शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

सांगलीच्या ‘काँग्रेस’चा स्वाभिमान! रविवार - विशेष जागर

By वसंत भोसले | Published: March 17, 2019 12:32 AM

लोकसभेच्या सतराव्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी जे नाट्य सांगलीतील काँग्रेस भवनसमोर घडले तेव्हा या अनुयायांची कीव करावी असे वाटू लागले. काँग्रेसला बळ मिळविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मार्ग पत्करा. तोच मार्ग वसंतदादा पाटील यांचा होता.

- वसंत भोसले -लोकसभेच्या सतराव्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी जे नाट्य सांगलीतील काँग्रेस भवनसमोर घडले तेव्हा या अनुयायांची कीव करावी असे वाटू लागले. काँग्रेसला बळ मिळविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मार्ग पत्करा. तोच मार्ग वसंतदादा पाटील यांचा होता. तो शक्य नसेल तर त्यांच्यात सामील व्हा, आज भाजपशी लढण्याची त्यांची तयारी आहे. तुम्ही कोठे आहात याचे परीक्षण करा. काँग्रेस भवनाला टाळे ठोकून प्रश्न कसा सुटेल?जागर या सदरात सांगलीच्या राजकारणावर अनेक वेळा लिहिण्याचा योग आला आहे. शिवाय ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्तही लिहिले होते. त्यावेळी वसंतदादांचे वर्णन ‘अफाट आणि बंडखोर वसंतदादा’ असे केले होते. दुसऱ्यांदा त्यांच्या अनुनयांवर लिहिताना म्हणावे लागले होते की, ‘दादा, आम्हाला माफ करा.’लोकसभेच्या सतराव्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी जे नाट्य सांगलीतील काँग्रेस भवनसमोर घडले तेव्हा या अनुयायांची कीव करावी असे वाटू लागले. ते म्हणतात की, सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. हा लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यास आमचा विरोध आहे. तो असायलासुद्धा हरकत नाही; पण लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. ती होणार हे पाच वर्षांपूर्वीच ठरले होते.

येत्या २८ मार्च रोजी सांगली लोकसभा मतदारसंघाची अधिसूचना निघेल आणि प्रत्यक्षात अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. काँग्रेस पक्षाकडून लढण्यासाठी कोण पुढे येणार हे स्पष्ट होत नाही. काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत एकच नाव निश्चित करून लढाईची तयारी केली जात नाही. दरम्यानच्या काळात ही जागा खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेण्याची तयारी दर्शविली. खरे तर त्यांचे कौतुक करायला हवे. भाजपविरुद्ध लढण्याची हिंमत दाखवून शेतकरी चळवळीचा विस्तार करण्यास त्यांनी पुढाकार घेतला आहे. ज्या काळात कार्यकर्त्यांचे बळ आणि साधनसामुग्रीचे पाठबळ अधिकच लागते. अशावेळी शेतकरी संघटनेने ही निवडणूक एक चळवळीचा भाग म्हणून लढण्याची तयारी दर्शवावी, हे वेगळेपण आहे. राजू शेट्टी यांच्या हातकणंगले मतदारसंघात एक फलक लावला आहे. तसा तो सांगली-तासगाव रस्त्यावरील कवठेएकंद गावच्या चौकातही लावला आहे. त्यावर म्हटले आहे की, ‘आम्ही पैसे वाटत नसतो, पैसे मिळवून देतो.’शेतकऱ्याला चार पैसे मिळवून देणारी सहकार चळवळ ज्या वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात रुजविली, वाढविली, तिला आकार दिला. त्याच वाटेने जाणारा हा संदेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. आज हातकणंगले या मतदारसंघातील अनेकजण हजारांपासून लाखो रुपयांपर्यंतचा निधी राजू शेट्टी यांच्या झोळीत जमा करू लागले आहेत.

हा आकडा कोटीत गेला तरी आश्चर्य वाटायला नको. शेतकरी चळवळीने उसाला चार अधिकच पैसे मिळवून देण्यासाठी हातात दांडके घेऊन रस्त्यावर आंदोलने केली म्हणून ऊस उत्पादकांना चांगले दिवस आले, याबाबत कोणत्याही शेतकऱ्यांच्या मनात शंका नाही. म्हणून तर ज्या हातकणंगले मतदारसंघात एकवीस साखर कारखाने आहेत, तेथील शेतकरी भरभरून मते राजू शेट्टी यांना देत राहिला आहे. त्यांच्या विरोधात लढणे आता शक्य नाही कारण शेतकºयांनीच निर्णय घेऊन टाकला आहे, असे ठाम मतबनल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडे देऊन टाकली. आपली माघार घेतली. यावेळी काँग्रेसनेही माघार घेऊन टाकली आहे. आम्ही या शेतकºयांच्या चळवळीबरोबर जाणार असल्याचाच एकप्रकारे संदेश देऊन टाकला आहे.

सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर हुकमत गाजविणारे वसंतदादा पाटील आणि त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा संदेशही काय होता? त्यांची वाटचाल काय दर्शवीत होती. लोकसभेची ही सतरावी निवडणूक आहे. यापूर्वी सोळा झाल्या. दोनवेळा सांगली मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. (१९८३ मध्ये वसंतदादा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला. त्या पोटनिवडणुकीत श्रीमती शालिनीताई पाटील निवडून आल्या. २००६ मध्ये खासदार प्रकाशबापू पाटील यांचे निधन झाले. त्या पोटनिवडणुकीत प्रतीक पाटील निवडून आले.) या दोन पोटनिवडणुकांसह आजवर अठरा निवडणुका झाल्या. त्यात १९५७ मध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे अ‍ॅड. बाळासाहेब पाटील यांनी काँग्रेसचे व्यंकटराव पवार या विद्यमान खासदारांचा पराभव केला होता. तो अपवाद वगळला तर २०१४ पर्यंत काँग्रेस या मतदारसंघात कधी पराभूतच झाली नाही. दगडाला उमेदवारी द्या नाही तर गाढवाला उभे करा, सांगली जिल्ह्यातील मतदार काँग्रेसलाच मते देणार असा अलिखित पायंडाच पडला होता. त्याच्या मागे वसंतदादा पाटील यांनी शेतकºयांसाठी सहकाराच्या माध्यमांतून केलेली चळवळच होती.

याच जोरावर त्यांनी महाराष्ट्राचे चारवेळा नेतृत्व केले. काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष होते. राजारामबापू पाटील, गुलाबराव पाटील आणि शिवाजीराव देशमुख यांनीही महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष म्हणून केले होते. गावागावांत काँग्रेसचे बळ होते. तालुक्यात होते आणि जिल्हा काँग्रेसमय होता. एखादी निवडणूक लागली की, काँग्रेस भवनाला जत्रेचे स्वरूप येत होते. अन् आज त्या काँग्रेस भवनात कोणी नाही. त्याला टाळे ठोकण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. एवढीच का जमेची बाजू? ही वेळ का आली? वसंतदादा, आम्हाला, माफ करा, असे म्हणण्याची वेळ का आली? ती दादांची शेतकºयांच्या प्रति असलेली चळवळ कोठे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतमालाला भाव द्या, उसाला वाजवी दर द्या म्हणून चळवळ करते. सहकारी साखर कारखानदारी त्यासाठीच होती. तिचे संस्थापक हे शेतकºयांचे नायक होते. त्या नायकांचे अनुयायी खलनायक कधी बनले.सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हातात फलक घेऊन काँग्रेस भवनाच्या पायºयांवर उभे राहिले म्हणजे तो बालेकिल्ला होत नाही. ती लोकांच्या बरोबर काम करण्याची ऊर्मी कोठे आहे? वसंतदादा पाटील यांनी स्थापन केलेल्या सहकारी संस्थांची अवस्था काय आहे? त्यांनी ताकारी, म्हैसाळ, आदी उपसा जलसिंचन योजनांची देणगी जिल्ह्यातील शेतकºयांना दिली, त्या योग्य चालतात का? त्या पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची होती? संपतनाना माने, मोहनशेठ कदम आणि आनंदराव मोहिते यांच्यानंतर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारा खांदा एकाने तरी दिला का? काँग्रेस भवन चालविताना दमछाक होते, तेथे बालेकिल्ला कसा सांभाळणार आहात?

आजचे भाजपचे आव्हान हे काँग्रेसच्या नाकर्तेपणातूनच तयार झाले आहे. संजयकाका पाटील कोण आहेत, शिवाजीराव नाईक कोणत्या पक्षाच्या मुशीतून नेते झाले आहेत? सुरेश खाडे कोणत्या विचारांचे होते आणि जतचे विलासराव जगतापही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडवातच वावरत होते ना? चारपैकी केवळ सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ संघ परिवाराचे आहेत. जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या हाती गेली. ते हात काँग्रेसच्या घराण्यात तयार झालेल्या नेत्यांच्या मुलांचेच आहेत. १९९५ मध्ये राज्यात काँग्रेस अंतर्गत संघर्षातून शिवसेना-भाजपचे सरकार महाराष्ट्रात आले. तेव्हा सांगलीतून पाच अपक्ष आमदार निवडून आले होते. त्यांना शिवसेना किंवा भाजप त्यावेळी उमेदवारी देण्यासाठी (पायघड्या नव्हे) हातापाया पडत होते. पण, सांगली जिल्ह्यातील मतदार अपक्षांच्या उगवत्या सूर्याला मतदान करेल; पण शिवधनुष्य किंवा कमळाला मतदान करीत नाही, म्हणून उमेदवारी नाकारली जात होती. गेल्या पंचवीस वर्षांत काँग्रेसने काय केले म्हणून हा मतदार बदलला? याचे उत्तर कधीतरी शोधणार आहोत की नाही?

झारीतील शुक्राचार्य कोण आहे? हा सवाल उपस्थित करणे सोपे आहे; मात्र त्या शुक्राचार्यांवर मात करण्याची तयारी आहे का? आज कोणीही उमेदवारी घेण्याच्या तयारीत नाहीत. सलग सोळा निवडणुका जिंकणाºया काँग्रेस पक्षाची ही हालत व्हावी, हे लाजिरवाणे आहे. कशासाठी पैसा लागतो. प्रत्येक कार्यकर्त्याच्या दारात गाड्या आहेत. एक नव्हे दोन-चार गाड्या आहेत. उसाचे मळे आहे. द्राक्षांच्या बागा आहेत. गावोगावी पाणी आले आहे. एक-दोन नव्हे डझनभर साखर कारखाने आहेत.

गावोगावच्या कार्यकर्त्यांना वर्गणी गोळा करून ज्या काँग्रेस पक्षाने ही सहकार चळवळ रुजविली, वाढविली आणि त्यावर पालन-पोषण झाले. त्या काँग्रेससाठी खिशातील दोन पैसे खर्च करण्याची तयारी कोणाचीही नसावी? राजू शेट्टींची मालमत्ता कोठे आहे? त्यांनी कोणाचा खिसा कापला आहे? कोणत्या संस्थेत डल्ला मारला आहे? की ज्या पैशाच्या जोरावर ते लोकसभेची निवडणूक लढवितात. ज्या गावात जातील, त्या सभेत जमणाºया लोकांपेक्षा अधिक रुपये त्यांच्या झोळीत मतदार टाकतात. स्वत:च्या गाड्या घेऊन त्यांच्या मागून धावतात. ज्या काँग्रेस भवनाला कुलूप लावण्यासाठी धजावला, त्या भवनाला चिरमुरे-फुटाणे खाऊन काँग्रेसचे कार्यकर्ते काम करीत होते,  हा इतिहास जुना नाही. त्याचे अनेक साक्षीदार कार्यकर्ते आजही सापडतील.

ज्येष्ठ कार्यकर्ते चारूकाका शहा जेव्हा काँग्रेस भवनाचा व्यवहार पाहत होते तेव्हा एका निवडणुकीत प्रदेश काँग्रेस समितीने नवी कोरी जीप मुंबईहून पाठविली होती. ते एकमेव वाहन काँग्रेस भवनासमोर असायचे. आज ग्रामपंचायत सदस्यांपासून जिल्हा परिषदांच्या सदस्यांपर्यंत प्रत्येकजण लाखो रुपयांच्या किमती गाड्या घेऊन येतो. काँग्रेस भवनासमोर गाड्या लावायला जागा कमी पडते. ही समृद्धी पाच वर्षांच्या मोदी सरकारच्या कारभाराने तुमच्या घरात आलेली नाही. अनेक वर्षे काँग्रेसने तळागाळातील लोकांच्या विकासासाठी प्रयत्न केले. संस्था उभारल्या, तुम्हाला शाळा, हायस्कूल, महाविद्यालये दिली. पतसंस्था दिल्या, बँका दिल्या, पाणीपुरवठा योजना करून दिल्या. उपसा जलसिंचन योजना दिल्या. नैसर्गिक आपत्तीत शासनाची तिजोरी खुली केली. बेदाणा बाजार उभा राहावा म्हणून करात सूट दिली. त्यातून तुमचे बंगले उभे राहिले. घरासमोर गाड्या आल्या, मुलं-बाळं शिकली, नोकऱ्यांना लागली, उद्योगधंदे उभे राहिले. व्यापारी-व्यवसाय करू लागला. तासगावचा पूर्व भाग उद्ध्वस्त झाला होता. तो द्राक्षशेतीसाठी कष्टाने उभा करण्यात आला.

आता आटपाडीच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी जाण्याची व्यवस्था होत आली आहे. जतच्या माळावर कृष्णामाईचे पाणी खेळू लागले आहे. हे सर्व पाच वर्षांत घडलेले नाही. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड, बॅ. जी. डी. पाटील, गुलाबराव पाटील, आबासाहेब खेबुडकर, संपतनाना माने, दिनकर आबा पाटील, विठ्ठल दाजी पाटील, आण्णा डांगे, पतंगराव कदम, जयंतराव पाटील, आर. आर. आबा पाटील, शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव नाईक, फत्तेसिंह नाईक, विश्वासराव नाईक, हणमंतराव पाटील, अनिल बाबर, बाबासाहेब देशमुख, विजयसिंह डफळे सरकार, संपतराव देशमुख, शिवाजीराव शेंडगे, अजितराव घोरपडे, शरद पाटील, विष्णूअण्णा पाटील, संभाजी पवार, मोहनराव कदम अशा असंख्य नेतेमंडळींनी कष्ट उपसले आहेत.

काँग्रेसला लढण्यासाठी बळ मिळविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मार्ग पत्करा. तोच मार्ग वसंतदादा पाटील यांचा होता. तो शक्य नसेल तर त्यांच्यात सामील व्हावा, आज भाजपशी लढण्याची त्यांची तयारी आहे. तुम्ही कोठे आहात याचे परीक्षण करा. काँग्रेस भवनाला टाळे ठोकून सर्व दरवाजे बंद करून प्रश्न कसा सुटेल?

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा