हस्तिनापूरचा संग्राम
By Admin | Updated: February 4, 2015 01:30 IST2015-02-04T01:30:01+5:302015-02-04T01:30:01+5:30
निकालासंबंधीचे जे अंदाज व्यक्त होताना दिसत आहेत ते भाजपाला व विशेषत: त्या पक्षाच्या दिल्लीतील मोदी सरकारला अस्वस्थ करणारे आहेत.

हस्तिनापूरचा संग्राम
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीकडे साऱ्या देशाचे डोळे लागले असताना तिच्या निकालासंबंधीचे जे अंदाज व्यक्त होताना दिसत आहेत ते भाजपाला व विशेषत: त्या पक्षाच्या दिल्लीतील मोदी सरकारला अस्वस्थ करणारे आहेत. गेल्या निवडणुकीत सर्वाधिक ३१ जागा जिंकणारा हा पक्ष यावेळी २५ ते ३० च्या दरम्यान थांबेल आणि तीत २८ जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आम आदमी पक्ष ३५ ते ३८ जागांपर्यंत पुढे जाईल असे या अंदाजांचे सांगणे आहे. निवडणूकविषयक अहवाल नेहमीच विश्वसनीय नसतात हे लक्षात घेतले तरी ते मतदारांच्या मानसिकतेवर पुरेसा प्रकाश नक्कीच टाकत असतात. हे अंदाज भाजपातील व प्रत्यक्ष संघ परिवारातील अनेकांना कसे भेडसावत आहेत हेही त्यांच्या मुखपत्रांनी आता प्रकाशित केल्यामुळे ही निवडणूक जास्तीची रोमांचकारी व कुतूहल जागविणारी ठरली आहे. भाजपाने आपले केंद्रातले दीड डझन मंत्री आणि दहा डझन खासदार या निवडणुकीच्या प्रचाराला जुंपले आहेत आणि दरदिवशी आपल्या पुढाऱ्यांची राज्याराज्यातून तो पक्ष करीत असलेली भाषावार आयातही बरेच काही सांगणारी आहे. मागल्या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्यो अरविंद केजरीवालांचे अल्पमतातील सरकार ४९ दिवस टिकले व पुढे त्याने स्वत:च आपल्या अधिकारांचा राजीनामा दिला. केजरीवालांचे तसे करणे दिल्लीच्या मतदारांना आवडले नव्हते. त्यांच्या त्या नाराजीची कल्पना असल्यामुळेच केजरीवाल आता ‘यापुढे राजीनामा नाही’ असे आश्वासन मतदारांना देताना दिसत आहेत. तिकडे दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागा भाजपाने जिंकल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर लागलीच दिल्लीची ही निवडणूक झाली असती तर भाजपाला तीत स्वबळावर बहुमत मिळाले असते असे म्हटले जाते. परंतु ही निवडणूक लांबली आणि ती लांबण्याच्या काळात भाजपाच्या विरोधात जाणाऱ्या अनेक घटना घडल्या. मोदींच्या बळावर दिल्लीतील संघ परिवाराने कमालीचे आक्रमक व धर्मांध धोरण अवलंबिले. दिल्लीच्या चांगल्या वस्तीतील ख्रिश्चनांच्या प्रार्थनास्थळांवर त्या परिवाराने हल्ले चढविले. दिल्ली हे देशाचे प्रतिनिधित्व करणारे आणि सर्व भाषा व धर्माच्या लोकांचे शांततामय शहर आहे. त्यात हा एकारलेपणा सुसंस्कृत मतदारांना आवडणारा नाही. त्यातून भाजपाने आपल्या मुख्यमंत्रिपदाची माळ किरण बेदी या माजी पोलीस अधिकारी महिलेच्या गळ्यात घातली. पोलीस अधिकारी व तिहारच्या तुरुंगप्रमुख म्हणून या बेदींची लोकमानसातील प्रतिमा कितीही चांगली असली तरी नंतरच्या काळात त्यांनी केलेल्या राजकीय व आंदोलनविषयक गमजांनी त्यांना लोकांच्या मनातून पार उतरून टाकले. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या काळात देशातील वरिष्ठ नेत्यांची त्यांनी तेव्हा चेष्टा केली व त्यांच्या नकला करण्याचा जो पोरकट प्रकार केला तो त्यांना थेट गावपातळीवर नेऊन ठेवणारा ठरला. त्याच वेळी भाजपाला या बाईंची गरज का वाटावी हा प्रश्नही महत्त्वाचा झाला. याआधीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने आपल्या नेत्याचे नाव अगोदर जाहीर न करण्याचे पथ्य पाळले होते. त्यामुळे त्या निवडणुका नरेंद्र मोदी विरुद्ध इतर अशा झाल्या. दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने केजरीवालांचे मुख्यमंत्रीपद प्रथमच जाहीर केले होते. परिणामी ही निवडणूक मोदी विरुद्ध केजरीवाल अशी झाली असती. ती तशी होणे आणि तिचा निकाल प्रतिकूल लागणे ही गोष्ट मोदींएवढीच भाजपालाही फार महागात पडणारी होती. मोदींचे नेतृत्व दिल्लीत पराभूत होणे ही बाब साऱ्या देशात एक वेगळा संकेत देणारी ठरली असती. त्या स्थितीत भाजपाने किरण बेदींची पक्षात आयात करून त्यांच्या जुन्या सेवेने त्यांना दिलेल्या प्रतिष्ठेचा वापर करण्याचे धोरण आखले. मात्र आता ते अंगलट येत असल्याचे व बेदींच्या नेतृत्वाचा भाजपाला जराही फायदा होत नसल्याचे संघाच्या मुखपत्रांनीच मान्य केले आहे. बेदीबाई या पक्षाला तारणाऱ्या ठरण्याऐवजी बुडविणाऱ्या ठरतील असेच आता सारे म्हणू लागले आहेत. मतदानाला अजून तीन दिवसांचा वेळ बाकी आहे आणि नव्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता झडू लागल्या आहेत. तसेच सर्व बाजूंनी नव्या आश्वासनांची खैरातही दिल्लीकरांवर पडताना दिसत आहे. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त करून देऊ हे अभिवचन केजरीवालांनी दिल्लीकरांना दिले. तर ते पूर्ण करण्यात संवैधानिक अडचणी असल्याची बाब भाजपाच्या अमित शाह यांनी बोलून दाखविली. या निवडणुकीत पूर्वी आठ जागा जिंकलेला काँग्रेस पक्षही त्याच्या जास्तीच्या सामर्थ्यानिशी उतरला आहे. जाणकारांच्या मते त्याच्या जागा वाढतील ही शक्यता मोठीही आहे. याच काळात संघ परिवाराशी संबंधित विश्व हिंदू परिषदेसारख्या व बजरंग दलासारख्या आक्रमक संघटनांच्या कारवाया वाढल्या आणि स्वत:ला संघाचे म्हणणविणारे आणि भाजपावर अधिकार सांगणारे अनेक साधू, संत, साध्व्या आणि तशाच तऱ्हेचे इतर महंत नको तशा गर्जना करताना दिसले. येत्या दिवसांत हे चित्र बदलणारच नाही असे नाही. मात्र ते एकाएकी ज्यामुळे बदलेल असे कोणते मोठे कारणही सध्या दृष्टिपथात नाही. त्यामुळे साऱ्यांना उत्सुकतेएवढेच दबलेल्या श्वासाने या निवडणूक निकालांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.