अभिनंदन व चिंतन

By Admin | Updated: May 17, 2014 13:15 IST2014-05-17T12:56:38+5:302014-05-17T13:15:15+5:30

दहा वर्षांच्या कालावधीनंतर देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता हक्काच्या बहुमतानिशी येत आहे.

Congratulations and contemplations | अभिनंदन व चिंतन

अभिनंदन व चिंतन

दहा वर्षांच्या कालावधीनंतर देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता हक्काच्या बहुमतानिशी येत आहे. नरेंद्र मोदी हे या आघाडीचे पंतप्रधानपदाचे पट्टाभिषिक्त उमेदवार असून त्यांच्या लोकप्रियतेची लाटच या आघाडीच्या विजयाला कारणीभूत झाली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांत या आघाडीने मिळविलेला विजय नेत्रदीपक म्हणावा असा आहे. शिवाय तिला देशाच्या अन्य क्षेत्रांतही मोठा जनाधार मिळाला आहे. मोदींचे व्यक्तिमत्त्व त्या पक्षाच्या पूर्वीच्या पंतप्रधानांहून, वाजपेयींहून वेगळे आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गुजरातवर एकहाती व एकछत्री राज्य केले आणि ते करताना त्यांनी पक्षाच्या कोणत्याही नेत्याला विश्‍वासात घेतल्याचे कधी दिसले नाही. पक्षाच्या राष्ट्रीय बैठकांकडेही ते क्वचितच फिरकायचे. आताच्या निवडणुकीतील प्रचारही त्यांनी एकहाती केला व तो यशस्वीही करून दाखविला. एकट्याने निर्णय घेणार्‍या व एकट्याने सार्‍यांना समोर नेण्याची धारणा असणार्‍या महत्त्वाकांक्षी पुढार्‍यांची मानसिकता अशी असते आणि तोच यापुढे देशाएवढा भाजपा व संघाच्याही काळजीचा विषय राहणार आहे. ‘आपण सार्‍यांना सोबत घेऊ’ ही मोदींची अलीकडची भाषा त्यांच्याविषयीची आस्था व अपेक्षा वाढविणारी असली तरी ती खरी ठरायला त्यांची तशी पावले पडलेली दिसावी लागणार आहेत.. मात्र, मोदींचा हा विजय साधा नाही. १९२५ मध्ये स्थापन होऊन १९५२ मध्ये राजकारणात उतरणार्‍या रा.स्व. संघाने प्रचंड परिश्रम व चिकाटी यांच्या बळावर आपले सार्मथ्य वाढविले व १९९९ मध्ये वाजपेयी-अडवाणींच्या रूपात दिल्लीची सत्ता काबीज केली; परंतु वाजपेयींचा उदारमतवाद संघाच्या एकारलेपणाशी जुळणारा नसल्याने संघाला त्यांच्याविषयी आरंभी दिसलेले आपलेपण पुढे उरल्याचे दिसले नाही. गुजरातमधील दंगलीच्या वेळी वाजपेयींनी मोदींना फटकारले तेव्हाही संघाचे हे अस्वस्थपण उघड झालेलेच देशाला दिसले. आता वाजपेयी नवृत्त आणि अडवाणी बाजूला असून संघाला हव्या तशा वृत्तीचे मोदीच दिल्लीत सरकार स्थापन करणार आहेत. देशाच्या राजकारणात ती नेहरूंच्या समाजवादी उदारमतवादाऐवजी उजवे धार्मिकपण आणू शकणारी आणि त्याच्या सामाजिक बदलांवर संघाला हवा तसा परिणाम करू देणारी आहे. 

टी. एस. कुन्ह या तत्त्वचिंतकाने त्याच्या ‘स्ट्रक्चर ऑफ सायंटिफिक रिव्होल्यूशन’ या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे हा बदल साधा नसून सर्वांगीण (प्रॉडिगल) आहे आणि त्याचसाठी ही गोष्ट सार्‍यांच्या कुतूहलाचा विषय होणारी आहे. मोदींना त्यांचा पक्ष जसा गृहीत धरू शकत नाही तसे त्यांना गृहीत धरणे संघालाही फार काळ जमेल असे नाही. नेत्याची महत्त्वाकांक्षा मोठी असली, की त्याला त्याची संघटना हेच ओझे वाटू लागते. मोदींची आजवरची वाटचाल त्यांच्याविषयीचा असा समज अनेकांच्या मनात निर्माण करणारी आहे आणि ती त्यांना दूर करावी लागणार आहे. मोदींच्या या विजयाला काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारची गेल्या दोन वर्षांतली गलथान व भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कलंकित झालेली कारकीर्द जशी कारणीभूत आहे, तशी देशभरच्या माध्यमांनी मोदींच्या वतीने काँग्रेस विरोधाची घेतलेली सुपारीही त्याला कारण ठरली आहे. दहा वर्षे सत्तेवर राहिलेल्या पक्षावर त्याच्या चुका व प्रमाद यांचे येणारे ओझेही मोठे असते. शिवाय त्याचे नेतृत्व नवे आणि सार्‍यांना विश्‍वास वाटावा एवढे अनुभवीही नव्हते. मध्यंतरी झालेल्या पाच विधानसभांच्या निवडणुकांनी मोदींच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला होता. शिवाय देशातील प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसविरोध त्याच्या जुनेपणाने जास्तीचा धारदार झाला होता. मोदींचा करिष्मा, संघाचे परिश्रम, काँग्रेसच्या राजवटीविषयीची निराशा, देशभरच्या बदनाम महंतांनी मोदींच्या गायिलेल्या आरत्या आणि प्रसंगी न्यायालयांनी त्यांच्या कृतींना पक्षपाती वाटावी अशी दिलेली प्रशस्तिपत्रे हे सारेच मोदींच्या बाजूने जाणारे होते. शिवाय मोदींच्या व्यक्तिमत्त्वातील आक्रमकपण लोकांना भावणारे व नवा आशावाद निर्माण करणारेही आहे. लोकशाही हे जनाधाराचे राज्य आहे व तो आधारही जनतेच्या विश्‍वासातूनच येत असतो. या विश्‍वासाचा कौल आता मोदींच्या बाजूने गेला आहे, त्यासाठी त्यांचे अभिनंदन व त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा.!

Web Title: Congratulations and contemplations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.