बाबासाहेब, ‘आम्ही कृतघ्न’
By Admin | Updated: July 12, 2016 00:02 IST2016-07-12T00:02:56+5:302016-07-12T00:02:56+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्या गावात साजरी करण्यासाठी एखाद्या कार्यकर्त्याला न्यायालयाचे दार ठोठवावे लागत असेल तर समाज म्हणून आपण
बाबासाहेब, ‘आम्ही कृतघ्न’
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्या गावात साजरी करण्यासाठी एखाद्या कार्यकर्त्याला न्यायालयाचे दार ठोठवावे लागत असेल तर समाज म्हणून आपण केवळ कृतघ्नच नाही तर त्या महापुरुषाच्या विचारांचे मारेकरीही ठरतो.
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या पांगरी नवघरे या गावात २००७ पासून बाबासाहेबांच्या जयंती-पुण्यतिथीचा कार्यक्रम होत नाही. एका वादाची पार्श्वभूमी असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची सबब पुढे करून पोलीस प्रशासन बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला परवानगी देत नाही. ज्या महापुरुषाने या देशाला राज्यघटना दिली, त्याची जयंती साजरी केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी घटनेतील मूल्य अद्याप स्वीकारलेले नाही, असा त्याचा अर्थ होतो. बाबासाहेबांनी तुमच्या-आमच्या आयुष्याचे मार्ग प्रशस्त केले, त्यांच्याविषयीची कृतज्ञता जयंती-पुण्यतिथीच्या माध्यमातून व्यक्त केल्यामुळे सामाजिक शांततेचा भंग होत असेल तर अशा वेळी समाजाच्या खऱ्या प्रबोधनाची निकड वाटू लागते. केवळ देशातच नव्हे तर साऱ्या जगात वंदनीय ठरलेल्या या महामानवाबद्दल काही माणसांच्या मनात पूर्वग्रह असतील तर ते कायद्याने नव्हे तर लोकशिक्षणातूनच नष्ट करावे लागतील, हेही इथे परखडपणे सांगायलाच हवे.
या प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक आश्वासक निर्णय देताना, ‘गावकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन सामोपचाराने हा प्रश्न सोडवावा’, असे सुचविले आहे. समाजाने निर्माण केलेले प्रश्न समाजानेच एकत्र येऊन सोडवायचे असतात. कायद्याने या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची उत्तरे तत्कालिक मिळतात खरी पण समाजाच्या मनात असलेले पूर्वग्रह त्यातून नष्ट होत नाहीत, उलट ते अधिक बळकट होतात. असे सामाजिक सौहार्दाचे प्रश्न सोडवायला राजकारणी माणसे फारशी उत्सुक नसतात. कारण जातीय तेढ निर्माण करणे व ती तशीच ठेवणे हेच त्यांच्या राजकारणाचे भांडवल असते. या वादांमुळे आपली मते वाढतात, असा समज राजकारण्यांचा असल्यामुळेच पांगरी नवघरेचा प्रश्न सुटत नाही. आज कायद्याने जात, पात पाहण्याचे दिवस संपले. पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात ती रुतून असतेच. जेव्हा ती उफाळून येते तेव्हा एखाद्या असाह्य दलित महिलेची गावातून धिंड काढली जाते किंवा दलित तरुणाला जिवंत जाळले जाते. पांगरी नवघरेत बाबासाहेबांची जयंती होऊ न देण्यामागे हीच ‘जात’ कारणीभूत आहे. स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतरही खेड्यापाड्यातील दलित समाज वेगळी वस्ती करून का राहतो? इतर जातीच्या लोकांसोबत राहायला तो का घाबरतो? वरवर अतिशय क्षुल्लक वाटणारा हा प्रश्न पांगरीच्या घटनेच्या निमित्ताने साऱ्यांनाच अस्वस्थ करणारा आहे.
प्रश्न एका गावात बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचा नाही. या महापुरुषाची भूमिका राष्ट्रनिर्मात्याची होती. केवळ दलितच नाही तर समाजातील शोषित-वंचितांना माणूसपणाचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले. बाबासाहेबांच्या त्यागापुढे नतमस्तक होताना आपण नेहमी कद्रुपणा दाखवतो, त्यांना जातीबाहेर पडू देत नाही, हे कटू सत्य आहे. पांगरीसारख्या गावातील ‘जातवास्तव’ समोर आले की, आपले सामाजिक अपराधीपण मग असे ठसठशीतपणे समोर येत असते. ‘शुद्रादी-अतिशुद्रांची’ समान आधारावर एकजूट व्हावी आणि शोषणावर, विषमतेवर आधारित समाजव्यवस्थेचे त्यांनी उच्चाटन करावे’ हे फुले-शाहू-आंबेडकरांचे स्वप्न होते. ते स्वप्न आपण जाती-पोटजातींच्या अस्मितेत अमानुषपणे कुस्करुन टाकले. वंचितांचा एक वर्ग त्यातूनच उपेक्षित राहिला. बहुजन समाजातीलच एका मोठ्या घटकाला फुले-शाहू-आंबेडकर जवळचे का वाटत नाहीत, या प्रश्नाचे थेट उत्तर ‘दलित-बहुजन’ या व्यापक संकल्पनेत दडलेले आहे. हा एकोपा ज्या दिवशी प्रत्यक्षात घडून येईल त्या दिवशी पांगरी नवघरेत एकदिलाने बाबासाहेबांचा आणि माणुसकीचाही जयजयकार होईल.
- गजानन जानभोर