‘ कोडियाचे गोरेपण..’
By Admin | Updated: May 26, 2014 09:54 IST2014-05-26T09:51:47+5:302014-05-26T09:54:13+5:30
'कोडियाचे गोरेपण, तैसे अहंकारी मन’ असे अहंकारी वृत्तीचे वर्णन संतश्रेष्ठ तुकोबारायांनी करून ठेवले आहे. कोडाने लाभणारे गोरेपण हा सौंदर्याचा नसून आजाराचा व विकाराचा भाग आहे.

‘ कोडियाचे गोरेपण..’
>'कोडियाचे गोरेपण, तैसे अहंकारी मन’ असे अहंकारी वृत्तीचे वर्णन संतश्रेष्ठ तुकोबारायांनी करून ठेवले आहे. कोडाने लाभणारे गोरेपण हा सौंदर्याचा नसून आजाराचा व विकाराचा भाग आहे. पण तो तसा समजून न घेता त्याचेच अहंपण मिरविण्याची वृत्ती एखाद्यात असेल तर ती जेवढी हास्यास्पद तेवढीच केविलवाणीही होते. त्यातही देशाला योग शिकवायला निघालेल्या १५00 कोटीच्या रामदेवबाबाला अशा अहंतेने पछाडले असेल आणि ‘मनात आणले तर मी देशाचा पंतप्रधानही होईन’ असे तो म्हणू लागला असेल, तर योगामुळे माणसाला अहंकारावर विजय मिळविता येत नाही काय, हा प्रश्न आपण प्रत्यक्ष भगवान पतंजलीलाच विचारला पाहिजे. तुम्ही मंत्रिपदामागे आहात काय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता रामदेवबाबाने मनात आणले तर मला कधीही पंतप्रधान होता येईल, असे सार्यांची करमणूक करणारे उत्तर दिले आहे. ते त्यांच्यापुरते मात्र खरे व मनापासूनचे उत्तर आहे. अशी मने आणि त्यांची अशी अभिव्यक्ती हाच खरा तर आताच्या काळातला समाजाच्या व देशाच्या चिंतेचा विषय आहे. योगाभ्यासाच्या वर्गाला तिकिटे काढून येणार्यांचा वर्ग हा आपला अनुयायी व मतदार आहे, असे या बाबाला वाटत असेल किंवा त्याने दिल्लीत केलेली नौटंकी पाहायला संध्याकाळी जमा होणारा वर्ग हा आपल्यामागे कार्यकर्ता म्हणून येणार आहे असे त्याच्या मनात आले असेल, तर त्याचे मन हा आपल्या व खर्या योग्यांच्याही चिकित्सेचा विषय झाला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या बाजूने प्रचाराला निघालेल्या या बाबाची मजल ‘या निवडणुकीनंतर सोनिया गांधी इटलीत आणि राहुल व प्रियंका तुरुंगात पाहावी लागेल’ असे म्हणण्यापर्यंत गेली. पुढे जाऊन राहुल गांधींचे दलितवस्तीतील वास्तव्य हनिमूनसाठी असते, असा अभद्र साक्षात्कार त्याला झाला. त्याचा हा वेडेपणा त्याच्या खर्या अर्थानिशी समजून घेण्याऐवजी त्याला थेट महात्मा गांधी आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या रांगेत नेऊन बसवण्याचे एक पातक अरुण जेटलींनीही केले. कायदेपंडित असणार्यांना आणि संसदेत दीर्घकाळपर्यंत काम केले असणार्यांना एखाद्याचा साधा मूर्खपणाही कसा लक्षात येत नाही, याचे याएवढे ठळक व आपल्या अनुभवाच्या कक्षा वाढवणारे उदाहरण दुसरे नसेल. अवघ्या दहा वर्षांत दूरचित्रवाहिनीच्या माध्यमाने गावोगावी पोहोचलेला आणि यौगिक आसनांनी लोकांच्या तब्येती दुरुस्त करण्याचा दावा करणारा हा बाबा एक दिवस ‘शुद्ध देहात शुद्ध मन आणि शुद्ध मनाचा शुद्ध देश’ असे म्हणत देशाचे राजकारणच दुरुस्त करायला निघाला. प्रथम त्याने अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची कास धरली. मात्र, हजारे हे असे ठाम, की त्यांनी या बाबाला त्या आंदोलनाचे आपल्या हाती असलेले मध्यवर्ती नेतृत्व काही करू दिले नाही. त्यामुळे याची चळलेली महत्त्वाकांक्षा दुखावली आणि तो अण्णांपासून दूर झाला. पुढे त्याने भ्रष्टाचारविरोधी स्वतंत्र आंदोलन सुरू केले. त्याची परिणती पोलिसांचा छापा पडण्यात आणि या बाबाने बाईचे लुगडे नेसून पळ काढण्यात झाली. एवढी सारी नाचक्की झाल्यानंतरही या बाबाला प्रचारयंत्रणेत सामील करून घेण्याची बुद्धी मोदींच्या संघ परिवाराला झाली आणि त्याचे ते ‘हनिमून फेम’ भाषण होईपर्यंत ती टिकली. नंतर मोदींनी आणि संघानेही त्याच्यावर भाषणबंदी लादली व त्याला कुठेही न जाण्याचे व न बोलण्याचे आदेश दिले. आता निवडणुकांचे निकाल लागले आणि मोदी देशाचे पंतप्रधानही झाले. हे वातावरण आपल्या यौगिक उंडारण्याला अनुकूल असल्याचे वाटल्यावरूनच कदाचित रामदेवबाबाने पुन्हा एकवार सार्वजनिक जीवनात अशा उड्या मारायला सुरुवात केली असावी. त्याची पहिली उडीच त्याने पंतप्रधानपदावर मारली व आपण पंतप्रधान कधीही होऊ, एवढेच नव्हे तर ते होण्याची आपली लायकी आहे, असेही त्याने त्याच्या अनुयायांना व देशाला सांगितले आहे. हा प्रकार मोदींची मानहानी करणारा आणि देशाच्या राजकारणाला हिणविणारा आहे. राजकारण, समाजकारण वा देशकारण यापैकी कशाशीही संबंध नसणारा आणि योगाचे शिकवणी वर्ग चालविणारा एखादा बाबा मी तुमचा पंतप्रधान होईन, असे सव्वाशे कोटींच्या देशाला सांगू लागला, तर त्याची गणना वेडाचार्यांतच करावी लागेल की नाही? रामदेवबाबा, आसाराम किंवा श्री श्री ही माणसे निवडणुकीनंतर त्यांची उपयुक्तता संपून तशीही अडगळीत गेली आहेत. त्यांच्या विधानांना आणि वक्तव्यांना फारसे महत्त्व देण्याचे कारण नाही. पण समाजाला व देशालाही करमणूक आवडते. त्यासाठी त्यांना विदूषकही भावतात. रामदेवबाबाच्या मनातील पंतप्रधानकीचे स्वप्न अशाच एका विदूषकी वावदुकीसारखे आपण पाहायचे आहे.