आचरण
By Admin | Updated: June 18, 2014 09:55 IST2014-06-18T09:55:10+5:302014-06-18T09:55:10+5:30
हिंदू धर्मात आचाराला फार महत्त्व दिलेले आहे. आचार, विचार व उच्चार हे सर्व एकदुसऱ्यावर अवलंबून आहेत. माणसाचे विचार जसे असतात, त्याप्रमाणे त्याचे वागणे असते.

आचरण
अध्यात्म
ब्रह्मलीन क्षीरसागरमहाराज
हिंदू धर्मात आचाराला फार महत्त्व दिलेले आहे. आचार, विचार व उच्चार हे सर्व एकदुसऱ्यावर अवलंबून आहेत. माणसाचे विचार जसे असतात, त्याप्रमाणे त्याचे वागणे असते. या विश्वामध्ये सुष्टशक्ती व दुष्टशक्ती दोन्ही वास करून आहेत. दोन्हींचा संघर्ष नेहमीच चालू असतो. सुष्टशक्ती ही विधायक शक्ती, तर दुष्टशक्ती ही विनाशक शक्ती आहे. मनुष्य वाईट कृत्ये करण्यास फार लवकर प्रवृत्त होतो; कारण त्यात तत्काळ फायदा दिसत असतो. मनुष्याचा एकदा तोल गेला म्हणजे दुष्टशक्ती त्या मनुष्याचा ताबा घेते. त्याची सारासार विचार करण्याची क्षमता कमी होते. दुष्टशक्तीने ताबा घेतल्यावर, त्याला योग्य निर्णय घेता येत नाही. त्याच्या जीवनात, व्यवहारात प्रगती होत नाही. त्याला योग्य वेळी निर्णय घेता येत नाहीत. त्याच्या खाण्यापिण्यात ताळमेळ राहात नाही व निषिद्ध खाणे आवडते. त्यामुळे त्यांचा विकार बळावतो.
दुष्टशक्तीपासून नेहमी लांब राहण्यासाठी किंवा त्यापासून कायमची मुक्ती मिळविण्यासाठी सतत ईश्वर-स्मरण हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. सतत नामस्मरणाने एक प्रकारच्या विधायक शक्ती-लहरी निर्माण होऊन दुष्टशक्तींची पकड कमी कमी होत जाते. मनुष्याच्या मनामध्ये चांगले विचार येऊ लागतात. चांगले विचार स्थिरावण्यासाठी चांगल्या आचरणाची आवश्यकता आहे. आचरण म्हणजे केवळ चांगले वागणे नव्हे तर मनातले विचारदेखील शुद्ध व सात्त्विक असणे होय. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे. प्रत्येकाला स्वत:चे दोष लक्षात येतात व मान्यही होतात. या दोषांतून मुक्त होण्याचा सातत्याने विचार केला गेला पाहिजे व त्याप्रमाणे प्रयत्नाला लागले पाहिजे. चांगले आचार आणि विचार हे नेहमी संस्काराधिष्ठित असतात. चांगल्या आचारांपासून दूर नेणारे कार्यक्रम पाहू नयेत. पुस्तकांचे वाचन करताना धार्मिक पुस्तकांचे वाचन करणे केव्हाही चांगले. तारतम्याने विचार करून योग्य मित्र निवडावेत व त्यांना जवळ करावे. नेहमी चांगल्या विचारांच्या मित्रांच्या संगतीत राहावे म्हणजे वाईट ऐकण्याचा प्रसंग येणार नाही.
एक नियम लक्षात ठेवावा, ‘प्रवृत्तीतून निवृत्ती येत असते.’ कुणीही व्यक्ती चिरकाल तरुण राहू शकत नाही. ती काही दिवसांनी वृद्ध होणारच. राजकारणी असो, उद्योगपती असो किंवा सामान्य व्यक्ती असो ती काही दिवसांनी म्हणणारच. ‘बस, आता पुरे झाले.’ परंतु, त्यांच्यापुढे आचरण करून प्रगती करता येणे अवघड होईल. कारण मानवी देहाला हळूहळूच शिकवावे लागते. म्हणूनच आतापासूनच शरीराला, मनाला, बुद्धीला फार ताण न देता आमच्या उपदेशाप्रमाणे आचरण ठेवावे.
व्यवहारातले वागणे नम्रतेचे असावे. शुद्ध व सात्त्विक आहार असल्यास मनातदेखील शुद्ध व सात्त्विक विचार येतात. आपल्या वागण्यात बदल होण्यासाठी संतांचा सहवास महत्त्वाचा व उपयुक्त असतो. तुमच्या शुद्ध आचरणामुळे अथवा दृढ भाव निर्माण झाल्यामुळे तुमच्यावर ज्या वेळेला सद्गुरूंची कृपा होते, त्या वेळेला विरुद्ध विचारांच्या व्यक्ती तुमच्यापासून आपोआप दूर होतात व तुमच्या प्रगतीचा मार्ग सोपा होतो.