भाजपाची ‘अमर’कथा
By Admin | Updated: March 14, 2015 00:40 IST2015-03-14T00:40:39+5:302015-03-14T00:40:39+5:30
महाराष्ट्राचे नवे चित्र राजधानीत चितारले जात आहे. रावसाहेब दानवे यांना प्रदेशाध्यक्षपदावर नेमून राज्याचा सामाजिक तराजू समतोल केल्यानंतर आता पुण्याचे अमर

भाजपाची ‘अमर’कथा
रघुनाथ पांडे -
महाराष्ट्राचे नवे चित्र राजधानीत चितारले जात आहे. रावसाहेब दानवे यांना प्रदेशाध्यक्षपदावर नेमून राज्याचा सामाजिक तराजू समतोल केल्यानंतर आता पुण्याचे अमर साबळे यांना राज्यसभेसारख्या वरिष्ठ सभागृहात पाठवून भाजपाने दलित कार्ड खेळले. शेटजी-भटजींची ही पार्टी सर्वांची व्हावी यासाठी प्रसंगी उच्चवर्णीय दुखावले तरी चालेल, पण दलितोद्धार करण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला रंगपंचमीला रेशीमबागेत पोहोचल्यानंतर अमित शाह यांना देण्यात आला आणि भल्याभल्यांना गच्छंती देत राज्यसभेसाठी साबळे नावाचे दलितकार्ड खेळले गेले. राजकारणात भूकंप झाल्यागत स्थिती झाल्याने दिल्लीत नव्या कथांनी जन्म घेतला. लोकसभेतील बहुमताच्या जोरावर राजकारण मजबूत करण्याचे मोदींचे मनसुबे असले तरी, राज्यसभेतील पक्षीय अल्पसंख्येने नाक ठेचाळते. सरकारच्या प्रतिष्ठेची विधेयके राज्यसभेत कोसळतात. त्यामुळे राज्यसभेतील संख्याबळ वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न मोदी व शाह यांचा सुरू आहे. राज्यसभेतील ही जागा मूळ काँग्रेसची होती. पण महाराष्ट्रातील भाजपाच्या संख्याबळाने ती ‘विनासायास’ भाजपाच्या पदरात पडली. साबळे यांचे नाव भाजपाने जाहीर करताच दिल्लीच्या राजकारणात साबळे प्रकाशझोतात आले. त्यांची राजकीय नाळ जोडली गेली. मुंडे यांच्या तालमीत ते तयार झाल्याचे पुढे आल्याने पक्षाच्या यादीतून बाद झालेल्या काही नावांची चर्चा झडली. जिथे महापालिकेत को-आॅप्ट होण्यासाठी आयुष्य पणाला लागते, तिथे राज्यसभा सदस्यत्व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरील स्वप्नच ठरते. त्यातही झगमगत्या राजकारणाचा स्पर्श भाजपाला झाल्याने साबळे यांची निवड धक्का देणारीच ठरली. भाजपाचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे माजी प्रभारी ओमप्रकाश माथुर, विधान परिषदेची गाडी चुकल्याने दिल्लीच्या निवडणुकीत जीव ओतून पक्षकार्य केलेल्या शायना एन.सी, भाजपाचे सचिव श्याम जाजू, जम्मू- काश्मीरच्या निवडणुकीत पक्षाला सत्तेत आणण्यासाठी धडपडणारे राम माधव आणि महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, औरंगाबादच्या विजया रहाटकर यांना धोबीपछाड देत साबळे यांनी राज्यसभा पटकावल्याने राजकारणात ‘नशीब’ या शब्दाला असलेले अनन्यसाधारण महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. संघ, मोदी, शाह असा प्रवास करत साबळेंच्या नावाचा निर्णय घेऊन पक्षाने धक्कातंत्राचा वापर केला असला तरी ओबामाभेटीनंतर भाजपाच्या श्रीमंतीचे झालेले ‘कोट’कौतुक, दिल्ली निवडणुकीनंतर अहंकाराचे झडलेले इमले, अर्थसंकल्पातून कॉर्पोरेट, धनदांगड्यांना मिळालेला आश्रय, जम्मू-काश्मिरात सत्तेचा सोपान गाठण्यासाठी केलेली विलक्षण तडजोड, भूसंपादन कायद्यामुळे सरकार सामान्यांचे नाही असे सांगण्यास विरोधक समर्थ ठरल्याने आता डागडुजी सुरू झाली आहे. देशपातळीवर ही घटना ठिपक्याएवढी असली तरी दिल्लीच्या वर्तुळातील मोठी नावे या जागेसाठी जिवाचे रान करत होती त्यामुळे भाजपाच्या या ‘अमर’कथेला कैक कंगोरे आहेत. तसे पाहता भाजपाने साबळे यांना राज्यसभा देऊन दलितांच्या राजकीय उन्नतीचे इतर अन्य पक्षांपेक्षा अधिक मोठे कम केले आहे. पूर्वी शिवसेनेच्या गळाला लागलेले रामदास आठवले भाजपाच्या कोट्यातून राज्यसभा सदस्य झाले. त्यांना दानवेंच्या वाट्याचे राज्यमंत्रिपद हवे आहे, त्यामळे पंतप्रधानांची भेट घेऊन कृतकृत्य झाले. एकट्या महाराष्ट्रातून दोन दलित नेते भाजपाने राज्यसभेत पाठविले. पण तरीही आश्चर्य असे, राजकारणात टीकेच्या वळणावर असलेल्या भाजपाला आपली ‘दलितोभिमुख’ होणारी प्रतिमा नीट कॅश करता येत नाही. राज्यसभेच्या अलीकडच्या इतिहासात एकाच राज्यातून दोन दलितांना प्रतिनिधित्व मिळालेले नाही. यापूर्वीच्या राजकीय पक्षांनी दलितोद्धाराचे ढिंढोरे पिटले, पण प्रत्यक्षात निवड केली नाही. साबळेंच्या धक्कातंत्री निवडीची कारणमीमांसा ‘एक दानवे, बाकी जानवे’ अशी हास्यास्पद पद्धतीने भाजपाच्याच गोटातून केली जाते. संघाने खेळलेली ही खेळी खरे तर भाजपाला सामाजिक बळ देणारी ‘अमर’कथा आहे व उत्तरही!!