भ्रष्टाचाराचे बळी

By Admin | Updated: June 22, 2015 23:27 IST2015-06-22T23:27:44+5:302015-06-22T23:27:44+5:30

आपल्या देशात माणसाच्या जिवाला काही मोल उरलेले नाही, हे वारंवार सिद्ध होत असते. विषारी दारूमुळे मुंबईत १००च्या आसपास लोक मृत्यमुखी पडल्याने

Corrupt victim | भ्रष्टाचाराचे बळी

भ्रष्टाचाराचे बळी

आपल्या देशात माणसाच्या जिवाला काही मोल उरलेले नाही, हे वारंवार सिद्ध होत असते. विषारी दारूमुळे मुंबईत १००च्या आसपास लोक मृत्यमुखी पडल्याने त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या नातेवाईकाला एक लाख रूपये देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. सरकारने आठ पोलीस अधिकारी व शिपाई यांना निलंंबितही केले आहे. त्याच्या जोडीला अबकारी खात्याच्या काही अधिकाऱ्यांवरही कारवाई केली गेली आहे. जोपर्यंत इस्पितळात असलेल्या अत्यवस्थ लोकांचे मृत्यू होत आहेत, तोपर्यंत या घटनेच्या बातम्या येत राहतील. नंतर सारे काही शांत होईल. अशा घटनांनंतर दरवेळी हेच घडत आले आहे आणि यावेळीही काही वेगळे घडण्याची अजिबात शक्यता नाही. कारण हे जे बळी पडले आहेत, त्यास मूलभूतरीत्या कारणीभूत आहेत, त्या दोन गोष्टी. कोणताही पक्ष सत्तेवर आला, तरी सरकार ज्या पद्धतीने चालवले जाते, ही त्यापैकी एक गोष्ट आणि समाज ज्या रीतीने वागत आला आहे, ती दुसरी गोष्ट. बेकायदा दारू गाळणे हा गुन्हा आहे. कायद्यात त्याला शिक्षा ठेवण्यात आली आहे. पण आपल्या देशात आता प्रश्न कायद्याचा उरलेलाच नाही. तो आहे कायद्याच्या अंमलबजावणीचा. ही अंमलबजावणी होत नाही, ते कायदा बेकायदा वागणाऱ्यांच्या वेठीला बांधला गेला असल्याने आणि तसा तो बांधण्यात राजकारणी, नोकरशहा व पोलीस या तिघांचेही हितसंबंध तयार झाल्याने. पोलिसांचेच उदाहरण घेता येईल. मुंबईसह महाराष्ट्राच्या पोलीस दलात गेल्या काही वर्षांत गुंडांना साथ देणाऱ्या अधिकारी व शिपायांची जी प्रकरणे उघडकीस आली आहेत, ती जमेस धरल्यास बेकायदेशीररीत्या दारू गाळली जाणे व त्यात १००च्या आसपास लोकांचा बळी पडणे, ही घटना पोलिसांच्या आशीर्वादाने व त्यांनी हातभार लावल्यामुळेच सुरू राहू शकते, हे कोणालाही नाकबूल करता येणार नाही. फक्त स्थानिक कनिष्ठ अधिकारी व शिपायांच्या संगनमताने हे घडत असते आणि त्यांच्यावर कारवाई केल्यास जरब बसेल, असे मानणे हा भाबडेपणाचा कळस जसा आहे, तसेच असे भासवणे हा कमालीचा बेरकीपणाही आहे. जेथे अशा घटना घडतात, त्या विभागचा सहाय्यक आयुक्त व उपआयुक्त याना त्यांची कल्पना असतेच. पण या व्यवहारातील आर्थिक वाटा त्यांच्यापर्यंत पोचवला जातो. त्यातही असा वाटा पोलीस दलातील केवळ या स्तरांपर्यंतच मर्यादित असतो, हेही खरे नाही. ही साखळी मंत्रालयापर्यंत पोचलेली असते. काही झाले तरी आपल्यावर कारवाई होणार नाही, याची पूर्ण खात्री असल्यानेच असे बेकायदा व्यवहार राजरोसपणे सुरू असतात. ‘पैसे दिले की, काहीही करायला मुभा मिळते’, हा समज आता देशातील प्रशासकीय व पोलीस सेवेबाबत समाजात चांगलाच घट्ट रूजला आहे. ज्यांच्याकडे संपत्ती व सत्ता या दोन्हींपैकी जी ‘त्रास देण्याची शक्ती’ आहे, फक्त त्यांच्यासाठीच ही प्रशासकीय व पोलीस सेवा राबवली जाऊ लागली आहे. ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी नाहीत, आणि देशातील ८० टक्के लोक या सदरात मोडतात, त्यांच्यासाठी या दोन्ही सेवांचे स्वरूप हे खंडणी वसूल करणारी यंत्रणा असे बनले आहे. आपल्या देशात भ्रष्टाचाराबाबत खूप चर्चा होते. पण गेल्या दोन अडीच दशकात या भ्रष्टाचाराला आता खंडणीचे स्वरूप आले आहे. पूर्वी काम लवकर होण्यासाठी पैसे मागितले जात, आता पैसे दिल्याविना काम होत नाही आणि पैसे दिल्यास पाहिजे ते काम कसेही करून दिले जाते, फक्त ते मोजण्यात येणाऱ्या रकमेवर अवलंबून असते. जे गैरव्यवहार करतात, ते प्रशासकीय व पोलीस यंत्रणेसमोर पैशाच्या राशी ओतत असतात आणि त्यातील पैसा राजकारण्यापर्यंत मंत्रालयात पोचत असतो. त्यामुळेच विषारी दारूचे बळी पडत असतात. दुसरा मुद्दा आहे, तो समाजाच्या वागण्याचा. दारूचाच नव्हे, तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. त्यात दारूचा अतिरेक नुसता वाईटच नाही, तर तो स्वत:ला, कुटुंबाला व समाजालाही हानिकारक ठरत असतो. पण असाा अतिरेक थांबवण्यासाठी बंदी घालणे हा उपाय नाही. तसा तो आहे असे भासवणे आणि महाराष्ट्र हे ‘मद्यराष्ट्र’ बनत असल्याचे सांगणे हाही नैतिकतेचा अतिरेकच आहे. नशा मग ती दारूची असो वा नैतिकतेची, ती हानिकारकच असते. आज आपण ‘माफिया’ हा शब्द सर्रास वापरतो. त्याची सुरूवात अमेरिकेतील विसाव्या शतकातील पहिल्या दोन तीन दशकातील दारूबंदीच्या धोरणाचा वापर करून गब्बर झालेल्या इटलीच्या सिसली भागातील गुन्हेगारी टोळ्यांवरून झाली आहे. ‘गॉडफादर’ हा गाजलेला चित्रपट याच काळावर आधारलेला होता आणि राजकारण्यांपासून न्यायाधीशांपर्यंत सर्वांना पैशाच्या जोरावर या माफिया टोळ्या कशा वेठीला धरत असत, याचे जे चित्रण या चित्रपटात आहे, तेच आज एक शतकानंतर आपल्या देशात दिसत आहे. अमेरिकेत याला लगाम घातला गेला, तो कायद्याची कठोर अंमलबजावणी करून, बंदी न घालता नियमन करून आणि अतिरेकी नैतिकतेच्या आहारी न जाऊन. त्याला आपल्या देशात समाज प्रबोधनाच्या व्यापक चळवळीची जोड द्यावी लागेल. असे काही करायची राजकीय व सामाजिक इच्छाशक्ती आपण दाखवत नाही, तोपर्यंत असे दारूचे बळी पडतच राहणार आहेत.

Web Title: Corrupt victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.