फाशीची शिक्षा सर्वात गंभीर गुन्ह्यांसाठीच असावी!

By Admin | Updated: September 29, 2015 22:35 IST2015-09-29T22:35:08+5:302015-09-29T22:35:08+5:30

न्यायमूर्ती अजितप्रकाश शाह यांच्या अध्यक्षतेखालील विधी आयोगाने आपल्या अहवालात दहशतवादी कृत्ये वगळता अन्य घटनांमध्ये फाशी दिली जाऊ नये असे

The death sentence should be the most serious crime! | फाशीची शिक्षा सर्वात गंभीर गुन्ह्यांसाठीच असावी!

फाशीची शिक्षा सर्वात गंभीर गुन्ह्यांसाठीच असावी!

गुरुचरणदास (विख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत)
न्यायमूर्ती अजितप्रकाश शाह यांच्या अध्यक्षतेखालील विधी आयोगाने आपल्या अहवालात दहशतवादी कृत्ये वगळता अन्य घटनांमध्ये फाशी दिली जाऊ नये असे मत व्यक्त केले आहे. घडलेला गुन्हा आणि त्यासाठी दिली जाणारी शिक्षा यात तसे पाहिले असता कोणताही संबंध नसतो. दहशतवाद्यांना फाशी देण्याचा अपवाद करण्यामागे, काही ओलिसांच्या मुक्ततेसाठी दहशतवाद्यांची मुक्तता करण्याची संधी मिळू नये हेच कारण असावे.
गुन्हा आणि त्यासाठी दिली जाणारी शिक्षा यांच्यातील संबंधांविषयी समाजाने दीर्घकाळ विचारविनिमय केला आहे. प्रशासनाची निर्मिती झाल्यावर गुन्ह्यासाठी शिक्षा करण्याचे अधिकार प्रशासनाकडे आले. त्यासाठी कायदे निर्माण करण्यात आले. तरीही बदल्याची भावना मानवी मानसिकतेत कायमच राहिली. एखाद्या सज्जनाला त्रास दिल्यास त्याला त्रास देणाऱ्यास त्याहून अधिक त्रास भोगावा लागावा, हीच त्यामागे कल्पना होती. पण वरकरणी मात्र ‘मी तशी भावना जपणारा नाही’, असा आव आणण्यात येत होता. तरीही गुन्हेगाराला शिक्षा होताना बघितली की ती मग प्रत्यक्ष जीवनात असो किंवा एखाद्या कादंबरीत वा चित्रपटात असो, आपण त्याविषयी आनंद व्यक्त करीत असतो.
बदला घेण्याची भावना मानवी स्वभावात लपलेली असतेच. काहींना अशी भावना असणे चुकीचे असल्याचे वाटते, कारण त्यामुळे मानवतावादी गाभ्याचेच नुकसान होत असते. उलट काहींना बदल्याची भावना असणे न्याय्य वाटते. गुन्हेगारांना दंड करून एकप्रकारे समानता साधण्यात येते, असा त्यांचा युक्तिवाद असतो. शिक्षा देऊन गुन्हेगार आणि गुन्ह्याला बळी पडलेली व्यक्ती यांच्यात नैतिक समानता साधण्यात येते. उलट दया दाखविल्यामुळे गुन्हेगाराला विनाकारण मोठेपणा दिला जातो.
शिक्षा दिल्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसतो असाही दृष्टिकोन असतो. तसेच सामान्य माणसाला कायद्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा मिळते. त्याची तुरुंगात जाण्याची इच्छा नसल्याने त्याच्या गुन्हे करण्यास पायबंद बसतो. पण यासंबंधी केलेल्या अभ्यासात दोन्ही घटकात कोणताही संबंध नसल्याचेच दिसून आले आहे. फाशीची शिक्षा नसलेल्या समाजात जास्त गुन्हे घडत असल्याचे आढळून आले आहे.
गेल्या ५० वर्षात पाश्चात्त्य राष्ट्रातील लोकमत हे शिक्षेपासून गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यापर्यंत बदलले आहे. गुन्हा वाईट असतो. गुन्हेगार वाईट नसतो, या उदारमतवादी विचारसरणीवर हे मत आधारलेले आहे. अमेरिकेने आपल्याकडील तुरुंगात १९५० आणि १९८० च्या काळात गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्याचे अनेक कार्यक्रम राबविले. पण हे कार्यक्रम पूर्णपणे अपयशी ठरले. कारण जे कट्टर गुन्हेगार होते ते तुरुंगातून सुटल्यावरही गुन्हे करीतच रािहले. त्यामुळे गुन्हे शास्त्राच्या अभ्यासकांचा भ्रमनिरास झाला.
महाभारतात युधिष्ठिर याचाही शिक्षेपेक्षा दया दाखविण्यावर विश्वास होता. पण दुर्योधनाने आपला दिलेला शब्द पाळला नाही आणि राज्याचा न्याय्य हिस्सा युधिष्ठिराला परत केला नाही, तेव्हा युधिष्ठिराचाही भ्रमनिरास झाला. त्यामुळे युद्धानंतर भीष्माने युधिष्ठिराला योग्य काय असते याविषयी उपदेश केला होता. भीष्मांनी सांगितले की राजधर्मानुसार शिक्षा ही आवश्यक असते कारण समाजात गुन्हेगार हे असतातच.
आज जगात जी चर्चा सुरू आहे ती अधिक संयमित राहण्याची आहे. त्यामुळे देण्यात आलेली शिक्षा ही गुन्ह्याच्या संदर्भात योग्य प्रमाणात आहे की नाही हेच बघितले जाते. पण प्रत्यक्षात असे प्रमाण आढळत नाही. एकाच देशात एकाच गुन्ह्यासाठी देण्यात येणारी शिक्षा भिन्न असू शकते. पण फाशी दिल्याने काहीही साध्य होत नसते हे जगाने स्वीकारले आहे. त्यामुळे जगातील शंभर राष्ट्रांनी फाशीची शिक्षा नाहीशी केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने केलेल्या ठरावातही ‘फाशीमुळे मानवी सन्मानाला धक्का पोचतो’ असे नमूद केले आहे.
महाभारतातील अश्वत्थाम्याची कथा ही गुन्हा आणि त्यासाठी दिलेली शिक्षा यासंबंधीची आहे. तसेही अश्वत्थामा हा आत्मविश्वास असलेला, मर्यादा बाळगणारा तरुण होता. द्रोणाचार्यांचा मुलगा असल्याने राजपुत्रांच्या सहवासातच तो लहानाचा मोठा झाला. पण युद्धाची घोषणा झाल्यावर आपण चुकीच्या बाजूने लढण्यासाठी उभे झालो आहोत हे त्याच्या लक्षात आले. तरीही तो युद्ध लढतो आणि युद्धातील कौरवांचा पराभव मान्य करतो. पण आपल्या वडिलांचा फसवणूक करून मृत्यू घडवून आणला गेला आहे हे लक्षात आल्यावर तो सूडाच्या भावनेने पेटून उठतो. पांडवांच्या सैन्याच्या मांडवाला ते निद्राधीन असताना तो पेटवून देतो. त्या आगीत द्रौपदीचे पुत्र जळून गेल्याचे कळल्यावर तीसुद्धा बदला घेण्याच्या भावनेने पेटून उठते. पांडव अश्वत्थाम्याला पकडून आणतात. पण त्याला कोणती शिक्षा द्यावी याविषयी त्यांच्यात वाद सुरू होतो. तेव्हा श्रीकृष्ण त्याला शिक्षा सुनावतात. ‘तीन हजार वर्षे तो पृथ्वीवर गुप्त रूपाने भटकत राहील आणि त्याचे शरीर रक्त आणि पू यांनीे लडबडलेले राहील’. हीच ती शिक्षा असते.
तशा शिक्षेप्रमाणे एखाद्या व्यक्तीला कैदेतच जन्मभर जगू देणे ही फार मोठी शिक्षा ठरू शकते. पण त्यासाठी राज्य सरकारवर फार मोठा आर्थिक भार पडू शकतो. भारतात तसेही कायद्याचे राज्य हे फारसे प्रभावी नसल्याने पॅरोलवर न सुटूनही तंदूर हत्त्याकांडातील आरोपी मोकळा हिंडू शकतो! भारतीय न्यायव्यवस्था ही फाशीच्या शिक्षेविषयी द्विधा मन:स्थितीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत केवळ ५७ लोकांनाच फाशी देण्यात आली आहे. जगातील ५८ राष्ट्रांनी अजूनही फाशीची शिक्षा हटविली नाही. त्यात भारत आणि अमेरिका ही राष्ट्रेसुद्धा आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाचा ठराव सांगतो की फाशीमुळे मानवी सन्मानाला धक्का लागतो, पण हे मत मला मान्य नाही. उलट फाशी दिल्यानेच मानवी सन्मानाचे रक्षण केले जाते अशी माझी भावना आहे. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी भारतात नीट होत नाही म्हणून ती शिक्षाच नसावी, या तऱ्हेचा गंभीर युक्तिवाद करण्यात येतो त्यात तथ्यही आहे. महाभारतात कृष्णाने अश्वत्थामाला जी शिक्षा केली तीच योग्य शिक्षा आहे असे मला वाटते. मृत्यूने माणसाची सुटका होते पण जन्मभर तुरुंगात एकटेपणाने रहावे लागण्याची शिक्षा अधिक भयंकर आहे असे मला वाटते. पण भारतात पैसा आणि सत्ता हे कायद्यापेक्षा प्रभावी ठरत असतात. अशा स्थितीत जोपर्यंत आपण देशात कायद्याची मजबूत यंत्रणा निर्माण करीत नाही तोपर्यंत फाशीची शिक्षा ही सर्वात गंभीर गुन्ह्यासाठीच राखीव ठेवावी.

Web Title: The death sentence should be the most serious crime!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.