रिया चक्रवर्तीच्या अटकेमागचे दिल्ली कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 11:50 PM2020-09-09T23:50:11+5:302020-09-09T23:50:27+5:30

अंमलबजावणी संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी खास तेवढ्यासाठी दिल्लीहून मुंबईत आले.

Delhi connection behind Riya Chakraborty's arrest | रिया चक्रवर्तीच्या अटकेमागचे दिल्ली कनेक्शन

रिया चक्रवर्तीच्या अटकेमागचे दिल्ली कनेक्शन

googlenewsNext

- हरीष गुप्ता

अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने रिया चक्रवर्तीला अटक करून बिहारच्या राजकारणात तेल ओतले आहे. आता रियाबाबत गेले तीन महिने चाललेले गुºहाळ बहुधा एकदाचे थांबेल. या अटकेने ब्युरोचे महानिरीक्षक राकेश अस्थाना यांच्या करिअरचा आलेख दिल्लीपतींच्या नजरेत सरसर वर गेला. सीबीआयचे संचालक आर.के. शुक्ला आणि अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक संजय कुमार मिश्रा यांनी गेले काही आठवडे पन्नासएक तास रियाला चौकशीच्या चक्रात फिरवले; पण अखेर सरशी अस्थाना यांची झाली.

अंमलबजावणी संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी खास तेवढ्यासाठी दिल्लीहून मुंबईत आले; पण त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सांगून टाकले, ‘माफ करा, रियाला अटक करण्यासाठी कणभरही पुरावा नाही!’  मग अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो रिंगणात उतरला. हा ब्युरोच रियाला अटक करील हे या स्तंभाने गेल्याच आठवड्यात म्हटले होते. शुक्ला पुढच्या वर्षी निवृत्त होत आहेत. अस्थाना सीबीआयचे संचालक होण्याची शक्यता आता वाढली आहे. गतवर्षी सीबीआयमधून बाजूला केले गेल्यामुळे अस्थाना नाराज होते.

सोनिया गांधी आक्रमक, ‘जी २३’ बंडखोर बचावाच्या पवित्र्यात

गांधींविरुद्ध बंडाचे निशाण फडकवणारे काँग्रेसमधले २३ बंडखोर नेते आता तोंड लपवत फिरत आहेत. दडपण घेण्याऐवजी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी उलट आक्रमक झाल्या आहेत. राहुल निष्ठावंतांपैकी काहींना महत्त्वाच्या संसदीय पदांवर नेमून त्या थांबल्या नाहीत तर उत्तर प्रदेशातील काहींची पदे काढून त्यांना त्यांची जागा दाखवली गेली.

बिहारमध्ये राजकीय दृष्ट्या वजनदार अशा निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदावरून राज्यसभेतले खासदार अखिलेश प्रसाद सिंग यांना हटविण्यात आले. सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानायची तर ‘जी २३’ गटातले मुकुल वासनिक, मनीष तिवारी, शशी थरूर यांचे सूर वेगवेगळे उमटत आहेत. पत्राचा मसुदा जरा चुकलाच असे आता तिवारी जाहीरपणे म्हणू लागलेत. पत्र आनंद शर्मा यांनी लिहिले असल्याने हा बाण त्यांच्या दिशेने जाणार हे उघडच आहे ! केरळात भाजपची ताकद नसल्याने थरूर यांना वादात पडायचे नाही. माघार घेण्यात मुकुल वासनिक यांची काही कारणे असणार. सोनियांनी मुख्यमंत्रिपदावर बसवले होते हे आठवून पृथ्वीराज चव्हाणही आता तोंड लपवत आहेत.

अमित शहा का अस्वस्थ आहेत?

कोरोनाची लागण आणि थकव्यातून बाहेर पडून गृहमंत्री अमित शहा कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी परतले. पंतप्रधान मोदींचे उजवे हात मानले जाणारे शहा कायम पुढे राहून लढत आले. मात्र गेल्या काही दिवसात ते प्रकाशझोतातून थोडे बाहेर गेले होते. कानावर आलेल्या माहितीनुसार अमित शहा कार्यालयात आले नसले तरी पूर्णपणे सक्रिय होते.

फायलींचा निपटारा त्यांनी चालू ठेवला. ल्यू टन्स दिल्लीतल्या कानगोष्टीतली एक म्हणजे रामजन्मभूमी शिलान्यासाला न बोलावले जाणे तसेच गुजरात भाजपच्या अध्यक्षपदी सी.आर. पाटील यांची नेमणूक यामुळे शहा अस्वस्थ आहेत. ‘एम्स’मधून परतल्यावर तसेच मेदान्ता इस्पितळात शहा दाखल असताना मोदी रोज त्यांची विचारपूस करत. सूत्र सांगतात की, मोदी आणि शहा यांचे नाते राम-हनुमानासारखे आहे. पृथ्वीतळावरची कोणतीच शक्ती त्याना अलग करू शकणार नाही.

एअर इंडिया विकली जाणार का?

येत्या ३१ मार्चपर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील २६ उद्योगांची विक्री सरकारने मुक्रर केली त्यात अग्रभागी एअर इंडिया आहे. बीपीसीएल आणि इतर कंपन्या घ्यायला बरेच उत्सुक आहेत; पण एअर इंडियाची विक्री हे नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्यापुढील आव्हान ठरते आहे. असे म्हणतात की, टाटा उद्योगसमूह एअर इंडिया घ्यायला काहीसा अनुत्सुक आहे.

एअर एशिया आणि विस्तारा चालवत असताना नागरी उड्डयन व्यवसायात आणखी पैसे गुंतवायला टाटा समूहाचे सीईओ एन चंद्रशेखरन पूर्णत: तयार नाहीत. मात्र पंतप्रधान मोदींशी सौहार्दाचे संबंध असलेले दोन आखाती देश खरेदीस उत्सुक दिसतात. अर्थसंकल्पातील ८ टक्के तूट भरून काढण्यासाठी २०-२१ या आर्थिक वर्षात सरकार सार्वजनिक उद्योग विकून दोन लाख कोटी उभे करू पाहते आहे.

Web Title: Delhi connection behind Riya Chakraborty's arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.