Coronavirus : कोरोनाचे संकट जागतिक असले तरी भारताला अत्यंत गंभीर धोका, निर्धाराने बचाव करण्याचा पर्यायच हाती

By विजय दर्डा | Published: March 23, 2020 02:57 AM2020-03-23T02:57:58+5:302020-03-23T04:44:27+5:30

Coronavirus : तुलनेसाठी आपण चीनचे उदाहरण घेऊ. कारण लोकसंख्येच्या बाबतीत आपण व चीन जवळजवळ सारखेच आहोत.

Coronavirus: Corona crisis is a global threat, but serious threat to India | Coronavirus : कोरोनाचे संकट जागतिक असले तरी भारताला अत्यंत गंभीर धोका, निर्धाराने बचाव करण्याचा पर्यायच हाती

Coronavirus : कोरोनाचे संकट जागतिक असले तरी भारताला अत्यंत गंभीर धोका, निर्धाराने बचाव करण्याचा पर्यायच हाती

googlenewsNext

- विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

कोरोना प्रसाराची सुरुवात जेथून झाली त्या चीनने या साथीवर तीन महिन्यांनी जवळजवळ नियंत्रण मिळविले आहे. पण जगाच्या अन्य देशांत या महामारीने कहर केला आहे. इटली, इराण आणि स्पेन या देशांची अवस्था खूपच बिकट आहे. युरोपमधील अन्य शहरे व अमेरिकेतील परिस्थितीही चांगली नाही. जेथे लोक भारताएवढे मिळून-मिसळून राहात नाहीत अशा देशांतील ही स्थिती आहे. तेथील वैद्यकीय सुविधा आधुनिक व अधिक सुसज्ज आहेत. तरीही ते कोरोनाचा अटकाव करू शकलेले नाहीत. अशा परिस्थितीत भारताची स्थिती काय आहे, असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे.
तुलनेसाठी आपण चीनचे उदाहरण घेऊ. कारण लोकसंख्येच्या बाबतीत आपण व चीन जवळजवळ सारखेच आहोत. चीनचे क्षेत्रफळ मात्र भारताच्या जवळपास तिप्पट आहे. लोकसंख्येच्या घनतेच्या दृष्टीने विचार केला तर आपली अवस्था अधिक गंभीर दिसते. ताज्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या १३८
कोटींहून थोडी जास्त, तर चीनची १४३ कोटी आहे. घनतेचा विचार केला तर चीनमध्ये लोकसंख्येची घनता प्रति चौ. किमी १४७ तर भारतात ती ४०० हून जास्त आहे! कोरोनाचा सुगावा लागताच चीनने संपूर्ण वुहान शहरात ‘लॉकडाउन’ लागू केले. संपूर्ण वुहान शहर निर्जंतुक केले गेले. असे कठोर उपाय योजणे आपल्याला शक्य आहे? तेवढ्या सुविधा आपल्याकडे आहेत?
आपले डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, पॅरामेडिकल कर्मचारी व अधिकारी केवळ सक्षमच नव्हेत तर पूर्णपणे समर्पित आहेत, याविषयी जराही शंका नाही. सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत ते जे अहोरात्र काम करत आहेत त्याची प्रशंसा करावी तेवढी थोडी होईल. स्वत:ची गंभीर आजारी असलेली आई इस्पितळात असूनही कोरोनाविरुद्धच्या लढाईत रात्रंदिवस आघाडी सांभाळणारे राजेश टोपे यांच्यासारखे सार्वजनिक आरोग्यमंत्री महाराष्ट्रात आहेत. जागरूकतेने व तातडीने निर्णय घेण्याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही अभिनंदन करीन. कोरोनाची पहिली बातमी आल्यापासून कामाला जुंपून घेऊन परिस्थिती आटोक्यात ठेवणारे पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम व यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनाही माझा सलाम! अशा संकटसमयी जनतेपर्यंत बातम्या त्वरेने पोहोचाव्यात यासाठी निर्भयपणे काम करणारे इलेक्ट्रॉनिक व प्रिंट माध्यमांमधील पत्रकार, वृत्तपत्रे घरोघरी पोहोचविणारे व मीडियात काम करणाऱ्या इतर सर्वांनाही माझा दंडवत.
एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेली बातमी वाचून मी थक्क झालो. भारतात दिवसाला आठ हजार चाचण्या घेण्याची क्षमता आहे. पण प्रत्यक्षात खूपच कमी चाचण्या केल्या जातात. १८ मार्चपर्यंत देशभरात फक्त ११ हजार ५०० चाचण्या केल्या गेल्या होत्या आणि २२ मार्चपर्यंत त्या अवघ्या १७ हजारांवर पोहोचल्या़ पण त्या पुरेशा आहेत, असे तर नक्कीच म्हणता येणार नाही. दक्षिण
कोरिया, तैवान व जपान हे आपल्या तुलनेत खूपच लहान देश आहेत. पण या देशांनी कोरोनासाठी लाखो लोकांच्या चाचण्या केल्या आहेत.
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयम व संकल्पाचे जे आवाहन केले आहे ते खूप महत्त्वाचे आहे. मोठ्या प्रमाणावर चाचण्यांची सोय करणे ही जशी सरकारची जबाबदारी आहे, तसेच विनाकारण घराबाहेर न पडणे हेही लोकांचे कर्तव्य आहे. आपण देवभूमीचे रहिवासी आहोत, श्रद्धाळू आहोत व आपल्याकडे बºयाच गोष्टी रामभरोसे होत असतात. पण लोक गांभीर्य ओळखतील व पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे सांगतील त्याचे पूर्णपणे पालन करतील, अशी आशा धरायला हवी. ‘जनता कर्फ्यू’च्या यशाने याचे चांगले संकेतही मिळाले आहेत.
थोडा वेळ लागेल, पण कोरोनाविरुद्धचे हे युद्ध आपण नक्की जिंकू. पण त्यानंतर कोरोनानंतरचे जे परिणाम मागे राहतील त्याविरुद्धची दुसरी लढाई सुरू होईल. ती लढाई आर्थिक संकटाशी असेल. भारत आधीपासूनच आर्थिक अडचणीत असल्याने आपल्या दृष्टीने या संकटाचे गांभीर्य इतरांहून जास्त आहे. कोरोनावर आपण विजय मिळवू, पण त्यानंतरच्या मंदीवर मात करणे हे खूप मोठे आव्हान असेल, हे विचारवंत उद्योगपती आनंद महिंद्र यांचे म्हणणे योग्यच आहे.
आणखी दोन गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे ज्या शहरांमध्ये ‘लॉकडाउन’ सुरू झाले आहे, तेथे हातावर पोट असणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. कोरोना संकटाने डबघाईला आलेल्या उद्योगधंद्यांनाही सरकारला मदतीचा हात द्यावा लागेल. दुसरे असे की, अशा प्रकारच्या संकटांशी मुकाबला करण्याचा ‘डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन’ आपल्याला तयार करावा लागेल. अशा सुनिश्चित योजनेमुळेच गेल्या वर्षी फानी चक्रीवादळाने ओदिशात फारसे नुकसान झाले नाही. आज त्या यशस्वी योजनेचा जगात अभ्यास केला जात आहे. तशीच तयारी आपल्याला जैविक संकटासाठीही करावी लागेल.
काही झाले तरी कोरोनाने घाबरून जाऊ नका. स्वत:ची काळजी घ्या, आपल्या परिसरात स्वच्छता ठेवा. त्यानेच आपण हे युद्ध जिंकू शकणार आहोत, याची खात्री बाळगा.

Web Title: Coronavirus: Corona crisis is a global threat, but serious threat to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.