अध्यक्ष ‘निवडण्या’साठी काँग्रेसचे ‘मुंबई मॉडेल’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 06:47 AM2020-12-24T06:47:34+5:302020-12-24T06:50:20+5:30

Congress : काँग्रेस महासमितीच्या धुरिणांचे हे ‘मुंबई मॉडेल’ नेमके कसे काम करते? सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या १० जनपथवरच्या बैठकीत काय घडले?

Congress's 'Mumbai model' for 'electing' president | अध्यक्ष ‘निवडण्या’साठी काँग्रेसचे ‘मुंबई मॉडेल’ 

अध्यक्ष ‘निवडण्या’साठी काँग्रेसचे ‘मुंबई मॉडेल’ 

Next

- हरीष गुप्ता
(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)

प्रतिष्ठेच्या काँग्रेस पक्ष अध्यक्षपदासाठी समजा निवडणूक झालीच तर सोनिया गांधी यांच्या जागी नवा अध्यक्ष लोकशाही प्रक्रियेतून कसा निवडला जाईल? अलीकडच्या काळातील घडामोडी पाहता अनेकांना हा प्रश्न पडला असेल. या निवडणुकीची प्रक्रिया प्रदीर्घ  असेल. सगळ्यात आधी देशभरातून ‘अखिल भारतीय काँग्रेस महासमिती प्रतिनिधी’ निवडले जातील. यांची संख्या १४०० हून अधिक असेल. पुढे हे अ. भा. काँग्रेस महासमिती प्रतिनिधी  काँग्रेसची नवी कार्यकारी समिती निवडतील. नंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये नवा अध्यक्ष निवडला जाईल. अर्थात निवडणूक पुढे ढकलली गेली नाही, तर हे असे याच क्रमाने घडेल.

दरम्यान, काँग्रेस महासमितीच्या धुरिणांनी एक नवीच पद्धत शोधून काढली आहे. ही पद्धत अलीकडेच मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष निवडण्यासाठी  वापरली गेली. मुंबईत या पद्धतीचा पहिला प्रयोग झाल्याने या पद्धतीला आता ‘मुंबई मॉडेल’ असेच संबोधले जात आहे. काय आहे हे ‘मुंबई मॉडेल’?  महाराष्ट्राच्या प्रभारी सरचिटणीसांनी ४५० नियोजित पक्ष पदाधिकाऱ्यांना मोबाइलवर  एक मौखिक संदेश पाठवला. या संदेशात काय म्हटले होते, ‘मी महासमिती प्रभारी एच. के. पाटील बोलत आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष कोण असावा, असे तुम्हाला वाटते, यावर मला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे. बीप आवाज झाल्यावर फक्त एक नाव तुम्ही सांगायचे. तुमचे उत्तर गुप्त राखले जाईल. धन्यवाद!’ 

आता ही सगळी कवायत नेमकी कोणी पार पाडली आणि कोणी नाही हे कोणालाच माहीत नाही. मात्र, राहुल गांधी यांच्या आशीर्वादाने चाललेल्या या नव्या पद्धतीत सगळे ठिकठाक पार पडेल, याची काळजी घेतली गेली. अत्यंत सफाईने सगळे केले गेले. अर्थात ‘तो’ फोन आला तेव्हा कोणी कोणते नाव सांगितले आणि मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष त्यातून कसा निवडला गेला, हे या क्षणापर्यंत ४५० पैकी कोणत्याच पदाधिकाऱ्याला नीटसे माहीत नाही, ही गोष्ट वेगळी!  पण आता हे मात्र स्पष्ट झाले आहे की, हे ‘मुंबई मॉडेल’ वापरूनच काँग्रेस महासमितीची निवड होईल. त्याचे कारण अगदी साधे आहे. राहुल गांधी यांच्या समर्थकांनी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष करण्याचा चंग बांधला आहे. महासमितीचे प्रसिद्धी प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी तर जाहीरपणेच सांगितले  आहे की, ९९.९ टक्के काँग्रेसजनांना राहुल हेच अध्यक्ष म्हणून हवे आहेत. 
महासमितीच्या प्रतिनिधींपैकी ९९.९ टक्के प्रतिनिधींचे मत हे असे आधीच कळल्यावर मग उरले काय? अंतिम शब्द लिहिला जाणे  एवढेच बाकी उरते!

राहुल आणि त्यांचा नवा मोबाइल 
सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी, १० जनपथ येथे पाच तास बैठक झाली, तेंव्हा राहुल आणि प्रियांका आलेल्यांचे आगतस्वागत करत होते. खरे तर गांधी मंडळींची इच्छा झूमवर ऑनलाइन बैठक घ्यावी अशी होती; पण गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भूपिंदरसिंग हुडा यांच्यासह कोणत्याच बंडखोराला ही अशी ऑनलाइन चर्चा नको होती. त्यांनी समोरासमोर भेटीचा आग्रह धरला आणि सोनियांनी तो मान्यही केला. मात्र, राहुल त्यांच्या नव्या ‘आय फोन १२’ वर बोलण्यात गर्क होते, हे अनेक नेत्यांना खटकले. या बैठकीत सामील झालेल्या एका नेत्याने सांगितले की, राहुल तब्बल तीन तास फोनवर होते. मध्येच कमलनाथ, ए. के. एंटोनी यांच्याशी बोलण्यासाठी ते बैठक सोडून गेले. अधूनमधून फोन तर घेतच होते. उलट सोनिया गांधी मात्र अजिबात न उठता सलग ५ तास बैठकीत बसून होत्या.

हुडा यांचा बैठकीत दणका 
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा हे एरवी मवाळ बोलतात. क्वचितच कठोर होतात; पण सोनियांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत स्पष्ट बोलणारे ते बंडखोरांपैकी एकमेव निघाले. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण या आणि इतर पत्रलेखक बंडखोरांनी काहीसा सामंजस्याचा सूर लावला होता खरा; पण हुडा यांनी मात्र एकदम काहीच आडपडदा न ठेवता बोलायला सुरुवात केली. एकदाच काय ते स्पष्ट बोलून मोकळे व्हायचे, हे त्यांनी ठरवले असावे. त्यांच्या बोलण्याने  हिरवळीवरील एरवी उबदार अशा  बैठकीत एकदम हुडहुडीच भरली. हुडा म्हणाले, ‘बडोद्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत १०० कोटी रुपये ओतून ती कडवी झुंज जिंकणाऱ्या भाजपविरुद्ध हरियाणात मी एकाकी लढत आहे. तरीही अनेक अडचणींचा सामना करत आपण भाजपला मात देत आहोत.’ एवढे बोलून हुडा थांबले नाहीत. गतवर्षी  विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्याला हरियाणात पक्षनेता केले असते तर आपण ती निवडणूक जिंकून दिली असती, असेही त्यांनी सांगून टाकले. ‘राज्यातल्या लोकांना मी हवा आहे; पण दुर्दैव असे की, दिल्लीला मी नको आहे.’,  हे सांगायलाही ते कचरले नाहीत. 

नड्डा यांची वाढती वट 
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा  यांना कोविडने गाठले होते. आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा कारभार गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या हातात घेतला. काहीशा कोड्यात टाकणाऱ्या कारणांनी बिहार निवडणुकीत ते सक्रिय दिसले नाहीत; पण आता बंगालमध्ये मात्र ममता बॅनर्जी यांना त्यांनी शिंगावर घेतले आहे. अर्थात नड्डा स्वस्थ बसलेले नाहीत. घरात राहून त्यांनी काम चालू ठेवले आहे. पश्चिम बंगालच्या ७ विधानसभा विभागांत सूत्रे हलवण्यासाठी त्यांनी सात केंद्रीय मंत्र्यांची निवड केली. असे म्हणतात की, ही निवड पंतप्रधानांच्या इच्छेनुसार केली गेली. मर्जीतल्या अनेक मंत्र्यांना बाजूला ठेवले गेल्याने आश्चर्यही व्यक्त झाले. बिहार निवडणुकीनंतर नड्डा यांची वट चांगलीच वाढली, हे उघड दिसते आहे. अगदी अलीकडची गोष्ट - भाजपचे राज्य असलेल्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांना मोदी यांची भेट हवी होती; परंतु ‘आधी पक्षाध्यक्षांना भेटून काय ते त्यांना सांगा,’ असे कोणाचे मन दुखावणार नाही, अशा पद्धतीने कळवण्यात आले.

Web Title: Congress's 'Mumbai model' for 'electing' president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.