आपला सहभाग असलेला एखादा मोठा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला की कौतुकाच्या केंद्रस्थानी आपण असलेलं प्रत्येकालाच आवडतं. पण, प्रकल्पाचं यश हे संपूर्ण टीमचं आहे, माझं अवास्तव कौतुक करु नका, मला माझं काम करू द्या आणि माझ्या खासगीपणाचा आदर करा, असं सांगणारी माणसं मात्र दुर्मीळ असतात. डॉ. माधवी लता यांचं नाव अशा दुर्मीळ माणसांच्या यादीत घेतलं जायला हवं.
नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन केलं. त्या पुलाच्या बांधणीत ज्या अनेकांनी मोलाचं योगदान दिलं, त्यातलं प्रमुख नाव म्हणजे डॉ. माधवी लता. डॉ. माधवी लता या बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. चिनाब पूल उभारणी प्रकल्पात गेली १७ वर्षे भू-तंत्रज्ञान सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलं. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक. जिओटेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये सुवर्ण पदक पटकावत एम. टेक. आणि नंतर आयआयटी मद्रासमधून त्याच विषयात डॉक्टरेट असा डॉ. माधवी लता यांचा प्रवास आहे.
चिनाब पुलाच्या उद्घाटनानंतर सर्वत्र डॉ. माधवी लता यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आणि ते स्वाभाविकही आहे. मात्र, त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टमधून त्यांचं वेगळेपण अधोरेखित होत आहे. “चिनाब पुलाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. हा पूल हे स्थापत्य अभियांत्रिकीतील आपल्या प्रगतीचं द्योतक आहे, त्यामुळे त्याबद्दल सर्व भारतीयांचं अभिनंदन! या पुलाचं नियोजन, आरेखन आणि बांधणीचं संपूर्ण श्रेय हे भारतीय रेल्वे आणि ॲफकॉन्स इन्फ्राचं आहे. माझा त्यात खारीचा वाटा आहे, म्हणूनच मला गरजेपेक्षा जास्त ‘फेमस’ करु नका. या पुलाच्या यशस्वी उभारणीत योगदान दिलेल्या हजारो व्यक्तींपैकी मी एक आहे, हे लक्षात ठेवा” असं आवाहन डॉ. माधवी लता यांनी केलं आहे.