‘रामा’चा प्रतिज्ञाभंग

By Admin | Updated: September 30, 2015 22:31 IST2015-09-30T22:31:44+5:302015-09-30T22:31:44+5:30

अ‍ॅडव्होकेट राम जेठमलानी हे देशातलं आणि विशेषत: विधी क्षेत्रातलं एक बडं प्रस्थ. दीर्घकाळ ते भाजपाचे आधारस्तंभ होते आणि भाजपानेच त्यांना पुन:पुन्हा राज्यसभेवर निवडून पाठविले होते.

Disobedience of 'Rama' | ‘रामा’चा प्रतिज्ञाभंग

‘रामा’चा प्रतिज्ञाभंग

अ‍ॅडव्होकेट राम जेठमलानी हे देशातलं आणि विशेषत: विधी क्षेत्रातलं एक बडं प्रस्थ. दीर्घकाळ ते भाजपाचे आधारस्तंभ होते आणि भाजपानेच त्यांना पुन:पुन्हा राज्यसभेवर निवडून पाठविले होते. जे मनात आलं ते बोलून टाकलं, हा त्यांचा खाक्या. त्यामुळे अधूनमधून इंग्रजी वृत्तपत्रांमधून देशातील सर्वाधिक महत्वाच्या व्यक्तीपुढे प्रश्नांची (साहजिकच अडचणीत आणणाऱ्या) एक मालिका सादर करण्याचा त्यांना छंद. त्यांच्या या सर्व मालिका आजवर अनुत्तरीतच रहिल्या आहेत, ही बाब अलाहिदा. मध्यंतरी त्यांनी देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनादेखील अडचणीत आणणारे काही प्रश्न विचारले होते. फरक इतकाच की त्यांनी ते प्रारंभी खासगी पत्राद्वारे विचारले आणि नंतर ते सार्वजनिक केले. पण कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायचे नाही, होणाऱ्या टीकेची दखल घ्यायची नाही आणि साऱ्यांना उपेक्षून वा दुर्लक्षून गारद करायचे हा मोदींचा खाक्या असल्याने त्यांनी जेठमलानींच्या प्रश्नांनाही उत्तर देण्याची तसदी घेतली नाही. तसेही मोदींचे आणि त्यांचे टिपण पहिल्यापासून जमत नाहीच. त्यात मोदी आपल्या पत्राची दखलही घेत नाहीत, याचा जेठमलानींना प्रचंड राग आला व यापुढे मोदींशी संवाद नाही अशी जाहीर प्रतिज्ञा त्यांनी घेऊन टाकली. पण आता त्या प्रतिज्ञेचा त्यांनीच भंग केला आहे. त्याला निमित्त घडले आहे ते मागासवर्गीयांना सध्या लागू असलेल्या आरक्षणाच्या नीतीचा पुनर्विचार करण्यासंबंधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढलेल्या कथित उद्गारांचे. भागवत यांचे हे उद्गार म्हणजे बिहारातील उच्चवर्णीयांनी भाजपाला मतदान करावे म्हणून त्यांना दिलेली ‘लाच’ असल्याचे जेठमलानी यांचे मत असून त्याबाबत भागवत आणि मोदी यांना एकाच वेळी एक पत्र लिहून त्यांनी उभयतांकडून खुलाशाची मागणी केली आहे. भागवत यांचे प्रस्तुत उद्गार समाविष्ट असलेली मुलाखत प्रसिद्ध होऊन बरेच दिवस झाले, पण अद्याप त्यांनी स्वत:च्या विधानाचे खंडणही केले नाही वा समर्थनही केलेले नाही. तेव्हां त्यांची या विधानास मूक संमती असल्याचेही जेठमलानी यांनी गृहीत धरले आहे. पण याचा एक अर्थ असा की देश पातळीवर गदारोळ होऊनही भागवतांनी मौन बाळगले असताना आता तेच मौन जेठमलानींसाठी सोडले जाईल अशी शक्यता शून्याच्याही खालची आहे. मोदी उत्तर देणार नाहीत हे तर उघडच असल्याने जेठमलानी यांचा प्रतिज्ञाभंग वाया जाणार हेही उघडच आहे. पण त्यांनी लाचेचा जो मुद्दा उपस्थित केला आहे, त्याबाबत माध्यमे सध्या बिहारातील निवडणुकीविषयी जी अनुमाने व्यक्त करीत आहेत, त्यांना छेद देणारा आहे. या निवडणुकीतील संभाव्य संघर्षास लालू-नितीश यांनी उच्चवर्णीय विरुद्ध मागासवर्गीय असे संबोधायला आधीपासूनच सुरुवात केली आहे व या संघर्षात उच्चवर्णीयांची अल्प मते काँग्रेसच्या तर भरघोस मते भाजपाच्या पारड्यात पडतील असे तर साऱ्यांनीच गृहीत धरले आहे. तेव्हां जे अगोदरपासूनच वश आहेत, त्यांना आणखी वश करण्यासाठी कोण वेळ, शक्ती आणि मुक्ताफळेही वाया घालवील?

Web Title: Disobedience of 'Rama'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.