेली चालणार नाही. म्हणजे तिचा कायमचा वास माझ्या घरात असायला हवा, अशी प्रार्थना आहे. लक्ष्मी चंचल असते म्हणतात, पण खरेतर ती जिच्याकडे असते त्या व्यक्तीची वृत्ती चंचल होण्याची शक्यता अधिक! 

माणसाला सुख आणि आरोग्य हवे असते. जिच्यामुळे सुख मिळते तिलासुद्धा लक्ष्मी म्हणतात. सुख ही मनाची समृद्धी आहे. कारण सुख मनाला होते. जो माणूस मनाने दुर्बल असतो तो या जगात टिकू शकत नाही. म्हणूनच मनाच्या सबलतेला ऐश्वर्य म्हटले जाते. जे लोक मनाने समृद्ध असतात, त्यांच्याजवळ लक्ष्मी-ऐश्वर्य असते. पण मन समृद्ध होण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात. तो मनाचा एकप्रकारे व्यायाम आहे. माणूस समजून घेणे, एकमेकांमध्ये नितळ नाते निर्माण करणे, स्वीकार हे मनाचे गुण होत. आपण एकमेकांमध्ये भिंती निर्माण करतो आणि संघर्षाच्या भूमिकेत कायम राहतो. त्यामुळे तणाव वाढत राहतो. शरीर सुदृढ असेल पण मन दुबळे असले तर क्रौर्य निर्माण होते. म्हणून मन समृद्ध असले पाहिजे. याचा अर्थ, मनाची समृद्धी हीसुद्धा एक लक्ष्मी आहे आणि ती आपल्याकडे असायला हवी!

आपल्याकडे अनेक काव्यांमध्ये पृथ्वीला लक्ष्मी म्हटले आहे. ती नित्यपुष्टा आहे. एका  काव्यामध्ये पृथ्वी हसते आहे. म्हणून तिला प्रश्न विचारला की, ‘तू का हसते आहेस?’ तेव्हा ती म्हणते, ‘माणसांनी एकमेकांबरोबर आत्यंतिक मधुर संबंध निर्माण केले आहेत. त्यांच्या या एकमेकांवरच्या प्रेमामुळे माझ्यातील दाह शांत झाला आहे, म्हणून मी हसते आहे.’ म्हणजे पृथ्वी आपल्याला तनमनाने पुष्ट करत आहे,  तसेच तिने माझ्यातला भाव, बुद्धीसुद्धा पुष्ट करायला हवी. त्यासाठी आपला जीवनाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आपले कर्तृत्व कामाला लावले पाहिजे. आपण वर्तमानाची कदर करत नाही. जो वर्तमानाची कदर करतो त्याचे जीवन पुष्ट राहते. पण आपण सतत भूत आणि भविष्यात फिरत राहतो आणि त्याचा ताण आपल्या शरीरावर आणि मनावर येतो आणि त्यामुळे आपले वर्तमान बिघडत जाते. मग आपली जीवनलक्ष्मी फुलणार कशी? आपण कायम मानसिक दारिद्र्यात जगत राहतो. दिवाळीनिमित्ताने माझ्या या मानसिक दारिद्र्याचा नाश होऊ दे, अशी प्रार्थना आज आपण करायला हवी. सुदृढ मन हीसुद्धा लक्ष्मी आहे. तिचा सांभाळ आपण कसोशीने करायला हवा.दिवाळीत धनाची आणि लक्ष्मीची पूजा करताना सर्वांसाठीच हे वैभव मागू या!

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024