चीनचा तिळपापड

By Admin | Updated: May 6, 2016 05:17 IST2016-05-06T05:17:35+5:302016-05-06T05:17:35+5:30

अरुणाचल प्रदेश भारताचे अविभाज्य अंग असल्याच्या आशयाच्या, अमेरिकेचे भारतातील महावाणिज्यदूत क्रेग हॉल यांच्या वक्तव्यामुळे चीनचा चांगलाच तिळपापड झाला आहे.

China's Tilapand | चीनचा तिळपापड

चीनचा तिळपापड

अरुणाचल प्रदेश भारताचे अविभाज्य अंग असल्याच्या आशयाच्या, अमेरिकेचे भारतातील महावाणिज्यदूत क्रेग हॉल यांच्या वक्तव्यामुळे चीनचा चांगलाच तिळपापड झाला आहे. भारताशी चांगले संबंध हवे असल्याचे वारंवार सांगणारा चीन अरुणाचल प्रदेशवरील दावा सोडायला अजिबात तयार नाही. त्यामुळे क्रेग हॉल यांचे वक्तव्य चीनच्या पचनी पडणे शक्यच नव्हते. आपण यासंदर्भात अमेरिकेकडून स्पष्टीकरण मागविणार असल्याचे चीनने जाहीर केले आहे. वास्तविक क्रेग हॉल यांनी मांडलेली अमेरिकेची भूमिका नवी नाही. पार १९६२ मधील भारत-चीन युद्धापासूनच अमेरिकेने ती वेळोवेळी मांडली आहे. मॅकमोहन रेखा हीच भारत व चीनदरम्यानची सीमारेखा असल्याचे अमेरिका मानते. यापूर्वी डिसेंबर २०१२मध्ये अमेरिकेच्या भारतातील तेव्हाच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांनीही हीच भूमिका मांडली होती. दिल्ली, बीजिंग आणि वॉशिंग्टनदरम्यानच्या त्रिकोणी संबंधांमधील गुंतागुंत लक्षात घेतली, तर क्रेग हॉल यांच्या वक्तव्यावर चीनकडून एवढी तीव प्रतिक्रिया उमटणे अजिबात आश्चर्यकारक नाही; कारण तिसऱ्या देशाचा संबंध असलेल्या एखाद्या विषयावर एखाद्या देशाची विशिष्ट भूमिका असणे व त्या देशाने ती जाहीररीत्या मांडणे यामध्ये फरक असतो आणि चीन तो फरक चांगलाच ओळखतो ! गत काही वर्षांपासून भारत व अमेरिकेदरम्यानच्या संबंधांमध्ये झालेली सुधारणा आणि विशेषत: गत काही दिवसांमध्ये त्यामध्ये निर्माण झालेली प्रगाढता, याचा कुठे ना कुठे तरी थेट आपल्याशी संबंध असल्याचे न समजण्याएवढा चीन दूधखुळा नाही. या तीनही देशांदरम्यानच्या संबंधांना, त्यांच्या महत्त्वाकांक्षांची आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या असूयेची किनार आहे. अमेरिकेला जगातील एकमेव महासत्तेचा खिताब टिकवून ठेवायचा आहे, चीनला सोव्हिएट रशियाच्या पाडावामुळे रिक्त झालेली दुसऱ्या महासत्तेची जागा व्यापण्याची घाई झाली आहे, तर भारतालाही महासत्ता होण्याची आस लागली आहे. त्यातून संघर्ष होणे आणि गरज पडेल तिथे दुसऱ्या कुणाची तरी मदत घेतल्या जाणे स्वाभाविकच आहे. सध्या अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीत चीनला प्रत्येक आघाडीवर रोखायचे आहे. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या पुरातन काळापासून चालत आलेल्या न्यायानुसार अमेरिका भारताला जवळ करीत आहे. चीनच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी भारतालाही जागतिक पटलावर मजबूत आधार हवाच आहे. त्यामुळे भारतही अमेरिकेच्या अधिकाधिक जवळ जात आहे. वास्तविक सीमा विवाद सोडवून आणि परस्पर विश्वास वृद्धिंगत करणारी पावले उचलून, चीन भारताशी मैत्री करू शकला असता; पण त्या देशाची राक्षसी महत्त्वाकांक्षा त्यामध्ये आड येते. त्यामुळेच भारत असो, जपान असो वा व्हिएतनाम, गत काही काळापासून चीनवर तिळपापड करून घेण्याची वेळ वारंवार येत आहे आणि यापुढेही येतच राहणार आहे!

Web Title: China's Tilapand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.