कॅपॅसिटरचा कृषिपंपावर उपकारक परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 05:44 AM2019-08-30T05:44:42+5:302019-08-30T05:45:59+5:30

कृषिक्षेत्रातील नवनव्या तंत्रज्ञान आणि उपकरणांमुळे क्रांती होत आहे.

Capacitors have a beneficial effect on agriculture | कॅपॅसिटरचा कृषिपंपावर उपकारक परिणाम

कॅपॅसिटरचा कृषिपंपावर उपकारक परिणाम

Next

कृषिक्षेत्रातील नवनव्या तंत्रज्ञान आणि उपकरणांमुळे क्रांती होत आहे. अनेक संशोधक यासाठी परिश्रम घेत असतात. मात्र काही वेळा गैरसमजामुळे अथवा अन्य कारणांमुळे तंत्रज्ञान अथवा साधनांचा पुरेसा वापर केला जात नाही. परिणामी एखादी सरकारी योजनाही अपेक्षित यश मिळवू शकत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी याबाबतचे तंत्र जाणून घेत शेतीसाठी त्याचा वापर केला पाहिजे.


महावितरणकडे दरवर्षी सुमारे दीड लाख कृषिपंप जोडणीसाठी अर्ज येतात. या अर्जांची पूर्ती करायला गेल्या तीन वर्षांत (२0१६-२0१९) शासनाकडून काही नवीन योजना राबविण्यात आल्या. सन २0१६ मध्ये सौरऊर्जायुक्त पंप योजनेच्या अंतर्गत ३ ते ७ लाख रुपयांच्या किमतीचे सौर पंप १५ ते ७0 हजार रुपये भरून शेतकऱ्यांना घेता येत होते. परंतु त्यानंतर दहा वर्षांसाठी वीज पंपाच्या जोडणीसाठी अर्ज करायला मनाई करण्यात आली होती. या कारणास्तव: तसेच शेतातील सुरक्षिततेची जोखीम आणि आधुनिक तंत्रज्ञानाने चालणाºया या पंपात बिघाड झाला तर दुरुस्तीसाठी जाणकार तंत्रज्ञ मिळण्याची अनिश्चितता यामुळे शेतकºयांमध्ये ही योजना मूळ धरू शकली नाही.


दुसरीकडे २0१८ मध्ये शासनाने उच्च वीजदाब वितरण प्रणालीद्वारे दोन वर्षांच्या आत, सुमारे २.२५ लाख कृषिपंपांना जोडणी देण्याची मंजुरी दिली. या प्रणालीच्या वापराने पंपाला शाश्वत वीजदाब मिळतो. परंतु योजनेअंतर्गत वीज जोडणीचा खर्च प्रतिसंच २.५ लाखांपेक्षा कमी असावा अशी अट ठेवली. परंतु प्रत्यक्षात येणारा खर्च निर्धारित रकमेपेक्षा अधिक असल्याकारणाने आजपर्यंत फक्त ३0 हजार जोडण्या देण्यात आल्या आहेत. अजूनही सुमारे २.६ लाख कृषिपंपांसाठी वीज-जोडणीचे अर्ज प्रलंबित आहेत. मार्च २0१८ मध्ये महावितरणने अर्ज स्वीकारणे बंद केले आणि शेतकºयांना सौर पंप घेण्यासाठी उद्युक्त करावयास सुरुवात केली. कृषिपंपांना वीजपुरवठा करणाºया वीजजाळ्याची, अर्थात वाहिन्या आणि ट्रान्सफॉर्मर्सची मर्यादित उपलब्धता हे त्यामागचे कारण असण्याची शक्यता आहे. अशा वेळी कृषिपंप वीजजाळ्याची क्षमता वाढविण्यासाठी कॅपॅसिटरचा वापर महत्त्वाचा व सोपा उपाय ठरू शकतो.


कॅपॅसिटर वापरण्याने पंपांची क्षमता कमी न होता विद्युतप्रवाह घटतो. विद्युतप्रवाह घटायचे अनेक फायदे आहेत. यामुळे ट्रान्सफॉर्मरमधे बिघाड होण्याचे प्रमाण कमी होते व वीजजाळ्याच्या उपलब्धतेत वाढ होते व शाश्वत वीजदाब मिळाल्याने पंपांमध्ये बिघाडाचे प्रमाण कमी होऊन ऊर्जेची थोडीफार बचत होते. वाढलेल्या क्षमतेमुळे १0-२0 टक्के अधिक पंपांची जोडणी होऊ शकते.
एच.पी.प्रमाणे एका पंपासाठी १५0 ते ४५0 रुपयांपर्यंतचा कॅपॅसिटर पुरेसा आहे. दर्जेदार ब्रॅण्डचा कॅपॅसिटर वापरला तर तो सुमारे दहा वर्षे टिकतो. कॅपॅसिटरचा वापर शेतकरी आणि महावितरण या दोघांसाठीही फायदेशीर असला तरी शेतकºयांमध्ये कॅपॅसिटर वापरासाठी उत्सुकता वा तयारी दिसून येत नाही. असे का, असा प्रश्न पडतो. यासंबंधी थोडे सर्वेक्षण केले असता, शेतकरी, पंप मॅकॅनिक, लाइनमन, वायरमन या साºयांमधील कॅपॅसिटर वापराविषयीचे अज्ञान व विविध गैरसमज याला कारणीभूत असल्याचे आढळून आले. कॅपॅसिटरची एक महत्त्वाची गुणवत्ता आहे. ट्रान्सफॉर्मरला जोडलेले १५ ते २५ जितकेही पंप असतील, त्यातल्या जास्तीत जास्त पंपांवर कॅपॅसिटर बसवला, तर त्याचा फायदा सगळ्यांना मिळतो. पाण्याच्या माठात जसा एक एक खडा टाकून पाण्याची पातळी थोडी वाढते. पण जास्त खडे टाकल्यास लक्षणीय वाढ होते, तसेच एक एक पंपावरील कॅपॅसिटरमुळे, ट्रान्सफॉर्मरच्या पूर्ण वीजजाळ्यात अधिक सुधार येतो. आयआयटीच्या ग्रामीण क्षेत्र वैकल्पिक प्रोद्यौगिकी केंद्राने सांगली, सोलापूर, नांदेड, बुलडाणा या जिल्ह्यांत कृषिपंपावर कॅपॅसिटरचा वापर करण्यासाठी एक वर्षाचा प्रकल्प कार्यान्वित केला. या अंतर्गत सुमारे ६0 ते ८0 शेतकºयांच्या पंपांवर कॅपॅसिटर बसविले. एका वर्षानंतर या प्रकल्पात सहभागी झालेले शेतकरी बहुतांशी संतुष्ट आढळले.


सोलापूर जिल्ह्यात वर्षातून ३-४ वेळा बंद पडणारा ट्रान्सफार्मर कॅपॅसिटरच्या वापरानंतर एकदाही नादुरुस्त झाला नाही. परंतु प्रकल्पाचा संपूर्ण आढावा घेतल्यावर सोलापूरच्या सहभागी होणाºया ८0 शेतकºयांपैकी ५0 शेतकºयांनी कॅपॅसिटरचा वापर सुरू ठेवला असून ३0 शेतकºयांनी कॅपॅसिटर वापरणे थांबवले असल्याचे लक्षात आले. या ३0 शेतकºयांची अधिक माहिती घेतली असता ७ शेतकºयांच्या पंपात बिघाड आला व तिथली वीजप्रणाली दुरुस्ती करणाºया वायरमनने या बिघाडाचे कारण कॅपॅसिटरचा वापर आहे असे सांगितले. त्यामुळे ७ शेतकरी व त्यांच्या आप्तस्वकीयांनी कॅपॅसिटर वापरणे थांबवले. यामुळे एकंदरीत कॅपॅसिटरच्या वापराविषयी लोकांमध्ये प्रबोधनाची गरज असल्याचे जाणवले. महावितरण व शासन यांनी अधिक जाणीवपूर्वक जनजागृतीचे प्रयत्न केल्यास साºयांनाच याचा लाभ होऊ शकतो. पावर फॅक्टरमध्ये सुधारणा करण्याकरता यंदा महावितरणने औद्योगिक वीज ग्राहकांना सुधारित दर लावले आहेत. कृषिपंपावर कॅपॅसिटरचा वापर केला असता, पावर फॅक्टरमध्ये अधिक सुधारणा होऊ शकते.

प्रा. प्रिया जाधव
साहाय्यक प्राध्यापिका,
आयआयटी, मुंबई

Web Title: Capacitors have a beneficial effect on agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.