सहकारात विरोधाला बळ
By Admin | Updated: March 5, 2015 22:48 IST2015-03-05T22:48:04+5:302015-03-05T22:48:04+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मातब्बरांनीे हे गड सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित केलेले दिसत असले तरी विरोधकांचे वाढते बळ लक्षवेधी म्हटले पाहिजे.

सहकारात विरोधाला बळ
सहकाराचा गड सध्या निवडणुकीच्या निमित्ताने ढवळून निघाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मातब्बरांनीे हे गड सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित केलेले दिसत असले तरी विरोधकांचे वाढते बळ लक्षवेधी म्हटले पाहिजे.
नगर जिल्ह्याचे राजकारण सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने ढवळून निघाले आहे. सहकार हा येथील राजकारणाचा आत्मा ! याच बळावर जिल्ह्यातील नेत्यांनी राज्याच्या राजकारणातील वकूब टिकवला. सहकारातील हेच वर्चस्व त्यांच्या राजकीय वाटचालीला कायम पूरक ठरत आले. याच सहकारात सध्या बरीच उलथापालथ घडताना दिसत आहे. मातब्बरांच्या सत्तेला आव्हानाचे स्वर उमटू लागले आहेत. या आव्हानामध्ये हवा भरण्याचे काम सोयीस्कररीत्या सुरू आहे.
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वातील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना (प्रवरा), माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना (संगमनेर), राष्ट्रवादीचे नेते यशवंतराव गडाख यांच्या नेतृत्वातील मुळा सहकारी साखर कारखाना (सोनई) व माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वातील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना (भेंडा) निवडणूक चर्चेत आहे ती विरोधकांमुळे !
आजवर कारखान्यांवर काँगे्रस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकहाती वर्चस्व आहे. आताही परिस्थिती बदण्याची शक्यता कमीच! मात्र निवडणुकीच्या निमित्ताने सहकारात उमटलेले विरोधाचे सूर आगामी राजकारणासाठी लक्षवेधी म्हटले पाहिजे. राजकीय उट्टे काढण्याचेही प्रकार घडत आहेत. विरोधाला एकमेकांची ‘मतलबी’ फूस, हादेखील यातील महत्त्वाचा मुद्दा ! त्यामुळे विरोधाचा हा स्वर पराभूत झाला तरी त्याचे परिणाम दूरवर असतील.
आजवर एकमेकांच्या सहकारक्षेत्रात ढवळाढवळ न करण्याची प्रथा या नेत्यांनी पाळली आहे. एकप्रकारे आपापला गड सुरक्षित राखण्यासाठी असलेला तो राजकीय तहच ! यंदा त्याला तडे जाताना दिसत आहेत. यात सेना-भाजपा स्वत:साठी जागा शोधताना दिसत आहे. विखेंच्या प्रवरा कारखान्यात पारंपरिक विरोधक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू आणि रावसाहेब म्हस्के यांच्या नेतृत्वातील प्रवरा शेतकरी मंडळाच्या मदतीसाठी स्थानिक सेना-भाजपा नेते अनाहुतपणे धावले. कडू हे थोरात यांचे नातेवाईक. मात्र अद्याप कडू-म्हस्के यांनी ही मदत स्वीकारलेली नाही. संगमनेरात थोरात साखर कारखान्यात थोरात यांनाही विरोधाचा सामना करावा लागत आहे. या विरोधात हवा भरल्याचा संशय विखेंवर व्यक्त केला जातो.
राष्ट्रवादीचे गडाख आणि घुले या नेत्यांमध्ये विस्तव जात नाही. घुलेंच्या ज्ञानेश्वर साखर कारखान्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, दिलीप लांडे आणि नेवाशाचे भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे पॅनल ज्ञानेश्वरमधील घुलेंच्या सत्तेला धक्का देण्यासाठी उत्सुक आहे. यातील लंघे व लांडे हे गडाख यांचे समर्थक तर आमदार मुरकुटे हे कट्टर विरोधक. विधानसभा निवडणुकीत याच मुरकुटेंनी माजी आमदार घुले यांच्या अप्रत्यक्ष मदतीने शंकरराव गडाख यांचा पराभव केला होता. आता मात्र तेच घुलेंविरोधात दंड थोपटत आहेत. त्याचवेळी आमदार मुरकुटे गडाख यांच्या मुळा कारखान्यात विरोधक म्हणून पुढे आले आहेत. आपापल्या ताब्यातील सहकारी संस्था अधिक सुरक्षित करण्यासाठी मातब्बरांनी कंबर कसलेली दिसते मात्र त्याचवेळी विरोधकांचेही बळ वाढते आहे. आगामी काही काळ हा सामना चर्चेत असेल.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक तोंडावर आहे. जिल्ह्यातील सहकाराला संजीवनी देणाऱ्या या संस्थेवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामागे अर्थातच त्यांचे राजकीय विरोधक, राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे नाव घेतले जाते. त्यामुळे साखर कारखान्यानंतर अर्थसत्तेवरील वर्चस्वासाठी राजकीय साठमारी होण्याची शक्यता आहे.
- अनंत पाटील