टॉनिकच्या शोधात काँग्रेस
By Admin | Updated: May 22, 2014 08:38 IST2014-05-22T08:38:21+5:302014-05-22T08:38:21+5:30
काँग्रेस हा पक्ष नव्हे एक विचार होता. पुढे विचारांची जागा सत्तेने, पैशाने घेतली. त्याची फळं देश भोगत आहे.

टॉनिकच्या शोधात काँग्रेस
मोरेश्वर बडगे
'अशी निवडणूक देशाने पाहिली नव्हती. काँग्रेसला नुकसान होईल, असे सारेच मानत होते; पण एवढी अपेक्षा नव्हती. विदर्भात गोंदिया व वर्धा या दोनच जागा काँग्रेसला शुअर शॉट मानल्या जात होत्या. प्रफुल्ल पटेल निघून जातील, असे भाजपावालेच खासगीत बोलत होते. नाना पटोले, रामदास तडस, कृपाल तुमाने स्वत:ला चिमटे काढत असतील. लाख-दोन लाखांचा लीड कशाला म्हणतात? एकदम छप्पर फाडके. ही भाजपाची ताकद नाही. मूळची काँग्रेसचीच ही मतं आहेत. काँग्रेसला काँग्रेसवालेच हरवू शकतात. नागपुरात विलास मुत्तेमवारांना पाडणारे काँग्रेसवालेच होते. लोकसभा निवडणुकीत देशभरातून काँग्रेसला फक्त ४४ जागा मिळाल्या. या जोरावर लोकसभेतले विरोधी पक्षनेतेपदही मिळत नाही. काय दशा करून ठेवली काँग्रेसची. काँग्रेस हा पक्ष नव्हे एक विचार होता. पुढे विचारांची जागा सत्तेने, पैशाने घेतली. त्याची फळं देश भोगत आहे. चार महिन्यांनंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत. कसे व्हायचे? लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी २४० विधानसभा मतदारसंघात महायुतीला मताधिक्य आहे. काँग्रेसचा गड मानल्या जाणार्या विदर्भात तर काँग्रेस कोमात आहे. केवळ पुसद, मेळघाट आणि तिरोडा या तीन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस आघाडीला मताधिक्य आहे. युतीला ५० टक्के मतं मिळाली तर काँग्रेस आघाडी ३५ टक्क्यांवर थांबली. १५ टक्क्यांचा फरक आहे. कसा कापणार हा फरक? २००९च्या निवडणुकीत हा फरक ४ टक्क्याचा होता. युतीला ३५ टक्के तर आघाडीला ३९ टक्के मतं होती. ‘मोदी इफेक्ट’ किती जोरदार होता, त्याचे हे उदाहरण पाहा. लोकसभेसोबतच वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये विधानसभा पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अमित झनक हे १२ हजार मताधिक्याने विजयी झाले; पण त्याच मतदारसंघात भाजपचे लोकसभेचे उमेदवार संजय धोत्रे यांना २८ हजारांची लीड मिळाली. जनतेला मोदींना पंतप्रधान म्हणून पाहायचे होते, त्यामुळेच एकाच मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभेसाठी लोकांनी वेगवेगळा कौल दिला. आता बोला! मोदींचा प्रभाव आणखी चार महिने टिकला तर विधानसभा निवडणुकीत भगवा अटळ आहे. लोकसभा निवडणुकीतली समीकरणे विधानसभा निवडणुकीत चालत नाहीत, असा आतापर्यंतचा इतिहास आहे; पण सध्याच्या हवेत सारी गणितं फेल होत आहेत. त्यात मोदींनी गॅस सिलिंडर, पेट्रोल स्वस्त केले तर सुपडासाफ. चार महिन्यांत माणसाचे मन सहसा बदलत नाही. मोदींचा काही घोटाळा बाहेर आला तर गोष्ट वेगळी. एनडीएवाले आपसात भांडले तर मामला बिघडेल. मंत्रिमंडळ बनू द्या. पाहा हे कसे भांडतात ते. जागा वाटपावरूनही सेना-भाजपात वाजू शकते. शिवसेनेने गेल्या निवडणुकीत १७१ जागा लढविल्या होत्या व ४४ जिंकल्या होत्या. भाजपाने ११९ जागा लढविल्या व ४६ जिंकल्या. विदर्भ राज्य होऊ देणार नाही, असे सांगून शिवसेनेचे सुप्रीमो उद्धव ठाकरे यांनी तलवार उपसली आहे. असा कसा देणार नाही? युती तुटली तरी चालेल. नितीन गडकरींनी दाबून सांगितले पाहिजे. सेनेचे फालतू लाड पुरविणे थांबले पाहिजे. भाजपासाठी ही शत-प्रतिशत चांगली वेळ आहे. १९७७च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात २१६ विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस मागे होती. नंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुढे आली; पण ७७ मध्ये ‘मोदी फॅक्टर’ नव्हता. आज आहे. कोण अडविणार मोदींना? बाबा? दादा? आबा? कोणामध्ये धमक आहे? जातीयवादाचा धोका सांगून किंवा मोदी देश तोडायला निघाले असल्या कॅसेट वाजवून मोदींना अडविता येणार नाही. नव्याने मतदार बनलेल्या तरुणांसाठी शरद पवार प्रभावी ठरताना दिसत नाहीत. सहकार चळवळ मृतावस्थेत आहे. कुणाच्या ताकदीवर शरदराव फिरणार? मोदींना रोखायचे तर मोदींच्या भाषेत बोलावे लागेल. आता जाहीर सभा विसरा. सोशल मीडिया, टीव्ही चॅनलवर जाऊन आक्रमक पद्धतीने मार्केटिंग करावे लागेल. काय सांगाल तिथे? जिल्हा बँका, सहकारी साखर कारखाने कुणी खाल्ले? गोसी खुर्द, मिहान प्रकल्प विकासाची थडगी बनत चालली आहेत. दहा वर्षांत विदर्भात एकही मोठा उद्योग आला नाही. कुणाला काळजी? परवा मंत्री अनिल देशमुख सांगत होते, ‘मिहानमधील वीज संकटाची समस्या वारंवार लक्षात आणून देऊनही मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली नाही. बसू म्हणतात; पण बसत नाहीत.’ काँग्रेसवाले मोठे हुशार आहेत. सोनिया-राहुलना त्यांनी राजीनामा देऊ दिला नाही, त्यामुळे हेही बिनधास्त झाले. संघ परिवारातले एक विचारवंत मा. गो. वैद्य म्हणतात, गांधी घराणेशाहीतून मुक्त केले तरच काँग्रेस वाढू शकते; पण गांधी कुटुंबाला वजा केले तर काँग्रेसमध्ये उरते काय? आता प्रियांकाला आणले तरी मजा नाही. खूप उशीर झाला आहे. मग काँग्रेसला टुणटुणीत करण्याचा काय फॉर्म्युला आहे? पृथ्वीराज चव्हाण यांना बदलायचे? माणिकराव ठाकरे यांना बदलायचे? बदलायचे म्हटले तर संपूर्ण काँग्रेस पक्ष रिकामा करावा लागेल. बदलून आणणार कुणाला? माणसं आहेत कुठे? नेतेच नाहीत, आहेत त्यांना पुढे येऊ देत नाहीत. भाजपा पाहा. देवेंद्र, संदीप जोशी, अनिल सोले, कृष्णा खोपडे, संजय भेंडे... कार्यकर्त्यांची फॅक्टरी आहे. धरमपेठेतला देवेंद्र चांगला तय्यार झालाय. गडकरी-मुंडे दोघांनाही एकाच वेळी सांभाळतोय. काँग्रेसला काय धाड भरली? महाराष्टÑात नेता नव्हता म्हणून पृथ्वीराजबाबांना दिल्लीतून उचलून आणले. बाबांचा स्वभाव, कामाची पद्धत ठाऊक असतानाही आणले. तीन वर्षांत बाबांनी किती कार्यकर्त्यांना जवळ केले. कार्यकर्ते इस्टेट मागत नव्हते. विशेष कार्यकारी दंडाधिकारी केले तरी ते खूश असते; पण तेवढेही करता आले नाही. लोकप्रतिनिधी लोकांशी बोलतच नाहीत. जनसंपर्कच खुंटला आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर काँग्रेस सत्ता भोगत आली. आज कार्यकर्तेच नाहीत. कार्यकर्त्यांच्या नावावर बिल्डर, व्यापारी, ठेकेदार घुसले आहेत. काँग्रेस जिंकणार कशी? अजूनही वेळ गेलेली नाही. मोदींना रोखायचे असेल तर घरी बसलेल्या, वाट चुकलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे लागेल. कार्यकर्त्यांना सन्मान द्या. उमेदवार बदला. १५ वर्षांपासून तेच-तेच चेहरे पाहून लोक कंटाळले आहेत. नवे चेहरे द्या. गाडी घरी ठेवून पायी चालावे लागेल. झोपडपट्ट्यांमध्ये फिरावे लागेल. मेवादलातून सेवादलात यावे लागेल. आपल्या संस्था बाजूला ठेवून काँग्रेसला वेळ द्यावा लागेल. लक्षात ठेवा! यापुढे गांधी परिवारातला कुणी फरिश्ता तुमच्यासाठी ‘व्होट बँक’ आणून देणार नाही. तुमची मतं तुम्हालाच जमवावी लागतील; पण एवढे कष्ट करणार कोण? त्यापेक्षा हरणे त्यांना परवडते. हरलेल्यांना प्रमोशन मिळते. हरले म्हणजे भाव वाढतात. माणिकराव ठाकरे विधानसभा हरले, हायकमांडने त्यांना डायरेक्ट प्रदेश अध्यक्ष करून टाकले. आपल्या गावात निवडून येऊ शकत नाहीत ते ठाकरे गेली पाच वर्षे इतरांना तिकिटे वाटत-कापत आले. कशी वाढणार काँग्रेस? काय म्हणून लोकांनी निवडून द्यायचे? पुन्हा मंत्रालयात बसायचे असेल तर काँग्रेसला कात टाकावी लागेल.
(लेखक हे राजक