लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
By अतुल कुलकर्णी | Updated: April 6, 2026 07:45 IST2026-04-06T07:44:49+5:302026-04-06T07:45:40+5:30
रात्री ८:३० वाजता घडलेल्या घटनेत जखमी झालेल्या ४ वर्षांच्या मुलावर रात्री ११ वाजता रुग्णालयात उपचार सुरू झाले.

लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
मुक्काम पोस्ट, महामुंबई : अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
जखमी विघ्नेशला दीपेश ठाकरे यांच्या वाहनातून (१) पार नाका येथील सरकारी रुग्णालयात नेले. तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी (२) बाभळा येथील चिरायू हॉस्पिटलला घेऊन जा असे सांगितले. मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने व त्यास रक्ताची उलटी झाल्यामुळे चिरायू हॉस्पिटलने विघ्नेशला (३) बंगली येथील कार्डिनल हॉस्पिटल येथे पाठवले. कार्डिनल हॉस्पिटलने दाखल करून न घेता पुढे (४) पश्चिम वसईच्या विकास चिल्ड्रन हॉस्पिटलला पाठवले. त्या हॉस्पिटलने ऑक्सिजन लावून ॲम्ब्युलन्समध्ये बसवून त्याला (५) मीरा रोड नयानगर येथील वोक्हार्ट हॉस्पिटलला पाठवले. रात्री ८:३० वाजता घडलेल्या घटनेत जखमी झालेल्या ४ वर्षांच्या मुलावर रात्री ११ वाजता रुग्णालयात उपचार सुरू झाले. हे भयंकर वास्तव पोलिसांनी दाखल करून घेतलेल्या एफआयआरमध्ये आहे. वसई येथे सुडाने पेटलेल्या एका माथेफिरूने निरागस मुलाच्या बाबतीत जे कृत्य केले त्यापेक्षाही भयंकर वागणूक या चार हॉस्पिटल्सनी त्या चिमुकल्याला दिली आहे. याची कसून चौकशी करून दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत. मात्र, अजूनही या प्रकरणाची कसली चौकशी नाही किंवा एकाही नेत्याने याबद्दल तोंडातून ‘ब्र’ काढलेला नाही. चिमुकल्या विघ्नेशचे हाल एवढ्यावरच थांबले नाहीत.
आरोपी संदीप पवारचा भाऊ पोलिस विभागातून निवृत्त झाला आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करून घेण्यास पोलिस नकार देत होते, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर सोसायटीतील रहिवासी मोठ्या प्रमाणावर जमा झाले. जखमी मुलाला चार हॉस्पिटमध्ये फिरवल्यानंतर मीरा रोडला उपचारासाठी नेले. वसईतल्या हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करून घेतले नाही, त्यामुळे पोलिस ठाण्यात ‘एमएलसी’ गेली नाही, हे कारण पोलिसांना मिळाले. रात्री दहा-सव्वादहाच्या सुमारास सोसायटीतील रहिवासी, भाजप, सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते पोलिस ठाण्यात जमले. वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक घाडीगावकर यांना फोन केला.
बहुजन विकास आघाडीच्या नगरसेविका डॉ. सौ. शुभांगी पाटील आणि अलका गमजा यांनी सर्व रहिवाशांसह पोलिस स्टेशनमध्ये जाऊन दबाव निर्माण केला. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक वैभव पवार फौजफाटा घेऊन घटनास्थळी गेले. सिनेमात घटना घडल्यानंतर पोलिस सगळ्यात शेवटी जसे पोहोचतात तसे... इतक्या भयंकर घटनेनंतरही पोलिस ‘एमएलसी’ची वाट बघत असतील तर यासारखे अक्षम्य दुर्लक्ष दुसरे असू शकत नाही. त्यानंतरही पोलिस म्हणावे तसे गंभीर नाहीत, अशी तक्रार झाल्यावर हा विषय मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत गेला. मुख्यमंत्र्यांचे संवेदनशील सचिव श्रीकर परदेशी यांनी फोन केल्यानंतर पोलिस कामाला लागले.
एका चार वर्षांच्या मुलाचे डोके एक माथेफिरू ऑटोरिक्षाच्या मीटरवर आपटतो. एवढ्यावर न थांबता तो त्या मुलाला हवेत उचलून रस्त्यावर आपटतो. त्यानंतर त्या चिमुकल्या विघ्नेशला फरफटत नेत असताना त्याची आजी मध्ये पडते. त्या म्हाताऱ्या आजीलाही हा नराधम मारहाण करतो. या घटनेचे व्हिडीओ फुटेज व्हायरल झाले. मात्र, पोलिस या आरोपीपेक्षाही निर्दयीपणे वागले, अशी या भागातल्या लोकांची तीव्र भावना आहे. ही घटना घडल्यानंतर स्थानिक पोलिस स्टेशनचे पीआय बाळकृष्ण घाडीगावकर यांनी गुन्हा दाखल करून घ्यायला उशीर केला का? नगरसेवकांना आणि नागरिकांना पोलिस स्टेशनवर जावे लागले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली का, या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
मीरा-भाईंदरचे-वसई-विरारचे पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांची ओळख चांगले अधिकारी अशी आहे. असे असताना त्यांच्याच कार्यक्षेत्रातील एक पोलिस अधिकारी कोणालातरी वाचविण्यासाठी गुन्हा दाखल करून घेण्यात टाळाटाळ करत असेल तर कौशिक यांनी या सगळ्या प्रकरणाची फक्त चौकशी करून थांबू नये. उलट कोणाच्या सांगण्यावरून या प्रकरणात दुर्लक्ष झाले? घटना घडल्यानंतर पोलिस वेळेवर का पोहोचले नाहीत? या सगळ्याची व पोलिसांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल केले पाहिजेत. या घटनेतील तो छोटा मुलगा एखाद्या पोलिस कर्मचारी अधिकाऱ्याचा किंवा एखाद्या राजकीय नेत्याचा असता तर हेच पोलिस त्यावेळी कसे वागले असते, याचेही उत्तर चिमुकल्या विघ्नेशच्या आई-वडिलांना आणि पोलिस स्टेशनवर तीव्र नाराजीने गेलेल्या जनतेला मिळाले पाहिजे.
मुंबईतील नागरदास धारासी भुता हायस्कूल, अंधेरी पूर्व येथील प्राथमिक शाळेत सहायक शिक्षिका म्हणून जयश्री कोंढारे काम करतात. त्या अनुपम गृहसंकुल वसई पश्चिममध्ये राहतात. प्राथमिक शाळेत शिक्षिका असणारी महिला तिच्याकडे शिकणाऱ्या लहान मुलांना ज्या आपुलकीने सांभाळते, शिकवते त्याच शिक्षिकेच्या चार वर्षांच्या मुलाच्या बाबतीत हा प्रकार घडला. या शिक्षिकेला धीर देण्याचे आणि मदतीचे काम त्यांची शाळा करत आहे. मात्र, छोट्या विघ्नेशवर झालेल्या मानसिक ताणाची जबाबदारी कोण घेणार..? या घटनेनंतर पोलिसांविषयी निर्माण झालेला तिरस्कार कसा दूर होणार..?
ज्या चार हॉस्पिटल्सनी विघ्नेशला दाखल करून घेतले नाही त्यांची नावे आणि घटनाक्रम एफआयआरमध्ये आहे. त्यातले एक सरकारी हॉस्पिटल आहे. आरोग्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या वैद्यकीय कक्षाने या हॉस्पिटलला कोणत्या सोयीसुविधा दिल्या ते तपासायला हवे. दिल्या असतील तरीही आणि नसतील दिल्या तरीही ही हॉस्पिटल्स अशी का वागली? याची चौकशी झाली पाहिजे. अशा गंभीर घटनेनंतरही सरकार ॲक्शन घेत नाही असा मेसेज गेला तर अशा बेफिकिरीमध्ये आणखी वाढच होईल. आरोग्याच्या बाबतीत मुख्यमंत्री टोकाचे सेन्सेटिव्ह आहेत. त्यांनी पोलिस विभाग आणि आरोग्य विभागाला जाब तर विचारलाच पाहिजे; पण कठोर कारवाईसुद्धा केली पाहिजे.