शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला चांगले दिवस येतील, शिवसेना, राष्ट्रवादीत पडलेली फूट पथ्यावर पडू शकते; पण...

By यदू जोशी | Updated: August 11, 2023 13:09 IST

शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकते. धर्मनिरपेक्ष मते काँग्रेसकडे एकवटतील; पण नेते ‘विचारा’ने वागतील का?

-यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद आणि प्रदेशाध्यक्षपद हे दोन्ही विदर्भाकडे राहणार नाहीत आणि दोन्ही पदे ओबीसींकडे राहणार नाहीत, त्यामुळे नाना पटोले यांच्या जागी नवीन चेहरा दिला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. युवक काँग्रेस (कुणाल राऊत), महिला काँग्रेस (संध्या सव्वालाखे) आणि अल्पसंख्याक मोर्चा (आ. वजाहत मिर्झा) अशी पक्षसंघटनेतील तीन प्रदेशाध्यक्ष पदेदेखील विदर्भाकडेच आहेत. हा तर्क देऊन पटोले यांच्या जागी नवीन चेहरा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीत लॉबिंग होत आहे. वडेट्टीवार आणि संग्राम थोपटे अशी दोन नावे विरोधी पक्षनेते पदासाठी होती. थोपटे यांना हे पद द्या, म्हणून ३० आमदारांनी सह्यादेखील केल्या होत्या; पण जमले नाही. पक्षातील सिनिअर लॉबी जिंकली. 

ज्येष्ठ नेत्यांनी वडेट्टीवार यांच्यासाठी वजन वापरले. वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेतेपद दिले की पटोले यांचे रिटर्न तिकीट काढण्याचा मार्ग मोकळा होईल, हा विचार करून नितीन राऊत, सुनील केदार, यशोमती ठाकूर यांनी विजूभाऊंची बाजू घेतली असणार. याच विचारातून मग बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनीही विजूभाऊंच्या पारड्यात वजन टाकले असेल. तरीही पटोले यांना बदलणे एवढे सोपे नक्कीच नाही. ते राहुल गांधींच्या मर्जीतले आहेत. ‘मी भाजपला हेडऑन घेतो, जोरदार शाब्दिक हल्ले चढवतो,’ असे इम्प्रेशन त्यांनी दिल्लीत जमवले आहे. दुसरीकडे सकाळी सकाळी फक्त बाइट देऊन भाजपला राज्यात संपवता येणार नाही, असा युक्तिवाद त्यांच्याविरोधात दिल्लीत मोर्चेबांधणी करणारे करत आहेत. ‘निवडणुकीपर्यंत मीच अध्यक्ष राहणार,’ असे नानाभाऊ सांगत आहेत; दिल्लीने मात्र काहीही सांगितलेले नाही. 

- विदर्भाला मिळालेली पदे दिसतात; पण विदर्भानेच काँग्रेसला जास्त यश मिळवून दिले मग दोन्ही पदे विदर्भाकडेच राहायला काय हरकत आहे, हा युक्तिवाद पटोलेंच्या मदतीला धावून जाऊ शकतो. तरीही जातीय व प्रादेशिक संतुलनाचा भाग म्हणून त्यांना हटवायचे ठरले तर मराठा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या समीकरणातून प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहरा दिला जाईल. कोल्हापूरचे आ. सतेज (बंटी) पाटील, धुळ्याचे आ. कुणाल पाटील अशी काही नावे त्यादृष्टीने चर्चेत आहेत.

या आधीचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार भाजपमध्ये वा भाजपसोबत गेले. त्यामुळे आता भाजपच्या अंगावर जाईल आणि त्यांचे अंग बनणार नाही, या अपेक्षेने वडेट्टीवार यांना काँग्रेसने संधी दिली आहे. भाजपच्या जबड्यात हात घालून त्यांचे दात मोजणारा नेता, अशी वडेट्टीवार यांची चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिमा आहे, ती त्यांना राज्यात न्यावी लागेल. वैयक्तिक स्वार्थासाठी ते पक्ष कॉम्प्रमाइज करत नाहीत, असे चंद्रपूरमध्ये बरेचदा दिसले; पण आता राज्यात दाखवावे लागेल. 

कोकणात काँग्रेसचा एकही आमदार नाही, उत्तर महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतकेच आहेत. पश्चिम महाराष्ट्रातही एक- दोन गड सोडले तर सगळे ढासळले आहेत. पक्षसंघटना अनेक ठिकाणी खिळखिळी आहे. मात्र, शिवसेना आणि मुख्यत्वे राष्ट्रवादीत पडलेली फूट काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकते. धर्मनिरपेक्ष मते काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात एकवटतील, असे दिसत आहे. शरद पवार हे भाजपविरोधात शड्डू ठोकून असले तरी त्यांचा पक्ष पूर्वीसारखा भाजपला पर्याय ठरू शकत नाही, असे या मतदारांना वाटते आणि हे काँग्रेसच्या पथ्यावर पडेल. अर्थात पवार हे काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) यांच्यासोबतच राहतील, असे आजचे चित्र आहे. फुटीपूर्वीचे आठवा, विदर्भाचेच उदाहरण द्यायचे तर भंडारा- गोंदिया, अमरावती, वाशिम, गडचिरोली, बुलढाणा अशा पाच जागा ते मागत होते. आता फुटीनंतरच्या शरद पवार गटाची तेवढी बार्गेनिंग पॉवर राहणार नाही, ही बाबही काँग्रेसला जागावाटपात जादा जागा देऊन जाऊ शकेल. शिवसेनेतील फुटीचा असाच फायदा काँग्रेस घेऊ शकेल. महाविकास आघाडीत काँग्रेस हा एकच अभेद्य पक्ष उरला आहे. त्यामुळे २०१९ मध्ये महाविकास आघाडीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली काँग्रेस आज पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे, या मुद्यावर काँग्रेसचे नेते पक्षासाठी आघाडीच्या वाटपामध्ये किती जागा खेचून आणतात हे महत्त्वाचे असेल. 

अभेद्य काँग्रेसमधील काही दिग्गज नेत्यांवर भाजपची नजर आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी धमाका करू, असे भाजपचे नेते खासगीत सांगतात. वडेट्टीवार यांच्यावरही मध्यंतरी जाळे टाकले गेले होते; पण ते फसले नाहीत. फडणवीस आमचे विरोधक आहेत; पण वैयक्तिक मित्र आहेत असे सांगणारे काही काँग्रेस नेते आहेत. ते संशयित आहेत.  

काँग्रेसचे असे काही आमदारही आहेत जे आपण भाजपच्या तिकिटावर लढणार, असे खासगीत सांगतात. त्यांची यादी पटोलेंकडे असेलच. शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर त्यापैकी विरोधात असलेल्या गटांची  भीती आज भाजपला राहिलेली नाही. भाजपला भीती वाटत असेल ती नक्कीच काँग्रेसची. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच काँग्रेसला वाढण्याची मोठी संधी मिळताना दिसते; पण प्रत्येक नेत्याचा एक गट असलेल्या या पक्षातील नेते एकत्रितपणे पक्ष वाढवतील का, याबाबतही शंका आहे. मध्यंतरी काँग्रेसच्या आमदारांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणावळ झाली, त्याचे बिल प्रदेश काँग्रेसची एफडी मोडून दिले, अशी माहिती आहे. श्रीमंत नेत्यांचा भरणा असलेल्या काँग्रेसची ही गरिबावस्था आहे. साखर कारखाने, अन्य उद्योगधंदे, शिक्षण संस्थांमधून होणाऱ्या भक्कम कमाईचा तीन टक्के सीएसआर (काँग्रेस सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) फंड नेत्यांनी पक्षासाठी दिला तर ही वेळ येणार नाही!

टॅग्स :congressकाँग्रेस