निर्भय व्हा!
By Admin | Updated: March 6, 2015 23:26 IST2015-03-06T23:26:34+5:302015-03-06T23:26:34+5:30
डॉटर आॅफ इंडिया’ नावाचा हा अनुबोधपट सुमारे तीन वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीत रात्रीच्या वेळी एका युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी घटनेवर बेतलेला आहे.

निर्भय व्हा!
भारतवर्षातील जनसामान्य एव्हाना परिपक्व, प्रागतिक, पुरोगामी आणि विचारी होत चालल्याचे स्पष्टपणाने दिसून येत असताना, याच जनसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारे देशाचे सरकार मात्र अजूनही कमालीचे अपरिपक्व, बुरसटलेले, अधोगामी आणि अविचारी असल्याचे दिसून यावे हा किती मोठा विरोधाभास. हा विरोधाभास उजागर केला आहे तो बीबीसी या इंग्लंडमधील स्वायत्त अशा संस्थेने तयार केलेल्या एका अनुबोधपटाने. ‘डॉटर आॅफ इंडिया’ नावाचा हा अनुबोधपट सुमारे तीन वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीत रात्रीच्या वेळी एका युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी घटनेवर बेतलेला आहे. त्यात भारतातल्या हिंसक पुरुषी मनोवृत्तीवर आघात करण्यात आल्याचे व त्यांच्या पुढ्यात भारतीय मुली किती असहाय्य आणि दुर्बल आहेत, याबाबतचे चित्रण असल्याचे वृत्तपत्रीय मजकुरावरून लक्षात येते. केन्द्र सरकारने सदर अनुबोधपटाच्या प्रदर्शनावर बंदी लागू केलेली असल्याने, जरी तो आजही संगणकीय महाजाळ्यात कोणालाही पाहण्यास उपलब्ध असला तरी, आपण तो पाहिला, अशी कबुली कोणालाही देता येणार नाही. संगणकीय क्रांतीपासून आपले सरकार किती योजने दूर आहे व किती मागास आहे, याचेच हे द्योतक. पण तसे असले तरी सरकार बहुधा संवेदनशील मात्र जरुर असले पाहिजे. कारण हा माहितीपट तयार करु इच्छिणाऱ्या ब्रिटिश महिलेला तिहार कारागृहात जाऊन याच बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगारांची मुलाखत घेण्याची परवानगी सरकारने दिली होती. प्रस्तुत महिला या परवानगीचा गैरवापर करून ती तयार करीत असलेल्या चित्रपटाचा व्यावसाय करणार नाही, अशी सरकारची खात्री होती. ज्या इंग्लंडात बीबीसी घट्ट पाय रोवून आहे, तेथील सरकारला ती जुमानीत नाही व मुद्दलात ती कोणी धर्मादाय संस्था नाही, हे सरकारातील गृह खात्याच्या लोकाना ज्ञात होते वा नाही, हे ज्ञात नाही पण त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला, हा का सरकारचा दोष मानायचा? कदाचित त्यामुळेच जेव्हा बाईनी विश्वासघात केल्याचे उघड झाले तेव्हा सरकारने लगेच तिच्या अनुबोधपटाच्या मुसक्या आवळण्याचे आदेश जारी केले. या आदेशाला आधुनिक काळात कवडीचीही किंमत नाही, हाही सरकारचा दोष नव्हे, असलाच तर तो भाबडेपणा म्हणता येईल. या भाबडेपणाचाच पुढील अंक म्हणजे, आता भारतात कोणीही हा माहितीपट बघत नाही, बघू शकत नाही ही सरकारची धारणा तर याच चित्र-बोलपटाला प्राप्त ख्यातीमुळे ते शोधून काढून पाहणाऱ्यांच्या संख्येत भूमितीय पद्धतीने होत असलेली वाढ. सरकारी बंदी नसताना आणि ती असतानाही ज्यांनी कुणी या महितीपटाचा अनुभव घेतला, त्यांच्या डोळ्यातून म्हणे अखंड अश्रुधारा वाहत होत्या. भले आपल्या देशातील असेल, पण हे उघडे नागडे सत्य जगासमोर गेलेच पाहिजे, प्रतिमा रक्षणाचे फुकाचे ओझे बाळगायचे कारण नाही, हा त्यांचा अभिप्राय म्हणजे प्रागतिकतेची किती मोठी भरारी ! मी नथुराम गोडसे या नाटकातील नथुरामाची भूमिका करणाऱ्या नटाचा अभिनय पाहताना आणि त्याच्या तोंडचे संवाद ऐकतानाही अनेकांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागतात, असे म्हणतात. पण हे अश्रू मात्र नक्राश्रू असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. तद्वतच ‘डॉटर आॅफ इंडिया’मधील वास्तव हे भारतातील वास्तव जीवनातील कठोर सत्य असते आणि ते जगासमोर गेलेच पाहिजे, असा आजच्या प्रागतिक विचारसरणीचा आग्रह असतो, पण त्याचवेळी जागतिक कीर्तीचे बंगाली चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांनी वास्तव न दाखविता भारतातील दारिद्र्य जगाच्या पाठीवर स्वार्थमूलक दृष्टीने विकलेले असते ! पण समाज प्रगत आणि विचारी होत चालला आहे आणि सत्य कितीही कठोर, भीषण आणि अस्वस्थ करणारे असले तरी ते जगासमोर आलेच पाहिजे या विचारांचा पुरस्कार करतो आहे, ही बाब स्वागतार्हच म्हणायची. जेव्हा समाज तसा नव्हता तेव्हा वृत्तपत्रीय बातम्यादेखील अशाच बुजलेल्या, दबलेल्या आणि संकोचलेल्या असत. जातीय दंग्यांचे वार्तांकन करतानाही, विशिष्ट समाज, विशिष्ट धार्मिक स्थळ असे मोघम उल्लेख केले जात असत. आता तसे काही राहिलेले नाही. जर तसे राहिलेले नाही आणि ज्या दुर्दैवी घटनेवर संबंधित माहितीपट आधारलेला आहे, त्यातील युवतीचा स्पष्ट नामोल्लेख निर्मात्या महिलेने केला असता, आजही भारतीय प्रसारमाध्यमे ‘निर्भया’ असाच उल्लेख का करतात हे अनाकलनीय आहे. ज्याप्रमाणे आता तिच्या नावागावासकट आणि छायाचित्रासकट उल्लेख अनिवार्य ठरतो, त्याचप्रमाणे मग अमेरिकेवर झालेल्या घातपाती हल्ल्याचे चित्रीकरण केले गेले नाही, याबद्दल तेथील प्रसारमाध्यमांचे कौतुुक करण्याऐवजी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणेच श्रेयस्कर ठरते. कारण त्यांनी जगाला सत्यापासून वंचित ठेवले होते. जे सत्य आहे, ते जगासमोर आलेच पाहिजे, अशी अत्यंत निर्मळ भूमिका स्वीकारल्यानंतर ग्वाटेमाला येथील तुरुंगातील छळवाद, ईसीसच्या नृशंस हत्त्या आणि जगाच्या पाठीवर जिथे कुठे सत्य घडत असेल ते सारे जगासमोर आलेच पाहिजे. ‘डॉटर आॅफ इंडिया’ हे जसे एक सत्य आहे, तसेच ही सारीदेखील सत्येच आहे. ती निर्भयपणे जगासमोर यावीत म्हणूनच निर्भय व्हा !